अध्यात्म विराम ७७
अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते।
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्।।९.२२।।
जो भक्त अनन्य भावाने नित्य त्या एकस्वरुप ईश्वराच्या चिंतनात आपलं देहाचं आणि बुद्धीचं दुःख, दैन्य, भोग, सुख,उपभोग हे सर्व विसरून, त्याच्या उपासनेत नितनित रममाण असतो, त्याबद्दल भगवंत वचन देतात आणि सांगतात की,असे जे नित्याभियुक्त आहेत, त्यांच्या विषयी अत्यंत प्रेमपूर्वक पुढील वचन देतात. पण त्या आधी नित्याभियुक्त म्हणजे काय हे जाणून घेऊ.
या शब्दाचा निश्चित अर्थ असा आहे की,पहिल्या श्लोकात सांगितलेल्या गुणांनी युक्त असे जे आहेत त्यांना म्हणतात नित्याभियुक्त.म्हणजे जे फक्त ईश्वराला अनन्य भावे शरण जाऊन, त्या एकाच स्थानी आपली निष्ठा अखंड राखून, त्या चरणी आपली चित्तवृत्ती वाहून,त्यांनाच आपलं सर्वस्व मानतात आणि आपल्या सर्व चिंता आणि सुख दोन्हींच्या पार जातात, आणि नित्य भगवत चिंतनाची उपासना करतात, ते असतात नित्याभियुक्त.
अश्या नित्याभियुक्त भक्तांपैकी एक म्हणजे स्वतः अर्जुन. जो ईश्वराचा सखा होता आणि ईश्वर त्याचा सखा. ही सख्य भक्ती या अनन्यतेनेच साध्य होते. ती अनन्यता अर्जूनाकडे होती. कारण त्याने आपले सर्व भाव, त्या एका कृष्ण चरणी वाहून, मात्र आपलं निज कर्तव्य करण्याचं कर्म करून, आपलं हित व अहित हे सर्व पूर्ण आयुष्यभर, क्षणोक्षण, नित्य त्या कृष्णरुप इश्वरावर सोपवून, त्या ईश्वराला आपला श्वास मानलं.
ही नित्याभियुक्तता जी भगवंतांना अभिप्रेत आहे, ती अर्जुनाकडे होती. किंबहुना आपल्या आयुष्यातील एकही क्षण अर्जुनाने स्वतःचा, स्वतःच्या हित अहित यांचा, क्षेम कुशल यांचा विचार केला नाही.जीवनातील सर्वात सुखाच्या किंवा सर्वात भोगांच्या व दुःखाच्या काळातही, अर्जुनाला आपला सखा असलेल्या ईश्वरावर पूर्ण विश्वास, श्रद्धा आणि भरवसा होता. आपलं ध्येय व साध्य हे साधण्याचं कर्म करताना, त्यात कोणत्याही प्रकारची उणीव, कमतरता, कसूर राहणार नाही, इतकचं पाहण्याचं, त्याचं कर्म तो करत होता.
पण मनामधे, आत्म्याला हे ठाम माहीत होतं की, आपलं क्षेम कुशल, आपला सखा श्रीकृष्ण याच्यावर सोपवल्या नंतर, पुन्हा आपल्याला आपल्या क्षेम कुशल याची चिंता स्वतः वाहण्याची आवश्यकता नाही. याच वृत्तीला, विश्वासाला आणि नियंत्यावर सर्व सोपवून आपण फक्त त्याचं स्मरण करण्याचं कर्म आणि कर्तव्य करत राहणं, याला नित्याभियुक्तता म्हटलं गेलं आहे इतकचं करणं भक्ताच्या दृष्टीने श्रेयस्कर आहे. किंबहुना आपण तितका ठाम विश्वास त्याच्यावर ठेवल्यानंतर जे घडेल ते त्याच्या इच्छेने, प्रेरणेने घडेल, हे जाणल व मानलं पाहिजे.
त्याचप्रमाणे, घडलेले सर्व, घडणारे सर्व, हे अंतिमतः आपल्या हिताचेच घडेल, यावर सुद्धा आपला ठाम विश्वास असावा. याच विचार, वृत्ती व कृतीला नित्याभियुक्तता, असं स्वतः भगवंतांनी संबोधलं आहे. अश्या नित्याभियुक्त जनांच क्षेमकुशल वाहण्याचं वचन ईश्वराने दिलेलं आहे. सख्य भक्तितील या विषया संदर्भात आपण अजून सखोल ज्ञान प्राप्ती पुढील चिंतनात करून घेऊया. कारण सख्य हे एकतर्फी असतं नाही आणि क्षेम कुशल किंवा ईश्वर प्रणित योगक्षेम म्हणजे नक्की काय, यावर आलं उद्याच्या भागात, पुढे चिंतन करूया.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१६/०१/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment