अध्यात्म विराम ५६
वंदन हे आहेत मात्र तीन शब्द. पण त्यामागे कृती, देह, बुद्धी, मन, प्राण आणि आत्मस्वरूप यां पाचांना आपल्या आराध्यासमोर अर्थात त्या सत् चित् आनंद स्वरूप परम इश्वरासमोर नत होऊन, त्या शक्तीची आराधना, वंदना, अर्चना व प्रार्थना रूप भक्ती करतात,हा भाव व ही स्थिती अपेक्षित आहे. म्हणजे जे श्रवणा तून हृदयात पोचलं, ते स्मरण रुपात हृदयी दृढ धरलं. त्या हृदयस्थ ईश्वराचे पाद सेवन करून,त्या ईश्वराची अर्चना करण्याचा भाव, म्हणजे भक्ती.
आपण ईश्वराची अर्चना, प्रार्थना करतो, तेंव्हा कळत नकळत आपण, त्या शुद्ध सात्विक स्वरूपाला वंदन करून, आपल्या मनातील सकारात्मक लहरी, त्या शक्ती पर्यंत पोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. मुळात अर्चन आणि वंदन ह्या कृती किंवा भक्तीचे हे दोन मार्ग परस्पर पूरक आहेत. दोन्ही हातात हात घालून येतात.
कारण आपण एखाद्याची अर्चना, प्रार्थना, करताना मनात तेच भाव उधृत होतात आणि देह आपोआप नतमस्तक होऊन, नकळत वंदन केले जाते. जरा आठवून बघा, आपण जेंव्हा जेंव्हा एखाद्या मंदिराच्या समोरून जातो किंवा प्रत्यक्ष मंदिरात जातो, त्यावेळी नकळत आपले दोन्ही हात जोडले जाऊन, मनात किंवा वेखरित, आपण त्या देवाला नतमस्तक होऊन वंदन करतो.
हा त्या स्थितीत मनातील दृढ भाव नकळत देहाला सुद्धा त्याचं स्थितीत घेऊन जातो. त्यावेळी तो निव्वळ उपचार न राहता, त्या मूर्तीत, मनःचक्षूनी, आपलं आराध्य जागृत आहे,हा भाव योजून, त्या आराध्याला केलेलं वंदन असतं. हा सहावा भक्तीमार्ग नित्य अवलंबला जात असतो. किंवा आपणच आपल्या नकळत, एक भक्ती मार्ग अवलंबून, इष्ट देवतेला, ईश्वराला वा सद्गुरूंना नतमस्तक होऊन, आपलं देह, बुद्धी मन, हृदय व आत्मा त्या चरणांवर स्थिर करून, आपल्या इच्छा आकांक्षा वाहून, मनःशांतीची अनुभूती घेतो.
अश्या मनःशांती, अनुभवाची अनुभूती घेता येणं, म्हणजे आपल्या मनातील भक्ती भाव सुदृढ आहे, हे जाणावं. हीच ईश्वराच्या अस्तित्वाची मनातील प्रचिती जाणावी. पण अशी अनुभूती येत नसेल तर एकतर आपण असं वंदन,निव्वळ उपचार म्हणून करत आहोत किंवा आपल्या मनात भौतिक जगतातील व संसारातील काही इच्छा वा आकांक्षा शेष आहे, ज्याच्या अपूर्णतेमुळे आपलं मन स्थिर होऊ शकलं नाही.
या अपूर्णता भावावर उद्याच्या भागात पुढे चिंतन करूया.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२६/१२/२०२२
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment