अध्यात्म विराम ७३
अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते।
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्।।९.२२।।
देहाला, मनाला आणि भौतिक जगतात काही क्षण जाणवणारी अनन्यता, ही खरी, पूर्ण आणि कायम स्वरूपी अनन्यता नाही. म्हणजे तिला फक्त उणीव, गरज किंवा तात्पुरता भाव म्हणता येईल. प्रभू जर या अनन्यते बद्दल बोलत असते तर,त्या अनन्यतेच्या स्थितीत अनेकांना भक्तीयोग, आत्मज्ञानयोग साधला गेला असता. किंबहुना इतक्या सहज साधता येणाऱ्या गोष्टी विषयी, भगवंतांना येऊन ज्ञान देण्याची आवश्यकताच नव्हती. अनेकानेक ऋषी मुनी, साधुसंत यांनी आपला जन्मच्या जन्म यासाठी खर्ची घातला नसता.
मग ही अनन्यता कोणती आणि ही स्थिती कशी प्राप्त होते, यावर विचार करूया. अनेकांचा असा समज असतो की, साधू संत, सद्गुरू, ईश्वर हे सर्व, माझ्या भौतिक जगतातील समस्या, अडचणी, प्रश्न व अडथळे दूर करण्यासाठी आलेले आहेत. वास्तविक हे अर्धसत्य आहे. अर्धसत्य या अर्थाने की,या प्रपंचा तील समस्यांनी सामान्य जन, साधक व भक्त, हे निराश होऊ नयेत आणि त्यांनी आत्मज्ञान प्राप्तीच्या मार्गावर मार्गक्रमण करत राहावे, तसेच आपल्या आत्म ध्येयापासून ढळता कामा नये, यासाठी आवश्यक सहाय्य, या सर्व शक्तींकडून नक्कीच केले जाते. पण ते तितकेच असते व असणार, हे ध्यानात घेतले पाहिजे.
परंतु त्यातही कर्म फल योग हाच श्रेष्ठ आहे. म्हणजे आपण आपल्या कर्म प्रवासात त्यासाठी आवश्यक पुण्यकर्म, शुभफल, भक्तीयोगाची, साधनेची शिदोरी जोडून ठेवली असेल तरच, या दिव्य शक्ती, त्यातून काही पुण्यफल, आपल्याच उपयोगासाठी आपल्या कार्यार्थ योजू शकतात. पण तरीही, त्याची आवश्यकता किती आहे आणि आज सहाय्य करून, आपण त्यावर अवलंबून राहू आणि पुढे भौतिक व आत्मिक दोन्ही प्रगती, खुंटल्या तर काय, हे त्रिकाल ज्ञानी दिव्य विभुतींना ज्ञात असते.
म्हणूनही जिथे आवश्यक नाही, त्या प्रसंगात, भोगात आपल्याला सहाय्य होत नाही. अर्थात या भौतिक जगता तून आत्मिक जगतात,देहातील आत्म्याला घेऊन जाण्याच्या प्रवासातील कोणत्या स्थानकात जीवनरूप गाडी थांबवायची आणि कोणत्या स्थानकात थांबा न देता पुढे न्यायची,याची जाण सद्गुरू रूप ईश्वराच्या या प्रतिनिधींना असते. पण त्यांची प्रामाणिक इच्छा, सामान्य जन, साधक, भक्त यांना ती अनन्यता प्राप्त व्हावी, ही असते. या अनन्यते साठी आणि त्या पायी, देह, बुद्धी व मन यांना झिजवून, त्या अनन्यतेची प्राप्ती करवून घेतली पाहिजे.
आता ही अनन्यता म्हणज आत्मयज्ञातील ती स्थिती जिथे एक ईश्वर चरण सोडून अन्य काहीही आवश्यक नाही किंवा उपयोगाचं नाही, हा भाव. याचा दुसरा अर्थ असा की, आता माझं सर्व काही, एक ईश्वर सोडून दुसरं कोणीही नाही. किंवा तिसऱ्या अर्थाने, या भौतिक जगता तील सर्व नश्वर गोष्टी प्रमाणे, देह व देहाचे व्यवहार नश्वर असताना, आता अन्य काय उपाय आहे, जेणेकरून हा आत्म प्रवास थांबेल, हा भाव.
अनन्य भाव अजूनही व्यापक असल्यामुळे, त्याबद्दल पुढील भागात पुन्हा चिंतन सुरू ठेवूया.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१२/०१/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment