अध्यात्म विराम ८९
दास्य हे आपल्या मनाच्या अवस्थेतून समोरच्या पर्यंत पोचतं. किंबहुना, मनात जर दास्य वृत्तीची भावना नसेल, तर माणसाची कृती ही, एक उपचार होते. असा उपचार कोणत्याही कामाचा नाही. कारण त्या कर्मात मन गुंतलेलं नसतं ते कर्म इश्वरापाशी पोचू शकत नाही. प्रपंचातील कर्म, हे देह,बुद्धी, वाचा व मन यांपैकी कोणत्याही मार्गाने केलं तरी,त्याचं फल आपल्याला मिळतं किंवा प्राप्त होतं. पण परमार्थात मनाची गुंतवणूक ही जरुरीची आणि महत्वाची असते. म्हणजेच ईश्वराला खरी, भक्ती, खरी सेवा, खरी वृत्ती आणि दांभिकता यातील भेद त्वरित लक्षात येतो.
याचं कारण ईश्वराने गीतेत सांगून ठेवलं आहे. इंद्रियांमधे मी मन आहे. त्याचा जरा सखोल विचार करूया. मन ही ईश्वराने, मानवी देहात बसवलेली, स्वयंचलित, स्वयंप्रेरीत आणि स्वसंचालित असं इंद्रिय आहे,ज्याची तुलना, संगणक भ्रमणध्वनी किंवा इतर स्वचलित यंत्रांमधील 'चीप:शी करता येईल. संगणक किंवा भ्रमणध्वनी मधील जी छोटीशी चीप सर्व यंत्रणा नियंत्रित करण्यासाठी सक्षम बनवली गेलेली असते. या चीप मधे काहीही बिघाड झाल्यास, संगणक व भ्रमणध्वनी यांच्या कार्यात बाधा येऊ शकते.
त्याचप्रमाणे या मनाची स्थिती आहे.सर्व शरीराचं, सुसूत्रता, नियंत्रण व संचालन करण्याचं सामर्थ्य,या एका मनाच्या चीप मधे असतं. म्हणूनच मनावर लहान वयात घडलेले संस्कार, माणसाला आयुष्यभर, चालण्याची शिदोरी देतात आणि आयुष्यभर मार्गदर्शन करतात. म्हणूनच मन बिघडलेलं असेल तर, सर्व देहाचं, बुद्धीचं आणि वाचेचं कार्य यांवर परिणाम होतो किंवा होऊ शकतो. पण सुसंस्कारित मन देह, बुद्धी व वाचा यांना योग्य कार्याला लावते.
म्हणूनच मनातील भाव आणि भावना थेट इश्वरापर्यंत पोचतात. किंबहुना तोच इश्वरापाशी जाण्याचा खरा राजमार्ग आहे. याच कारणाने श्रवण भक्ती पासून सुरू झालेला हा प्रवास, देहाच्या म्हणजे कर्ण मार्गाने सुरू होऊन, हळूहळू मनाला त्यात गुंतवता आलं पाहिजे. किंबहुना तरच, त्या मार्गात मनाच्या माध्यमातून पुढील पायरीवर जाता येईल. श्रवण, कीर्तन स्मरण इथे देहाचा असलेला सहभाग, पादसेवन पायरीवर मनापर्यंत पोचायला हवा.
त्या पुढील अर्चन, वंदन व दास्य या प्रत्येक पायरी गणिक, ईश्वराकडे जाणारा प्रत्येक भक्ती मार्ग मनाला अधिक अधिक इश्वरापाशी घेऊन जाणारा असावा. मूलतः दास्य भक्ती ही मनाला लीन, शरणागत आणि दृढतेने, भक्तीत रममाण ठेवणारी असावी. दास्य भक्तीवर मागे आपण काही लेखात चिंतन केलं आहे. दासाचं सर्वात योग्य लक्षण म्हणजे, दृष्टी चरणी आणि मन सेवाधर्मी लीन असावं.
याच दास्यत्वाच्या लक्षणात ईश्वरी भक्तीच खरं मर्म सामावलेलं आहे. खरा भक्त हा ईश्वराचा दास असल्याचे भाव व भावना मनात रुजवेल, तर त्यातून आपल्या स्वामींकडे काही मागण्याची इच्छाच मनात येणार नाही. कारण खऱ्या दास्यवृत्तीत स्वामी कडून अपेक्षा हा भावच शिल्लक नसतो. म्हणजे काही मागण्याचा आणि देण्याचा, असे दोन्ही भाव शून्यावर आलेले असावेत. अर्थात त्यासाठी काही गोष्टी, बंधनं आणि मर्यादा प
पालन करणं आवश्यक असतं.
यावर उद्याच्या भागात चिंतन करूया. तोपर्यंत या ईश्वराच्या आराधनेच्या मार्गात वाटचाल करतच राहूया, नामामार्गाने.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२८/०१/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment