अध्यात्म विराम १८
म्हणून ते ज्ञान व श्रवण केलेलं सारं, मन आणि आत्मा शुद्ध असेपर्यंत, मनात, आत्म्या जवळ तसच्या तसं टिकून राहतं. जसजशी हि शुद्धता, प्रापंचिक, भौतिक ज्ञानाने गडद होत जाते, तसतशी या शुद्ध ज्ञानावर अशुद्धीची पुटं चढत जातात. यावर उपाय काय किंवा कश्याप्रकारे ही शुद्धता पुन्हा प्राप्त करता येऊ शकते, यावर चर्चा करूया.
आत्म्याचं शुद्धस्वरुप गर्भात जसच्या तसं मूळ स्वरूपात असतं. याचा प्रत्यय, अनेक उदाहरणं देऊन सांगता येईल. तशी एक दोन उदाहरणं, आपण आधीच्या भागांमधे पाहिली आहेत. ही शुद्धता आणि सात्विकता, तशीच टिकून राहणं, हे खूप कठीण काम आहे. पूर्वीच्या जीवन पद्धतीमधे, ही शुद्धता टिकून राहणारं वातावरण, अस्तित्वात होतं. लोकं संसारी असूनही, धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थ पालना बाहेर अन्य हेतू व उद्देश मनात धरून, काहीही करत नसत.
किंबहुना तशा गोष्टींसाठी पोषक वातावरण, समाज व्यवस्था, कर्म इत्यादी काळाच्या ओघात हळूहळू विरळ होत गेलं आहे. आज अनेक प्रकारची प्रलोभनं, दूषित व कलूषित मनं हे आज सभोवती आहे. गेल्या काही शतकात ही स्थिती उभी राहिली आहे. पण ईश्वराने निर्माण केलेली भक्ती व्यवस्था ही कालातीत आहे.
सर्वसामान्य जनांना सहजी आत्मसात करून, जीवन पद्धतीत कोणताही बदल न करता, प्राप्त करता येते. ही किमया या भक्ती मार्गातील पहिल्या मार्गाची अर्थात श्रवण मार्गाची आहे. ईश्वराच्या नामाच्या मात्र श्रवणाने, हीच शुद्धता, सात्विकता प्राप्त होऊ शकते. अर्थात ती निर्हेतुक असेल तरच. पण ते काळाच्या ओघात साध्य करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करत गेल्यास, मानव आपल्या या जन्मात, आत्म्याच्या शुद्धतेसाठी पुढील जन्मांची सोय करून ठेवता येते.
पण ईश्वराला अपेक्षित असलेली श्रवण प्रक्रिया, खरतर या देहातील नसून, देहाआतील मन आणि आत्मा यांचा मेळ साधून, ईश्वर नाम, मनाच्या श्रुतीनी, ऐकून, चित्त शुद्धता साधण्यासाठी आहे. या देहाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, अनेक इंद्रियांची निर्मिती, ईश्वराने खुबीने केलेली आहे. त्यांचा विचार फक्त आणि फक्त देह चालण्यासाठी नसून, देह जिवंत ठेवून,त्याद्वारे, ईश्वराला अपेक्षित, भक्तीचा मार्ग क्रमत जाणं, हे खरं जीवन आहे.
पण हे आदर्श वाटणारं जीवन, प्रत्येक जीव वा देहधारी जगू शकेल हे शक्य नाही. किंबहुना, ईश्वर सुद्धा हे जाणतोच की, प्रत्येक जीव, स्वतंत्र विचार, मन, देह, देहाचे विकार, उपाधी हे धारण करून, जीवन कंठत असल्यामुळे आणि हे जगाच्या रहाटगाडग्यात असच सुरू राहणार असल्यामुळे, ईश्वर भक्तीचा आणि प्राप्तीचा मार्ग, काळानुरूप अधिक बिकट होत जाणार.
मग अशी काय व्यवस्था ईश्वराने निर्माण केली आहे, ज्या योगे, जीव ईश्वर निर्मित भक्तीचा मार्ग अवलंबू शकतो, यावर पुढील भागात विचार करूया.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१८/११/२०२२
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment