अध्यात्म विराम ३८
कालच्या मुद्द्यावर आज चिंतन पुढे सुरू करूया. स्मरण या शब्दात, ज्याचे विस्मरण होऊ नये अशी आपली इच्छा आहे, त्याचं स्मरण करणे. म्हणजे माणसाची या देहात आल्यावर जन्मतः असेल आणि संचित कर्मा प्रमाणे जशी वृत्ती होत जाईल, त्याप्रमाणे त्या गोष्टींचं स्मरण व चिंतन मनुष्य, देहाचा वापर करून, अखंड करतो. किंबहुना मानवी मनाला ती जडलेली एक प्रकारची व्याधी आहे, असं म्हटल,तर ते गैर ठरणार नाही.कारण मन हे अविरत, अखंड आणि प्रत्येक क्षण नित्य कसलं ना कसलं चिंतन करतच राहतं.
स्वस्थ बसणे हा त्या मनाचा धर्मच नाही. अगदी श्वासा पेक्षा जास्त गतीने, मन नित्य चिंतन करतच असतं. देहाच्या लालसेपोटी, देहाच्या गरजेनुसार, देहसुख अनुभवता येण्यासाठी, मानवी मन एकसारखं, त्याच सुखाच्या प्राप्तीची अपेक्षा, आकांक्षा, इच्छा, वासना, कामना धरून , दृढतेने, संकल्पपूर्वक त्यांचं स्मरण, चिंतन करतच असतं.
प्राप्तीची ही लालसा धरून, मानवी मन जागृती, अर्ध जागृत किंवा स्वप्नावस्था व सुप्त किंवा सुशुप्ती, या तिन्ही अवस्थेत, स्मरणातून, चिंतनातून त्यांचा सतत पाठलाग करत असतं. हे एकप्रकारे स्मरण आहे. यामधे काही प्रकार करता येतील.जगण्यासाठी केलेलं स्मरण,जीवन सुलभतेसाठी केलेलं स्मरण आणि ऐश आराम व अतिरिक्त ऐश्वर्य, शारीरिक, ऐहिक, कामिक, वासनिक, विकृत सुख प्राप्तीसाठी केलेलं स्मरण.
यातील पहिल्या प्रकारचं स्मरण पूर्णतः आणि दुसऱ्या प्रकारात काही प्रमाणात, मानवी मनाला जगण्याची अपरिहार्यता म्हणून काही स्मरण व चिंतन आवश्यक व अनिवार्य असतं. हे स्मरण सहजसाध्य आणि आवश्यक असल्यामुळे माणसाच्या मेंदूत तशी व्यवस्था विधात्याने निर्माण करुन दिली आहे. यामधे अत्यावश्यक गोष्टींचा समावेश होतो. हे स्मरण जागृत अवस्थेत, जगण्या
साठीचे हित साधले जावे किंवा साधता यावे म्हणून, गरजेचे असते. याचसाठी ईश्वराने ही त्रिस्तरीय व्यवस्था मनात केली आहे.
यातील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे, ही व्यवस्था मन व मेंदू अश्या दोन्हींचा वापर करून, ईश्वराने केलेली आहेत. म्हणजे टेक्निकल भाषेत मेंदू म्हणजे हार्डडिस्क आणि मन म्हणजे सॉफ्टवेअर प्रोग्रॅम आहे. खरं गुह्य म्हणजे दोनपैकी एक जरी नादुरुस्त असेल तरी स्मरणाची ही व्यवस्था निकामी होते किंवा तिचे कार्य मंदावते.
म्हणूनच आपण बरेच वेळा बघतो, वाचतो किंवा ऐकतो की, मनाला वा मेंदूला धक्का बसलेली एखादी व्यक्ती, आपली स्मृती किंवा गतकाळातील आठवणी किंवा त्यातील काही भाग हरवून बसते. अर्थात त्या आठवणी हरवलेल्या नसतात तर, त्यांना आठवून, मनःपटलावर घेऊन येणारी व्यवस्था, निकामी किंवा नादुरुस्त झालेली असते. म्हणूनच अश्या बाबतीत डॉ बरेचवेळा एक वाक्य सांगतात की, जर पुन्हा असाच धक्का बसला, तर स्मृती परत येऊ शकते.
याचं अजून सखोल आत्मचिंतन उद्याच्या भागात करूया.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०८/१२/२०२२
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment