अध्यात्म विराम ८८
कर्मसिद्धांत श्रेष्ठ मानणारा आणि त्यानुसारच आपलं हे विश्व आणि त्यातील प्रत्येक कण आणि क्षण रचणारा ईश्वर, कधीही त्या सुत्राबाहेर आणि तत्वाबाहेर गेला नाही आणि जाणारही नाही. म्हणूनच विश्वातील प्रत्येक क्षणी होणाऱ्या प्रत्येक गोष्टी मागें, निश्चित कारण सूत्र आहेच आहे. प्रत्येक जीवाची प्रत्येक क्षणी होणारी प्रत्येक क्रिया व प्रतिक्रिया,या कुठल्या ना कुठल्या कर्माचा फल स्वरूप परिणाम आहेत.आता तुम्ही विचार करत आहात त्या प्रमाणे घडणारी, इष्ट वा अनिष्ट अशी प्रत्येकच गोष्ट ही कर्माचा परिणाम आहे.
म्हणून याचं कर्मफल स्वरूप म्हणून, सद्गुरू तत्व, तिन्ही देवांच्या संयुक्त शक्तीतून, श्री दत्तगुरू रुपात, या भुवर अवतीर्ण झालं, जे या कलियुगात तारक आहे. त्याचसाठी ऋषिवर अत्री आणि माता अनुसया हा कथाभाग, घडून आला.अन्यथा,देवांच्या अर्धांगी असलेल्या तिन्ही शक्ति रुप देवीना, माता अनुसया यांच्या पासून असूया, असुरक्षितता वाटून त्यांनी त्रीदेवांना, मातेची सत्व परीक्षा पाहण्यासाठी धाडलच नसतं. त्यानंतर घडलेली पूर्ण घटना आणि साक्षात त्रिदेवांच्या एकत्रित शक्तितून, श्रीदत्तात्रेय, सद्गुरू उगमस्थान, यांचा जन्म व संपूर्ण जीवनकार्य हे अनेकानेक युगांचा विचार करून, ईश्वराने घडवून आणलेली लीला आहे, असा संपूर्ण गोष्टीकडे पाहिल्यावर अंदाज बांधता येतो.
या एका तत्वाला जन्माला घालून, गुरू आणि शिष्य, भक्त, भाविक व साधक या दोन नात्यांची युगानुयुगांसाठी भक्ती मार्गात निर्मिती करण्याचं महत्वाचं कार्य ईश्वराने केलं आणि ते जगत हितासाठीच घडवून आणलं, हे नक्की. कारण तीन देवी शक्ती या मायेच्या आधीन येऊ शकत नाहीत,हे नक्कीच. म्हणजे तो मायेचा पाश व त्यामागे पुढील सर्व घडलेल्या घटना,ही जगत कल्याणार्थ ईश्वरी प्रेरणेने, मायेने व शक्तीने घडलेली लीला होती हे नक्की.
आता या व अशा अनेक घटना, कथा व लीला यांमधून हे नक्की दिसतं व सिध्द होतं की, या ईश्वरी व्यवस्थेत विनाकारण व विनाउद्देश काहीही होत नाही. कर्म हा सर्वांचा आधार आहे आणि विश्वहितार्थ घडलेल्या या व घडणाऱ्या अश्याच अनेक घटना, या ईश्वरी लीलाच आहेत. म्हणूनच आपण ईश्वरावर पूर्ण विश्वास ठेवून, आपल्या भक्ती मार्गातील आपला कर्म सहभाग पार पाडावा. कारण लाखो करोडो सर्वसामान्य भक्तांसाठी, सद्गुरू रूप करुणामय, कनवाळू सहाय्यक जास्त, ईश्वराने स्वतःच पुढे केला आहे.
त्या सद्गुरूरूप ईश्वरी अंशावर पूर्णपणे विश्वास, श्रद्धा ठेवून, आपण आपला भक्तीचा महामार्ग बिनधोकपणे चालून, ईश्वराकडून निर्माण करण्यात आलेल्या या व्यवस्थेचा लाभ घ्यावा. भक्ती मार्गातील आपल्या दास्य भक्तीला,आपल्याच सद्गुरू सेवेने आपण सुरुवात करूया. कारण सद्गुरू हे ईश्वराचा अंश स्वरूप असल्या मुळे, आपली गुरुभक्ती व गुरुसेवा, त्या ईश्वरापाशी नक्की पोचणार.
आपल्या भक्ती .आर्गातील पुढील पायरीकडे आपण पुढील भागात पुन्हा वळूया. तोपर्यंत आपल्या सद्गुरू रूप ईश्वराची भक्ती व सेवा करतच राहूया.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२७/०१/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment