अध्यात्म विराम ३१
ईश्वरी नामाच्या, मंत्र, स्तोत्र इत्यादींच्या लहरी, या जगता बाहेरील व विश्वाला नियंत्रण करणाऱ्या एकमेवा द्वितीय अश्या ब्रम्हांड रचयीता, विश्व पिता यांच्या प्रेरणेने निर्माण झालेल्या असल्याकारणाने, त्यांच्या मागचा driving force हा विश्वा बाहेरील, किंवा गुण रहित, शक्तिकडून पुनः प्रसारित होत असल्याने, त्याला बहुपट driving force किंवा कार्यकारक शक्ती संचालित करते.
कारण आपण जाणतोच की, प्रत्येक लहरी, या आपल्या लक्षापर्यंत जाऊन, पुन्हा परत येतात आणि त्या लक्षा नुसार पुनः उलट प्रवास करतात. भक्तीच्या, नामाच्या, साधनेच्या इत्यादीं शुद्धता व सात्विकता युक्त सर्व लहरी, त्यांचे नियोजित लक्ष, अर्थात ब्रम्हांड शक्ती, हीच्यापर्यंत पोचून, त्या लक्षाची शक्ती प्राप्त करून, पुन्हा माघारी, त्याचं भक्त, साधक, नामधारी, यांच्यापर्यंत दुप्पट शक्ती धारण करून, दुप्पट परिणाम साधण्यासाठी, येतात.
त्यांची कार्यकक्षा, अमर्याद, असिमित आणि अनादी अनंत असते. मात्र यामधे साधकाचं सातत्य, नियमितता ही अविवादित असली पाहिजे.त्याचप्रमाणे ती निष्कलंक, निर्लेप व निर्भेळ असली पाहिजे. सातत्य यासाठी की, त्या लहरी. इष्ट लक्षावर, आपला परिणाम तेंव्हाच करू शकतील, जेंव्हा त्या संतत धारेप्रणाने, निघतील आणि लक्षाप्रत नियमित जात राहतील. अन्यथा त्या अशक्त होऊन नष्ट होऊ शकतील. अकार्यक्षम होतील आणि त्यांच्या प्रभावाने येणाऱ्या ईश्वरी प्रतिसाद लहरी निर्माण होऊ शकणार नाहीत.
इथे आपण एखाद्या प्रक्षेपण यानाचं उदाहरण घेऊ शकतो एखाद्या प्रक्षेपक केंद्रावरून, उड्डाण केलेलं यान, अवकाशात झेपावेल. पण ते कक्षेबाहेर किंवा पृथ्वीच्या वातावरणाबाहेर, तेंव्हाच जाईल, ज्यावेळी त्याला तितक्या प्रमाणात इंधन, ऊर्जा व बल, मिळत जाईल. यातसुद्धा, त्याच्या प्रक्षेपणांचा वेग हा तितकाच पुरेसा व योग्य प्रमाणात असणं गरजेचं आहे. म्हणजे बाहेर जाण्यासाठी आणि नंतर वातावरण कक्षेच्या बाहेर गेल्यावर निर्वात वातावरणात, ऊर्जा आणि शक्ती जास्त लागते.
म्हणजेच आपल्या कडून उत्पन्न लहरी ज्या आपल्या श्रवणात येतात, त्या माध्यमातून मनातून ज्या विचार, चिंतन लहरी उत्पन्न होतात, त्यापैकी ज्या, अत्यंत ऊर्जा प्रधान व शक्तियुक्त असतात, त्याचं आपल्या लक्षाकडे, पूर्ण क्षमतेने मार्गक्रमण करतात. यामधे नकारात्मक लहरी जास्त बलदायी असतात. पण आधीच्या सर्व विवेचनात हे लक्षात येतं की, ईश्वरी श्रवणातून आपल्या मनात उत्पन्न होणारे विचार, हे या सर्व नकारात्मक लहरींना मारक ठरतात. कारण त्यांच्या पाठी ईश्वरी चिंतन लहरी आणि ईश्वरी अधिष्ठान असतं.
पण ईश्वरी साधनेच्या लहरी, हा मार्ग क्रमायला सक्षम असतात का आणि असल्याचं तर का व कशाप्रकारे, याचा विचार उद्याच्या भागात करूया. तोपर्यंत, अभ्यास करत करत, साधनेच्या या मार्गाचा आपण अवलंब करत राहूया.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०१/१२/२०२२
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment