Skip to main content

अध्यात्म विराम ७२

अध्यात्म विराम ७२
 
अनन्य होऊन चिंतन करणे म्हणजे काय हे आधी जाणून घेऊ. अनन्य या शब्दात अनेक अर्थ प्रकट होतात. अन् अन्य कोणी नाही अशी स्थिती म्हणजे अनन्यता. ही स्थिती दोन प्रकारे प्रस्थापित होते. भौतिक जगतात, तीन स्वरूपात जल, घन वा वायू या रुपात, त्रीगुण स्वरूपात किंवा त्रिमितीय स्वरूपात सिद्ध झालं किंवा सिद्ध करता आलं किंवा सिद्ध होऊन, अस्तित्वात असेल तर ते आहे आणि नाही असं सिद्ध करता आलं की अन्य कोणी नाही अश्या निष्कर्षाला सहजी येता येतं. 

पण भौतिक जगतातील ही स्थिती सांसारिक परिभाषेत भिन्न प्रकारे मोजली जाते. संसाराच्या जंजाळात आणि जग रहाटीत आपल्याला उपयोगी येणारं कोणी आहे किंवा नाही यावर मोजली जाते. म्हणजे माझ्या संकट काळात माझ्या सहाय्यार्थ कोणी आहे की या संकटांना मला एकट्याला सामोरे जायचे आहे, अशी स्थिती. पण करोडो वर्षांच्या जगताच्या इतिहासात आणि पुराणातील महाभारत आदी कथांमधून या गोष्टीची स्पष्टता होते आणि आपला सुद्धा अनुभव आहेच, की खऱ्या संकटात कित्येकदा, आपले म्हणणारे त्या संकटात उपयोगी येतीलच अस नाही. 

संसाराची कथा ही अशी आहे की, संकटात ज्यावेळी कोणीही उपयोगाला येत नाही, या स्थितीत संसाराची असारता जाणवते किंवा अनन्य भाव,  आपल्याला जाणवतो. पण ही देखील अनन्य स्थिती नाही. कारण हा मायेचा प्रभाव आहे. ही अनन्यतेची जाणीव संसारात, पळभर राहते आणि क्षणात पुन्हा गाडी मूळ पदावर येते. म्हणजे जाणवलेली अनन्यता क्षणिक, तात्पुरती असते.  मुळातच संसार वा प्रपंच हा भोग आणि उपभोग यांची साखळी आहे. या साखळीत उपभोग स्थितीत मन आनंदाच्या उंचीवर असतं आणि भोगाच्या स्थितीत मन दुःखाच्या तळाशी असतं म्हणजे अनन्यता जाणवते. पण ही कर्मगतीची साखळी आहे. 

यात प्रपंचातून मुक्त होण्याची आणि ईश्वराच्या प्राप्तीची जाणीव जागृत करणारी स्थिती येण्यासाठी किंवा त्या जाणीवा जागृत होण्यासाठी, अलौकिक ईश्वर किंवा गुरुकृपा योग घडून यावा लागतो. अन्यथा ही स्थिती येणं हा दुर्मिळ योग आहे. पण ही जाणीव जागृत होण्यासाठी, प्रपंचात दुःखाची परिसीमा किंवा सुखोपभोगाची परमावधी यावी लागते. याची अनेक उदाहरणं आहेत, जेंव्हा अत्यंत सुखासीन सम्राट अशोक व राजपुत्र गौतम यांना परमावधीच्या स्थितीत, प्रपंचाच्या फोलपणाची जाणीव जागृत होऊन, सन्यास वृत्तीची उपरती झाली. 

पण प्रपंचात राहूनसुद्धा,अशी जाणीव जागृत होण्यासाठी भगवंतांनी वरील श्लोकात सांगितलेली गुरुकिल्ली, मनात दृढ धरून, मानव, ईश्वर प्राप्तीच्या मार्गाकडे वळू शकतो. किंवा ती गुरुकिल्ली स्वतः भगवंतांनीच वरील श्लोकात मांडली आहे. प्रपंचात दुःख, भोग, कष्ट, चिंता आल्या किंवा सुख, उपभोग, लाभाचा काळ आला, तरी एक नियम मनाला स्पष्ट समजावून सांगावा की, या दोन्ही स्थिती अनियंत्रित, अनिश्चित आणि अल्प काळासाठी आहेत. ते काळानुसार, देहस्थितीनुसार, कर्मगती नुसार अस्थिर राहणार आणि क्षणोक्षणी बदलत राहणार. 

मग या सर्वात शाश्वत काय आहे, तर ते देहातील आत्मा, त्या आत्म्याचा मालक व चालक असलेला ईश्वर,हे अंतिम सत्य आहे. हे दोन्ही त्रिकाल शाश्वत आहेत.  म्हणजे हा देह एकप्रकारे आत्म्याला भाड्याने दिलेले तात्पुरते घर आहे, असे जाणावे. ते घर सोडून एक ना एक दिवस जायचं आहे आणि पुन्हा दुसऱ्या भाड्याच्या देहात काही काळासाठी वस्ती करायची आहे. आपल्यापैकी अनेक जण, आयुष्यात प्रपंचाच्या सुरवातीच्या दिवसात, काही काळ भाड्याच्या घरात राहतो आणि कष्ट करून, कर्ज काढून, स्वतःच्या मालकीचे घर घेतो. 

अध्यात्मिक परिभाषेत हीच आपली सद्यस्थिती आहे. ज्यामधे आपण देह हे भाड्याने मिळालेले घर आपले मानून, त्यातील भाडेकरू असलेला आत्मा, याला पूर्ण दुर्लक्षित करतो. त्यामुळे अनेक दुःख, शोक, भोग यांना सामोरे जावे लागते. पण जे वास्तविक त्या भाड्याने मिळालेल्या देहाचे भोग व उपभोग असतात. यातून बाहेर पडण्यासाठी स्वतःच्या मालकीच्या घरात अर्थात ईश्वरी परम अंशात विलीन होण्यासाठी, ज्या जाणिवेची जागृती होण्याची आवश्यकता आहे, तीच भगवंतांना अभिप्रेत असलेली अनन्यता. विषय थोडा गहन आणि दीर्घ असल्यामुळे, याचं पुढील चिंतन उद्याच्या भागात करूया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
११/०१/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...