अध्यात्म विराम ९०
खरतर लीनता आणि शरणागती हा भक्त, साधक यांचा परम धर्म आहे. याची अनेक उदाहरणं आहेत. महाबली हनुमान आणि अर्जुन ही दोन उपयुक्त उदाहरणं आहेत, ज्यांच्या माध्यमातून आपण दास्यत्व भक्ती मार्गातून, ईश्वराच्या हृदयातील सखा या परम पदापर्यंत जाण्याचं गुह्य जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. हनुमंत हा दास्यत्वाच अजोड उदाहरण आहे. पण त्याचवेळी रामरायाच्या हृदया तील सखा सुद्धा आहे. स्वामीचरण, स्वामी स्मरण आणि स्वामीभक्ती या त्रयीचे सूत्रधार म्हणून हनुमंत या महारुद्र मूर्तीकडे पाहता येईल. त्यांच्याकडून हीच त्रयी आत्मसात करता येईल.
मुळात वाल्मिकिंच्या आद्य रामायणात सांगितल्याप्रमाणे, प्रत्यक्ष श्रीमहादेव हे, रामावतराच्या कित्येक युगे आधी पासून, राम नामाचा जाप आणि राम नामातच समाधी लावून, युगानुयुगे ध्यानस्थ बसतात. श्रीशंकर हे रामाचे आद्यभक्त आहेत. त्यांच्या साठी काहीतरी करण्याची अर्थात त्या श्रीरामांची सेवा करण्याची संधी साधण्या साठीच, प्रत्यक्ष श्रीराम अवतारात, श्रीशंकरांनी महारुद्र हनुमंत, हा अकरा रुद्रांपैकी एक असलेला, अवतार धारण करून, युगानुयुगे स्वतःला श्री रामसेवेत बांधून घेण्यात धन्यता मानली.
त्यांच्या भक्तीचं माहात्म्य कथन करण्यासाठी, कित्येक युग जातील पण प्रत्यक्ष हनुमंताच्या भक्तीची, भावनांची आणि सेवेची कल्पना, आपल्याला यत्किंचितही येऊ शकेल असं वाटतं नाही. त्यांच्या या भक्तिच्यां, निष्ठेच्या आणि स्वामी प्रेमाच्या बलामुळेच प्रत्यक्ष युगायुगांचे स्वामी प्रभू श्रीराम यांनी त्यांना आपल्या हृदयात स्थान देऊन, अत्युच्च पदी विराजमान केलं आहे. त्यांच्या भक्तीने भारावून, प्रभूंनी त्यांना अखंड रामनाम प्रचार, प्रसार आणि सेवा यांची कल्पांता पर्यंतची महत्वाची कामगिरी, त्या हनुमंताच्या इच्छेनेच प्रदान केली आहे.
दास्यत्व आणि सख्यत्व या वास्तविकपणें एकमेकांसोबत येणाऱ्या भावस्थिती आहेत. कारण आपण ईश्वर किंवा सद्गुरू यांना खऱ्या अर्थाने स्वामित्व देणे आणि त्या स्वामींनी आपल्या निष्ठेच्यां, भक्तीच्या परिणाम स्वरूप, त्यांच्या हृदयात स्थान देणं, ही झाली दास्यत्वाची फल स्वरुप प्रचिती. पण ही प्रचिती किंवा अनुभूती येण्यासाठी दास म्हणून काही नियम, बंधनं असणं किंवा सांभाळणं अत्यंत आवश्यक आहे. त्यावर जरा विचार करूया.
सर्वात महत्वाचं म्हणजे दास भक्ती हा व्यवहार नाही किंवा कर्मफलातून मुक्ती नाही, हे ध्यानात धरलं पाहिजे. म्हणजेच स्वामी अर्थात ईश्वर वा सद्गुरू यांनी आपल्या निष्ठेच्या, भक्तीच्या बदल्यात, व्यवहार स्वरूप आपले काही भोग, आपली काही संकटं, दुःख आदी कमी करावं. अश्या प्रकारची अपेक्षा भक्त, साधक, सेवार्थी यांनी बाळगल्यास, ती भक्ती किंवा दास्यत्व न राहता, व्यावहारिक बाब होते जे अध्यात्माच्या मूळ आत्म्याच्या विपरित आहे.
म्हणूनच, ईश्वर नाम घेताना, सर्वात प्रथम हे लक्षात ठेवलं पाहिजे की, सद्गुरू किंवा ईश्वर हे दुकानदार नाहीत, की तुम्ही चार आण्याची भक्ती दिली की, त्या बदल्यात त्यांनी तेवढ्याच किमतीचे भोग कमी करून द्यावेत किंवा आपल्यावरील काही संकटांना कमी करून द्यावे. ज्यांना अश्या प्रकारची अपेक्षा असेल किंवा ज्यांचं सांसारिक, व्यावहारिक व प्रापंचिक गणित मनातून जात नसेल, त्यांनी आधी, मनाने यावर काम करून, स्वतःला व स्व ला हे समजावून सांगणं अत्यंत आवश्यक आहे.
ते काय आणि कसं समजावून आपली मानसिक भूमिका या मार्गासाठी परिपूर्णतेने तयार करायची, यावर उद्याच्या भागात विचार करूया. तोपर्यंत त्या नामाचा निष्ठेने व प्रेमाने जप करण्याचा प्रयत्न करतच राहूया.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२९/०१/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment