अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १
इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.
हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले."
रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांचा मुक्काम रात्री लंकेतील सुवेल पर्वतावर एका पर्णकुटीत होता. जिथे चारही बाजूंनी हनुमान आणि विभीषण यांच्या देखरेखीखाली पहारा होता. चारही बाजूंनी प्रहरी आणि स्वतः हनुमान व विभीषण यांचा पहारा होता. प्रत्यक्ष काळाला देखील आत जाणं अशक्य होतं. रावणाच्या या कारस्थानाची कल्पना विभीषणाला त्याच्या गुप्तचरांनी दिली आहे. हे कारस्थान समजल्यापासून विभीषण चिंतेत पडले आहेत.
पहाऱ्याची व्यवस्था पाहून, अहिरावण, विभीषण रुपात कुटीत प्रवेश करता झाला. आत गेल्याबरोबर त्याने मायेने आतल्याआत श्रीरामलक्ष्मण यांना संमोहित करून पाताळात नेलं, जिथे महिरावण मार्गात त्याच्या प्रतीक्षेत होता. त्वरित दोघांनाही पाताळात नेऊन देवी कामाक्षीला बळी देण्याचं ठरवलं. इकडे बराचवेळ विभीषण बाहेर येत नाही हे पाहून हनुमंत कुटीत गेले आणि पाहताट तर श्रीरामलक्ष्मण कुटीत नाहीत हे पाहून हनुमंत त्वरित बाहेर येतात . विभीषणांना घडलेला प्रकार लक्षात येतो.
ते हनुमंताला म्हणाले
"अहिरावणाने माझ्या रुपात येऊन श्रीरामलक्ष्मण यांना त्यांच्या राज्यात पाताळात नेलं असणार. तिथे जाणं अत्यंत कठीण आहे"
यावर हनुमंत म्हणाले
" हे महाराज विभीषण, श्रीरामांच्या कृपाशीर्वादाने त्रिखंडात काहीही अशक्य नाही, प्रभुभक्ताला. आपण मला योग्य मार्गदर्शन करावं प्रभू माझ्याकडून हे कार्य करवून घेतील. आपण निश्चिन्त असावं."
हनुमंताच्या या भक्ती आणि विनम्रतेच्या परिसीमेला पाहून साश्रू नयनांनी महाराज विभीषण म्हणतात.
"हे हनुमान तुझ्या भक्तीकडे पाहून नतमस्तक झालो मी. तुझ्या हातून अशक्य असं काहीही नाही हे जाणलंय मी. ऐक तर, पाताळात जाण्याचा मार्ग अत्यंत कठीण आणि दीर्घ आहे. अर्थातच तुला विनविलंब निघावे लागेल. कारण माझ्या माहितीप्रमाणे, अहिरावण आणि महिरावण श्रीरामलक्ष्मण याना श्रीकामाक्षी देवीला बळी देण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुझ्याकडे उपलब्ध समय अत्यंत कमी आहे आणि लक्ष्मण प्राणदाता असल्याकारणाने तू हे कार्य शीघ्र गतीने करशील हा माझाही दृढ विश्वास आहे. श्रीराम तुला या कार्यात यश देवोत. परंतु जाताना तू रूप पालटून पक्षीरूपात जा. यशस्वी भव. "
हनुमंत महाराज विभीषणांना आणि महाराज सुग्रीव यांना प्रणिपात करून पाताळाकडे प्रयाण करतात. ते एका पक्ष्याचं रूप धारण करून पाताळाच्या दिशेने वायूवेगात निघतात. पाताळात पोचल्यावर एके ठिकाणी एक कपोत कपोतीची जोडी बसलेली असते, ज्याचा संवाद हनुमंताच्या कानी येतो. कपोत कपोतील सांगत असतो कि,
भल्या पहाटे अहिरावण आणि महिरावण श्रीरामलक्ष्मण यांना कामाक्षी देवीपुढे बळी देणार आहेत."
हनुमंत ते ऐकून शीघ्र गतीने पातळीराज अहिरावण व महिरावण यांच्या राजप्रासादाच्या दिशेने निघतात. प्रवेशद्वारावर एक विचित्र प्राणी पहारा देत असतो. त्याच अर्ध शरीर वानराच आणि अर्ध जलचराचं असतं . हनुमंत त्याला म्हणतात.
"मला अहिरावण आणि महिरावण यांनी पळवून आणलेल्या श्रीरामलक्ष्मण यांना सोडवून न्यावयाचे आहे. त्यासाठी मी येथे आलो आहे. परंतु तू कोण आहेस आणि येथे काय करत आहेस."
तो प्राणी म्हणतो.
"मी मकरध्वज , मी हनुमानपुत्र आहे. मी अहिरावण आणि महिरावण यांचा सेवक आहे आणि तुम्हाला माझ्याशी युद्ध करून मला परास्त करूनच पुढे जाता येईल."
आश्चर्ययुक्त भावात हनुमंत मक्रध्वजाचं आव्हान स्वीकारतात. दोघांच्यात तुंबळ द्वंद्व होतं . अर्थातच हनुमंताच्या शक्तीपुढे मकरध्वज उणा पडतो आणि हनुमंत त्याला परास्त करतात. परास्त झाल्या पश्चात मकरध्वज हनुमंतांचे चरणस्पर्श करून पृच्छा करतो कि
" हे महावीर बलवान, आपण कोण"
हनुमंत वदतात.
" हे मकरध्वज मीच तो श्रीरामभक्त हनुमान. परंतु मी ब्रह्मचारी असताना तू माझा पुत्र कसा."
मकरध्वज सांगतो.
"हे पिताश्री, लंकादहनानंतर आपण आपल्या पुच्छास लागलेला अग्नी सागरात विझवण्यासाठी आलात त्यावेळी आपल्या शरीरावरील घर्मबिंदु सागरात पडला. जो, त्याचसमयी तिथे भक्ष्य मिळवण्यासाठी आलेल्या माझ्या मातेने अर्थात एका मकर मादीने तो घर्मबिंदु प्राशन केला. त्या एका घर्मबिंदूतील आपल्या अमूल्य तेजाने तिने गर्भ धारण केला आणि माझा जन्म झाला. परंतु आपल्याशी द्वंद्व केल्याचा पश्चाताप होत आहे. कारण मी आपल्याला जाणत नव्हतो. याकारणे आपण मला क्षमा करावी."
"हे पुत्रा , तुझ्या युद्ध कौशल्याने मी अतिप्रसन्न झालो आहे आणि क्षमेचा प्रश्नच येत नाही, कारण अजाणतेपणी घडलेली कोणतीही कृती क्षमेस पात्र आहे. तू जाणले असतेस तर नक्कीच माझ्याशी द्वंद्व केले नसतेस. अतः तू संकोच बाळगू नकोस. परंतु आता अतिशीघ्रतेने मला माझ्या स्वामींच्या सुटकेचे प्रयत्न करणं गरजेचं आहे."
"पिताश्री आपण निश्चिन्त असा. आपल्या या कार्यात मी आपलं पूर्ण सहकार्य करिन. मलाही आपल्या सहभागी करून घ्या. "
हनुमंत मक्रध्वजास म्हणाला.
"त्यांनी स्वामींना कुठे ठेवलं आहे आणि त्यांची काय मनीषा आहे, तुला माहित आहे का."
"होय, त्यांनी दोघांनाही श्रीकामाक्षीदेवीच्या मंदिरासमीप नेलं आहे आणि तेथेच त्या दोघांना बळी देण्याचा त्यांचा मानस आहे. आपण कामाक्षी देवीच्या मंदिरात जाऊन प्रतीक्षा करावी. त्यांच्या आगमनाआधी आपण श्री कामाक्षीदेवीचं रूप धारण करून त्यांना सांगा कि मंदिराचं गवाक्ष उघडू नये. तेथूनच श्रीरामलक्ष्मण यांना मंदिरात बळीसाठी पाठवावे. यायोगे आपल्या हाती ते सुखरूप येतील आणि पुढील कार्य करण्यास आपल्याला समय मिळेल. "
पुत्राच्या या कथनानंतर हनुमंतांनी त्याला आलिंगन दिले आणि येथेच प्रतीक्षा कर असे सांगून आपण मंदिरात प्रवेश करते झाले.
क्रमशः
भाग १ समाप्त
संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले.
०७/०५/२०२०
Comments
Post a Comment