गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम
नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु
मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ||
हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी
रातिचिये स्वप्नी आला कोवळा दिनेशु ||१||
पहाटली आशा नगरी डुले पताका गोपुरी
निजेतुनी जागा झाला राउळी रमेशु ||२||
चैत वार्याची वाहणी आली देहाची अंगणी
अंग मोहरुनी आले जसा का पलाशु ||३|
गीत गदिमा
संगीत सी रामचंद्र
गायिका आशा भोसले
चित्रपट संत निवृत्ती ज्ञानदेव
याच दृष्टांताला अजून अधोरेखित करत ज्ञानी म्हणतो ही स्थिती कशी आहे तर निराशेची स्थिती जाऊन त्याच्या जागी आशेचा प्रकाश उत्पन्न झालाय. अश्या या आशानगरीत पहाट झालेली आहे. मंदिर वा देऊळ हे मांगल्याच वा पवित्रतेच प्रतीक आहे आणि तेच प्रतीक आहे प्राप्त झालेल्या ज्ञानाचं. कारण ते दिव्य ज्ञान आहे. विश्वनियंता सापडल्याचं ज्ञान आहे ते. म्हणून अश्या पहाटेच्या प्रसन्न समयी मंदिराच्या गोपुरावर डुलणाऱ्या ध्वजपताकां प्रमाणे हे ज्ञान उच्च प्रतीचं वा उच्च दर्जाचं आहे.
अश्याच सुमुहूर्ती वा मांगल्यकाळी भूपाळी गायली जाते ती मुख्यतः देवळातील प्रतिकात्मक भगवंताला निजेतून।वा शेजेवरून जागं करण्यासाठी. हे प्रतिकात्मक याच साठी की प्रत्यक्षातील परब्रम्ह हे निर्गुण निराकार आहे आणि ते जडदेहातील कर्माच्या पलीकडे आहे आणि म्हणून निद्रा वा जागृती याच्या पार आहे. पण तरीही त्या सगुण रुपात कल्पिलेल्या परमाला जाग केल्यानन्तर तो परमईश म्हणजेच रमेश वा महाविष्णू जागा झाल्यावरची जी स्थिती आहे तीच ही साक्षात्काराची स्थिती आहे.
ही मनःस्थिती अजून विस्तारित करताना ज्ञानी साधक म्हणतो की चैत्रात सुटलेला वारा हा मन अत्यन्त प्रसन्न व पावन करणारा असतो. उन्हाच्या झळाना शीतलता देणारा असतो. देह त्या स्थितीला आलेला आहे. एका दिव्य शीतल हवेप्रमाणे पवित्र झालेला आहे. त्या आल्हाददायक अश्या परिस्थितीचा अनुभव वा अनुभूती देहाला जाणवते. अर्थात ही जाणीव मुळात आत्मउद्धाराची असल्यामुळे आत्म्याकडून मनाकडे आणि मनाकडून देहाकडे जाणवत आलेली आहे. म्हणजेच विषय भोगाच्या पूर्ण विरुद्ध प्रवाह आहे हा आणि तो क्षणिक नसून कायमस्वरूपी आत्मानंद आहे.
त्या दिव्य सुखाने अंग प्रत्यंग मोहरून गेलंय. त्या गुह्य ज्ञानाच्या प्राप्तीमुळे मनातील मोद देहाला सुद्धा सुखावून गेलाय. किंबहुना देह विदेह होऊन फक्त आत्मरुप झाल्याच्या प्रचितीचा तो उन्नत अनुभव आहे. त्याची तुलना पलाश म्हणजेच पळस याच्याशी भक्ताने केली आहे. पळस हा चैत्रात उगवणारा आणि दिव्य रंगाच्या फुलांचा वृक्ष. याचं संपूर्ण झाडच अनंत उपयोगाचं आहे. याचीच फुलं वापरून होळीचा रंग तयार केला जातो. याच्या फुलातील परागा पासून अबीर तयार केला जायचा. पानं तर पत्रावळी व द्रोण तयार करायला वापरला जातो. सालीपासून दोर तयार केला जातो वा त्याचा उपयोग जहाजात खाचा भरण्यासाठी होतो जेणेकरून गळती होणार नाही आणि खोडापासून कोळसा तयार केला जातो. अजून एक वैशिष्ट्य या झाडाचं ते म्हणजे याच्या फांद्यांना तीन तीन पानच असतात जशी फक्त बिल्वपत्र असतात. त्या अर्थी हा एक पवित्र वृक्ष सुद्धा म्हटला जाऊ शकतो.
अश्या दिव्य आणि अद्वितीय दृष्टांताप्रमाणे साक्षात्कार वा आत्मनुभूती झालेला साधक व ज्ञानी भक्त भासतो आणि तोच भगवंताला प्रिय असतो. ही स्थिती प्राप्त होणं ही एक परमावधी आहे आणि अनेक जन्मांच्या पुण्याईने प्राप्त होणारी गोष्ट. त्यात अजून एक मुख्य गोष्ट ही की , अश्या साधकांमध्ये फार दुर्मिळ ज्ञानी ते जे हे शब्दात मांडून हा अनुभव कथन करण्याचा यशस्वी यत्न करतात. म्हणूनच अश्या ज्ञानयोग्याला शत शत प्रणाम.
समाप्त
© संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले
Comments
Post a Comment