अध्यात्म विराम ३४
कालच्याच उदाहरणाला पुढे नेऊन, विषय सुरू करूया. अजून एक कारण आहे की, जे बाबांनी त्या काळात टीव्ही वर सीरिअल्स, बातम्या इत्यादी पाहिलं, त्या दृ्श्राव्य चित्र ध्वनीचा परिणाम मन, रक्तप्रवाह, ते वाहून नेणाऱ्या धमन्या व नसा, संप्रेरकांना (हार्मोन्स) वाहून, त्यामार्गे, मनाने मेंदुमार्फत दिलेले आदेश, वाहून नेणाऱ्या चेतापेशी व मज्जासंस्थेसह मज्जारज्जू, इत्यादी सर्वांवर दृश्य व ध्वनी यांचा होणारा भावमय परिणाम, यामुळे हृदय, मस्तिष्क, यांवर अतिरिक्त ताण पडला असणार.
आता यातून आपल्या विषयाकडे येऊया. आता या प्रातिनिधिक उदाहरणातून हे लक्षात येतं की, श्रवण व दृश्य यांचा उचित किंवा अनुचित परिणाम आपल्या देहा सह, मन, मेंदू, हृदय आणि एकूणच सर्व व्यवस्थेवर होतोच होतो. आपण सुदृढ किंवा तंदुरुस्त असलो तर, देह,मन व मस्तिष्क त्या त्या भावनांना, आयुष्यात घडणाऱ्या घटनांना (ज्या दृकश्राव्य स्वरूपात समोर येतात), वेगवेगळे ध्वनी, स्वर व दृश्य यांना सहन करून सामावून घेण्यात सक्षम असतो.
पण जर, आपण एखाद्या गोष्टीवर, घटनेवर, आवाजावर, प्रसंगावर, अनुभवावर, कथनावर, दृष्यावर अतिरिक्त प्रतिसाद वा प्रतिक्रिया दिली, तर नक्की समजावं की, आपण मनाने, त्या गोष्टीला, आवाजाला, ध्वनीला सहन करण्यास असमर्थ आहोत किंवा मन त्याला संयुक्त वा सुयोग्य प्रतिसाद देण्यास सक्षम नाही. आता या सर्व गोष्टीवर किंवा असमर्थतेवर अनेकानेक उपाय आहेत.
पण सर्व उपायांचा शेवट, मनाची शक्ती व ऊर्जा वाढवणं हा आहे.कारण काही औषधं देहाची तंदुरुस्ती सुधारतील पण अंती मनाच्या स्थितीवर देहाची, बुद्धीची व वाचेची प्रतिक्रिया क्षमता अवलंबून असते. त्यामुळे, या सर्व व्यापातून, पसाऱ्यातून, चितांमधून, मन, वृत्ती, चित्त, बुद्धी आणि आत्मस्थिती स्थिर राखणं, हे अनेकदा, अत्यंत कर्मकठीण होऊन जातं.
त्यामुळे या सर्व व्यापातून, व्यापारातून, व्यवहारातून, व्यावधानातून, देहाच्या चिंतेतून आणि मनाच्या क्लेशां मधून मनाचं संतुलन,विचारांचा ताळमेळ,मनाला, देहाला, मेंदूला लागणारी अतिरिक्त ऊर्जा, शक्ती, बल व चेतना प्राप्त करण्यासाठी, त्यातून आत्मौद्धार व आत्मोन्नत्ती साधण्यासाठी मानवाला समय, साधनं मिळणं किती दुरापास्त होईल, हे भगवंत जाणून होते.
हाच विषय उद्या पुढे नेऊया.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०४/१२/२०२२
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment