अध्यात्म विराम ४९
सेवन या शब्दाचा अजून एक स्पष्ट अर्थ आहे, सेवन करणे म्हणजे ग्रहण करणे, प्राशन करणे. अर्थात तीर्थ, प्रसाद, भोजन, लाभ, उपभोग इत्यादीचे सेवन किंवा ग्रहण करणे. पण यातून पुन्हा दोन अर्थ, कर्मावरून गर्भित होतात. सेवन,ग्रहण हे, ते तीर्थ, प्रसाद किंवा भोजन,लाभ इत्यादी स्वकर्मार्जित म्हणजे स्वतःच्या कर्माने आर्जित म्हणजे प्राप्त केलेले किंवा उपभोग स्वरूपात प्राप्त झालेले असेल. यातील,, प्राप्त केलेलं आणि प्राप्त झालेलं, दोन शब्दात तसं पाहिलं तर गुह्य अंतर आहे, पण तसं पाहिलं तर काहीच फरक नाही.
कसं ते बघुया. पहिल्या प्रकारच्या सेवनात, ग्रहणात, निश्चित आणि वर्तमान कर्म घडलेलं आहे, ज्या योगे हा तीर्थ प्रसाद, वा भोजन,लाभ सेवनाचा वा ग्रहणाचा योग आपण प्राप्त करून घेतला. म्हणजे फल निष्पत्ती आपल्याच प्रत्यक्षरूप संबंध जोडता येणाऱ्या कर्माने, घडून आली. पण दुसऱ्या प्रकारात इतर कोणीतरी केलेल्या कष्टामुळे ती प्राप्ती झाली. म्हणजे प्रत्यक्ष रुपात आपलं कोणतंही सद्य कर्म घडलेलं दाखवता येणार नाही.
पहिल्या प्रकारात स्वतः भोजन तयार करून घेतले किंवा स्वतः एखाद्या तीर्थस्थानी, मंदिरात, मठात जाऊन तीर्थ व प्रसाद यांचा लाभ घेतला व ते सेवन अथवा ग्रहण केलं. तर दुसऱ्या प्रकारात, कोणीतरी कष्टाने तयार केलेल्या भोजनाचा लाभ आपण घेतला किंवा कोणीतरी स्वतः आणलेलं तीर्थ व प्रसाद याचा लाभ झाला. तात्विक दृष्ट्या यातील भेद आणि गुह्य समजून घेण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे नक्की काय अभिप्रेत आहे ते कळेल.
पहिल्या प्रकारात आपण नवीन कर्म करून, त्यायोगे सेवन प्राप्तीचा लाभ करवून घेतला. तर दुसऱ्या प्रकारात आपल्या पूर्वकर्मातील एखाद्या संचितात जमा असलेल्या कर्माच्या फलातून तो लाभ प्राप्त झाला. यातील भोजन हा प्रापंचिक स्वरूपाचा लाभ असल्याकारणाने, अध्यात्मिक दृष्टीने फार महनीय किंवा महत्तम नुकसान होत नाही, हे नक्कीच.
पण अध्यात्मिक दृष्टीने पाहिलं, तर ईश्वरी कृपेचा हा लाभ, पहिल्या प्रकारात वर्तमानातील कर्माने प्राप्त झाल्याने, संचीतातील कोणतेही शुभ लाभदायी, कर्म खर्ची पडत नाही. पण दुसऱ्या प्रकारात आपल्या सांचीतात साठलेल्या शुभ, लाभकारक इष्ट कर्मातील एक कर्म, ईश्वर कृपेचा लाभ प्राप्त होण्यासाठी खर्ची पडतं.
म्हणजेच आता तुमच्या लक्षात येईल की, पाद सेवन अर्थात ईश्वर चरणी लीन शरणागत, समर्पित होऊन, ईश्वरी कृपेचा लाभ, स्व कष्टाने, स्व कर्माने आणि तेदेखील वर्तमानातील नित्य कर्माने, प्राप्त करणं किती आवश्यक आहे. म्हणजे नित्य श्रवण, नित्य कीर्तन, नित्य स्मरण आणि नित्य समर्पण हे प्रत्येक क्षण किंवा क्षणोक्षण नव्हे विनाखंड अत्यंत आवश्यक आहे. तरच संचीतातिल शुभ कर्म शिल्लक राहतील, जी यथायोग्य काळी उपयोगी पडतील.
यावर अजून सखोल चिंतन उद्याच्या भागात करूया. आज इथेच थांबून, ईश्वराच्या स्मरणात नित्य राहण्याचा प्रयत्न साध्य करत जाऊया.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१९/१२/२०२२
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment