अध्यात्म विराम ४१
कालच्या विषयाला पुढे नेऊया.
समान परिस्थितीत, त्याचं गोष्टी, घटना, व्यक्ती याच्या स्मृती, पृष्ठ पटलावर आणण्याची मनाची क्षमता, ही समान परिस्थिती किंवा समान वातावरण या घटकाशी निगडित आहे. याचाच अप्रत्यक्षपणे उल्लेख भगवान श्रीकृष्ण यांनी गीतेतील आठव्या अध्यायात केला आहे.
गेले तीन चार भाग, स्मरण या शब्दाबद्दल तपशीलवार व सखोल विवेचन यासाठीच केलं की, स्मरण या शब्दाची व्युत्पत्ती, व्यापकता, व्यवस्था, कार्य हे पूर्णपणे ध्यानात यावं.
आता स्मरण या भक्तीच्यां तिसऱ्या पायरीचा ईश्वरी उद्देश आणि साध्य, यावर सखोल चिंतन करूया. स्मरण या व्यवस्थेचा, त्यामागील शास्त्र विज्ञान याचा आपण गेले काही भाग सखोल अभ्यास केला. ही स्मरण व विस्मरण यांची जोडी आणि देहादेहातून फिरताना, आत्म्याला यामधे मनाची जोडणी देवाने, मुद्दामहून दिली आहे. त्या मागचा ईश्वरी उद्देश काय आहे आणि हे प्रत्यक्षात कसं घडतं ते जाणून घेऊ, म्हणजे भक्तीच्या तिसऱ्या पायरीचा अभ्यास सखोल आणि पूर्ण होईल.
भगवान श्रीकृष्णांनी स्वतः गीतेतील आठव्या अध्यायात सांगितलेलं, गेल्या भागात आपण पाहिलं. त्यात स्वतः परम ईश्वराने सांगितलं आहे की, मृत्युसमयी जे भाव, जी वासना,जी कामना,जी इच्छा,जे विचार मनात असतील, त्यानुसार आत्मा पुढील देह धारण करतो. किंवा त्या इच्छेची फलश्रुती म्हणून पुढील जन्मात त्या प्रकारची देहप्राप्ती होते.
ईश्वराने स्वतः हेदेखील सांगितलं आहे की, मृत्युसमयी तेच भाव व वासना मनात विचार रुपात प्रकट होतील, ज्याचं स्मरण मनुष्य आयुष्यभर करत आला आहे. आता हा मुद्दा नीट जाणून घेऊया. आपण शाळेत शिकताना हे नक्कीच अनुभवलं असेल की, परीक्षेत, त्याचं गोष्टींचं स्मरण होतं, ज्या गोष्टी, धडे, मुद्दे आपण अभ्यासले असतील किंवा ज्यांचा नित्य अभ्यास, वाचन, मनन व चिंतन केलं असेल.
सर्वच्या सर्व हुशार, गुणवत्ता प्राप्त आणि उत्तम गुण प्राप्त करणारे विद्यार्थी हे नियमित अभ्यास, वाचन करणारे विद्यार्थीच असतात. म्हणजे नित्य अभ्यास ज्या गोष्टीचा केला जातो, त्याचं गोष्टी परीक्षेत स्मरतात. म्हणजे स्मरणाचा नित्य अभ्यासाशी जवळचा संबंध आहे. आपला अनुभव देखील हेच सांगतो की, नित्य भेटणाऱ्या व्यक्ती आपल्या चिंतनात नेहमी राहतात किंवा त्यांचं स्मरण डोळे बंद केले की, मनः चक्षुंना होत.
म्हणजेच स्मरण हे नित्य अभ्यास आणि नित्य संपर्क यातूनच साध्य होतं. आता आठव्या अध्यायातील अर्था कडे वळूया. अंत काळ हा प्रत्येकाला सामोरा जावा लागणारा क्षण आहे. कारण मृत्यू कोणालाही चुकला नाही. पण ही परीक्षा मानवी परीक्षे सारखी, पुन्हा देता येणारी व्यवस्था नसल्यामुळे, त्याचा अभ्यास वा सराव सुद्धा करता येऊ शकत नाही.
आपल्या जीवनात किंवा मानवी व्यवस्थापन शास्त्रात अश्या परीक्षा नक्कीच आहेत, ज्या आयुष्यात एकदाच देता येतात. अश्यावेळी, आपली स्मरण शक्ती धोका देऊ नये आणि त्या समयी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरासाठी आधी तयारी करून ठेवणं गरजेचं आहे. तरच त्या एकदाच येणाऱ्या शेवटच्या क्षणी,अत्यंत,शुभ हितकारक पुढील देहाची वाटचाल सुलभ करणारे विचार, मनात त्या अंतिम समयी येतील.
हेच चिंतन उद्या पुढे सुरू ठेवूया.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
११/१२/२०२२
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment