अध्यात्म विराम ६८
अहं हा जेंव्हा सूक्ष्मातून स्थुलात आकाराला येतो, तेंव्हा त्याचा आकार प्रकट होऊन येतो आणि त्याला आपलं अस्तित्व सापडत. या अहं ला हा आकार आत्मा देहात आल्यावर मन,बुद्धी आणि देह यात प्रकट होतो. म्हणजे आत्मा देह धारण करण्यासाठी जेंव्हा चैतन्यावस्थेत असतो, तेंव्हा हा अप्रकट स्वरूपात अर्थात निर्गुण रुपात असतो. देह धरणे नंतर त्या आत्म्याला त्या देहाची ओळख प्राप्त होते. ही ओळख प्राधान्याने देहाची असते, त्यामुळे देहरूपात, मन व बुद्धी स्वरूपात तो कर्म मार्गातून प्रकटतो.
या प्रकटण्यातून त्याला आकार प्राप्त होतो आणि तो अहं आकार घेऊन अहंकार होतो. हा आत्म्याच्या शुद्धीकरण प्रक्रियेत सर्वात शेवटी बाहेर जाणारा अवगुण आहे. तो सगुण रुपात दृढ असतोच. पण चैतन्य रुपात निर्गुण समाधीत असतो आणि नष्ट होत नाही. कित्येक साधू पुरुष, महायोगी, तपस्वी, साधक सिद्धी प्राप्त झाल्यावर देखील, त्यांच्या ठायी, हा अहं सुक्ष्मरुपात अस्तित्वात असतो.याला प्रकट व्हायला मनाच्या व बुद्धीच्या अग्नीची आवश्यकता असते. पण हा अग्नी कोणत्याही लहानशा ठिणगीच्या रुपात मनातील केंद्रांना, सूक्ष्म स्पर्श करून, हा अहंकार रूप दाह प्रकट होऊ शकतो.
अनेक मोठमोठे महापुरुष याच्या जाळ्यात अडकून तपोबल गमावण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. अहंकार आणि क्रोध हे दोन जुळे भाऊ आहेत. त्यामुळे एकाला वन्ही लागला की, दुसरा त्या ठिणगी ने आपो आप अग्नी प्राप्त करून जागृत होतो. हा अहं माणसाला चुकीच्या कर्मात आयुष्यभर अडकवून, अंतसमयी, पश्चात्ताप दग्ध व्हायला लावतो. या अहं ची धग विखारी आणि विषारी असते. म्हणून मन व बुद्धी हे दोन चक्षु नित्य आणि निरंतर उघडे असावेत, असं शास्त्र, वेद, पुराणं आणि महात्म्यांच्या चरित्रावरून दिसतं.
इथे फक्त एक स्पष्टी कारण देऊ इच्छितो की, अहं आणि स्वाभिमान यातील अंतर अत्यंत अस्पष्ट आहे. ते ओळखता आला पाहिजे. स्वाभिमान म्हणजे स्वतःच्या आत्मसन्मानाला धक्का लागणं. यातील फरक हा खूप अस्पष्ट असला तरीही, स्वाभिमान दुखावल्या नंतरची कृती ही, अहं प्रकट होणार नाही अशी असावी. म्हणजे ज्या ठिकाणी व ज्या व्यक्ती कडून स्वाभिमान दुखावला गेला असेल, त्या व्यक्ती वा स्थळा पासून आपण दूर निघून जाणं.
हा एकच माध्यम मार्ग हा, यातून सर्वात उत्तम आहे, अशी संत महंत यांची चरित्र, शास्त्र, वेद यांचं सार सांगतं. कारण तुमचा स्वाभिमान दुखावला गेला आहे, ही जाणीव त्या व्यक्तीला होणं महत्वाचं आहे. तुम्ही सांगून त्याची जाणीव जागृत होईल, याची शक्यता त्यावेळी कमी असते. त्यामुळे तसं घडलं नाही, तर आपल्यालाच पुन्हा मनस्ताप होणार व आपला अहं या ठिकाणी जागृत होऊ शकतो. म्हणून याची स्पष्ट रेषा मनात विवेक व विचार स्वरूपात आखून ठेवणं, अत्यंत गरजेचं आहे.
यावर अजूनही आत्मचिंतन आवश्यक आहे म्हणजे अहं किती दुराचारी आणि आत्मघाती आहे, याची जाणीव मनात सूक्ष्मा तील सूक्ष्म केंद्रात ठसली जाईल. तोपर्यंत, ईश्वर रूप निर्गुण शक्तीचं, नित्य स्मरण, अर्चन, पूजन व चिंतन करत राहणं, हा एकच उत्तम आणि प्रशस्त मार्ग आहे.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०७/०१/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment