अध्यात्म विराम ६५
दास आणि दास्यत्व म्हणजे स्वामी आणि स्वामीसेवक हे नातं नसतं, तर हा ऋणानुबंध असतो. याचं कारण सुद्धा तसच आहे. दास म्हंटल्यावर काल सांगितलं त्याप्रमाणे, श्रीहनुमंत ज्याप्रमाणे स्मरणात येतो. त्याचप्रमाणे दुसरं नाव स्मरणात येतं ते म्हणजे श्रीसमर्थ रामदास स्वामी. दास्य भक्तीची या दोन अलौकिक आणि अद्वितीय मूर्ती आहेत. श्रीसमर्थ रामदास स्वामी हे हनुमंताचे अंशावतार मानले जातात.
त्याचं कारण सुद्धा तसंच आहे. ज्यावेळी प्रभू रामचंद्र यांनी, हनुमंताला कलियुग अंतापर्यंत चिरंजीवीत्व बहाल केलं, तेंव्हा अवतार समाप्तीला प्रभूंनी हनुमंताला कर्तव्य दिलं की, सृष्टीत ज्या ज्यावेळी भगवत भक्तीचा दुष्काळ येईल, धर्मावर आरिष्ट येईल व ज्या ज्यावेळी अधर्माची सावली, धर्माला ग्रासण्यास सिद्ध होईल, त्या त्यावेळी तू त्या भक्तीची पुनर्स्थापना करून, भक्ती मार्गी जनांना अभय प्रदान करून आणि सन्मार्गा वर चालण्यासाठी आदर्श घालून देशील. यासाठीच ज्या ज्यावेळी भुलोकी देहधारणा आवश्यक आहे, त्या त्यावेळी देह धारण करून ते कार्य तू पार पाडशील. म्हणून अधर्म बलवान होताना दिसेल आणि त्यावेळी त्याला नामोहरम करून, धर्मध्वजा स्थापित करणारा येईल, तो हनुमंत अंश जाणावा.
दास आणि स्वामी हे या विश्वातील अलौकिक आणि खरंतर सर्वात प्रथम आणि नैसर्गिक नातं आहे. याचं कारण म्हणजे परम आत्म्यातून अंश रुपात आत्मा या भूलोकी आला, त्याचवेळी भक्त आणि भगवंत हे आणि त्याचबरोबर स्वामी आणि दास हे नातं, विश्वात सर्वप्रथम निर्माण झालं. बाकी सर्व नाती आणि रीती त्यानंतर, पृथ्वीवर, मानवाने निर्माण केल्या.
स्वामी आणि दास, हे अलौकिक प्रेमाचं आणि स्नेहपूर्ण संबंध असलेलं अद्भुत नातं आहे. खरंतर ऋणानुबंध हा शब्द या नात्याला एकदम चपखल बसतो. याचं कारण म्हणजे, स्वामीची सेवा व भक्ती करून, भक्त भगवंताला आपल्या ऋणात बांधून ठेवतो. त्याबद्दल स्वामी भक्ताला आपल्या हृदयात स्थान देऊन, त्याचं सर्व क्षेमकुशल करण्याचा भार, आपल्यावर घेतो. म्हणजे भक्ताला आपल्या अनन्य कृपेच्या ऋणात बद्ध करून घेतो.
बरं ही बद्धता, एखादी बेडी नसते. तर हा हवीहवीशी वाटणारी आणि या ऋणाचा भार न वाटता, स्नेहपुर्ण अजोड आणि अतूट बंध निर्माण करणारी बद्धता आहे. या बंधात बद्ध होऊ शकणारा भक्त, सर्वात भाग्यवंत समजला जातो. कारण या बद्धतेत मुक्ततेचा मार्ग आपो आप जीवाला, जीवनाच्या अंतिम उद्देशाकडे घेऊन जातो. त्यानंतरच्या प्रत्येक जन्मात, स्वामी आपल्या दासाला, त्या उद्देशाकडे घेऊन जाण्यासाठी, प्राप्त असेल ते सर्व कळत नकळत घडवत जातो.
दास्यभक्ती बद्दल अजून सविस्तर चिंतन करूया. उद्याच्या भागात.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०४/०१/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment