अध्यात्म विराम ४४
म्हणून ईश्वराच्या नामाच्या स्मरणाचा ध्यास धरावा. ईश्वरी नाम हे दुधारी तलवार आहे, मागे यावर आपण चिंतन केलेलं आहेच. त्यामुळे त्याचं स्मरण हे एकीकडे नकारात्मकता कमी करतच, पण सकारात्मक उर्जाबल प्राप्त करून देतं. कधीही विचार करून बघा, आपण ज्यावेळी काही अतिरिक्त ताण तणावात असतो, त्यावेळी आपण जर चुकून जरी देव सद्गुरू यांचं नाव किंवा त्याचं स्मरण केलं, तरी आपला तणाव कमी होऊन, खूप हल्क वाटतं.
हा प्रयोग केला नसेल तर, करून बघा आणि सांगा.
स्मरण याबद्दल दुसऱ्या एका बाजूने विचार करा. प्रत्येक जण अभ्यास, करूनच परीक्षा देतो. पण काही जण उत्तम गुण मिळवून पुढे जातात. किंवा एखाद्या क्षणी एखादी गोष्ट, कृती वा कर्म करण्याची बुद्धि होण आणि मनात आल्यावर त्याप्रमाणे कर्म जमण हे सर्वस्वी, त्या क्षणी, मनाच्या पृष्ठ पातळीवर किंवा पटलावर, जे विचार असतील,त्याप्रमाणेच घडणार.म्हणजे स्मरण व विस्मरण हे सर्वस्वी, पृष्ठ पातळीवर असलेल्या विचार तरंगांच कार्य आहे.
म्हणून पृष्ठ पातळीवर किंवा पटलावर आपल्याला अपेक्षित विचार असावेत यासाठी, तेच विचार चिंतन, मनन नित्य करणं क्रमप्राप्त आहे. म्हणून सुद्धा नित्य स्मरणात राहण्यासाठी, नित्य चिंतन अत्यंत आवश्यक आहे. अश्या अनेकानेक कारणासाठी, म्हणजे अर्थातच आत्म लाभासाठी, नित्य ईश्वराच्या स्मरणाची जीवाला आवश्यकता असते.
पण यामधे देहाचे, बुद्धीचे आणि विकार अडथळे निर्माण करण्याचं कार्य करतात. त्या अडथळ्यांमुळे, जीव खूप मोठ्या लाभाला मुकतो. कारण ईश्वरी नामाच्या लहरी प्राप्त करून घेण्याचा अधिकार, या ब्रम्हांडातील चरा चराला आहे. मात्र एखाद्या दुर्जना प्रमाणे, माया, लोभ, इत्यादी आपल्याला परावृत्त करतात. श्रवण, कीर्तन आणि स्मरण हे विशिष्ट प्रकारचे अनेक लाभ माणसाला प्राप्त करून देतात.
पण देह आणि देहाचे विकार जीवाला अनेक चांगल्या गोष्टींपासून वंचित करतात आणि त्याच वेळेस अनेक वाईट गोष्टी करवून घेतात. पण यावर भक्ती मार्गातील पुढील पायरी कशी उपयोगी येते, यावर, उद्याच्या भागात चिंतन करूया.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१४/१२/२०२२
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment