अध्यात्म विराम १५
लेख क्रमांक १२ मधे दिलेलं उदाहरण पुढे नेऊ. अभिमन्युने गर्भात असताना, श्रीकृष्ण मुखातून ऐकलेलं, चक्रव्यूह भेदनाचं गुह्यज्ञान, जवळजवळ अठरा वर्षा नंतर, महाभारत युद्धात, ऐन मोक्याच्या दिवशी, उपयोगात आलं. याचा एक अर्थ असाही निघतो की, गर्भाच्या त्या अवस्थेत, देहाच्या कोणत्याही जाणीवा जागृत नसताना, आत्मा स्वतः मध्ये लीन असतो, मग्न असतो.
या कारणाने, तो आत्मा, त्यावेळी उपलब्ध एकमेव श्रवण इंद्रियाचा पूर्ण उपयोग करून, पूर्ण एकाग्र अवस्थेत, ते ज्ञान ग्रहण करून, मेंदूच्या कप्प्यात साठवू शकतो. याचा अर्थ, ज्या ज्यावेळी माणूस, अशा प्रकारच्या अवस्थेप्रत जाऊ शकतो, त्या त्यावेळी, या देहातील एका ज्ञान इंद्रियाचा सदुपयोग करून, विश्वरूप चैतन्याबद्दल, ज्ञान ग्रहण करू शकतो.
आता हे साधण्यासाठी, आपल्या देहाच्या, संसाराच्या, प्रपंचाच्या पसाऱ्यातून, बाहेर पडून, पूर्ण क्षमता, एकाच ज्ञानेंद्रियांवर केंद्रित करून, ईश्वरी शक्तीकडून, अखंड प्राप्त लहरी, कंपनं, यांना, मेंदू, मन यामार्फत, आत्म्या पर्यन्त पोचावण्याचा प्रयत्न करावा लागेल. या प्रयत्नाचा सराव करावा लागेल, त्या सरावातून, त्याचा अभ्यास करावा लागेल.
या अभ्यासातून, ज्ञानेंद्रिय, त्याची प्राप्तीची क्षमता, मेंदूची ते ज्ञान पृथक्करण करण्याची क्षमता, मनातील एकाग्रतेची ऊर्जा व शक्ती, यांना विकसित करत पुढे जावं लागेल. हा अभ्यास आहे. नव्हे हा योगाभ्यास आहे. पण हे इतकं सर्व, सातही टप्प्यातील, मानवी जीवात्मा, देह, त्या देहातील विकसित इंद्रिय व त्यांची क्षमता, या करण्यास सक्षम असतील का.
कारण प्रत्येक देहाची उत्पत्ती, स्थिती, परिस्थिती, जाणिवांची जागृती, क्षमता, विकास, प्राप्त स्थितीत देह, बुद्धी मन यांचे साद प्रतिसाद, हे सर्व एकच असणार नाहीत. अगदी एका काळातही नाहीत किंवा काळाच्या वेगवेगळ्या टप्प्यातही नाहीत. कारण या क्षमता विकसित करण्याचं शास्त्र आहे. जे एकाच आत्म्याला सर्वकाळी किंवा अनेकांना एकाचवेळी जमू शकणार नाही.
मग पुढे काय, यावर उद्या विचार करूया. तोपर्यंत आपण ईश्वर किती अगाध आहे, ज्याने हे सर्व निर्माण केलेलं आहे, याचं चिंतन करूया.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१५/११/२०२२
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment