Skip to main content

अध्यात्म विराम ७९

अध्यात्म विराम ७९
 
अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते।
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्।।९.२२।।
 
योगक्षेम या शब्दातच एक योग आहे. म्हणजे क्षेम कुशल हे नित्य आणि नियमात बांधलेलं सूत्र आहे असा बोध यातून होतो.सूत्र काय याचा शोध घेण्याचा प्रयत्न करूया. एक गोष्ट यातून स्पष्ट होते की, ईश्वराचं वचन हे एका सूत्रबद्ध नियमाने बांधलेल्या वचन पूर्तीची ग्वाही आहे. म्हणजेच मी तुमचं क्षेम पाहिन, तुमची काळजी वाहींन, हा योग मी वचनांकित करतो, अशी एक प्रकारे मुद्राच या श्लोकातील आपल्या भाष्यावर किंवा आपल्या भक्तां कडून आपल्या असलेल्या अपेक्षा पूर्ती पश्चात भगवंत स्वतः कडून मुद्रित करतात, असं माझं मत आहे. 

ज्यावेळी एखाद्या शब्दाला, कर्माला, कृतीलां, कार्याला योग हा शब्द जोडला जातो, त्यावेळी त्याचा गर्भित अर्थ अनेक पटींनी दृढ होतो. मी सांगितलेल्या नियमात किंवा सूत्रात बद्ध असलेला नित्याभियुक्त जो कोणी असेल, त्याचं क्षेम, कुशल पाहण्याचं माझं वचन, हा माझा एक योग आहे आणि तो सांभाळणं हे माझं ब्रीद आहे. ते सांभाळणं हा माझ्यासाठी योग अर्थात नियम आहे. म्हणजेच माझ्याशी चिंतनातून, स्मरणातून, पूर्ण उपासने तून नित्य जोडल्या गेलेल्या, अश्या भक्ताला सांभाळणं हा मी माझा नियम मानतो. 

त्या नियमात मी स्वतःला बांधून घेतलेलं आहे. इतकं दृढ आणि ठाम शब्दात वचन दिलेला ईश्वर, नक्कीच पिता या भूमिकेतून हे वचन देतो. यातून अजून एक बोध होतो, तो म्हणजे, मी वचनांकीत आहे तो, माझ्या बांधून दिलेल्या सूत्रात स्वतःला विसरून, नित्य जो माझंच पूजन, अर्चन, स्मरण अश्या परिपूर्ण तेने करतो, त्यालाच मी वचन बद्ध आहे. यातून लक्षात येणारी दुसरी गोष्ट किंवा दुसरा मुद्दा हा आहे की, या जगतात, मी बांधलेल्या नियमाबाहेर असणाऱ्या लोकांना त्यांच्या कर्माच्या फलातून कोणीही वाचवू शकत नाही. 

अर्थात आपल्याच प्रापंचिक नादात, माझ्या अस्तित्वाला विसरून, नाकारून, अज्ञानवश, मोहवश, दुर्वर्तनपूर्वक किंवा जाणूनबुजून नित्य आपल्याला सांसारिक, धर्मबाह्य कर्मात गुरफटून, परिणाम जाणून किंवा न जाणता, जे रत असतात, रममाण असतात, त्यांच्या भविष्यात त्यांच्याच कर्मांचा अंधःकार त्यांनी स्वतः लिहिलेला असतो. त्या बद्दल कोणतीही तक्रार, करण्याचा अधिकार त्यांना नाही. त्याचप्रमाणे त्यांच्या भवितव्या साठी जन्ममरणाचा एकच मार्ग, त्यांनी लिहिलेला आहे. त्याची पूर्ण जबाबदारी त्यांच्यावर असेल. 

म्हणजेच यातून प्रकट होणारा दुसरा अर्थ जो ध्वनित होतो तो म्हणजे, जो या जगतात, देहात आल्यावर, माझ्याच स्मरणात नित्य आपलं नीहित कर्म करतो, त्याच्या कर्मफल व्यवस्थेची जबाबदारी माझी असेल. म्हणजे त्यांना कर्म फल बाध्य असणार नाही. असा एक अर्थ या वचनातून सिध्द होतो. 

या एका श्लोकाच्या ध्वनित, गर्भित अर्थातून आपल्या भक्ती मार्गातील दास्य भक्ती बाबत काय निरीक्षण व निष्कर्ष निघतो आणि पुढे येणाऱ्या सख्य भक्तीच्या पायरीवर या श्लोकातून कसे जाऊ शकतो, यावर उद्याच्या भागात चिंतन करूया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१८/०१/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...