अध्यात्म विराम ४६
श्रवण, कीर्तन आणि स्मरण या सहजसाध्य मार्गांनी, सर्व सामान्य माणसं, आपला अध्यात्मिक विकास साधतील, हा ईश्वर मान्य भक्तिमार्ग असला तरीही, देहाचे भोग, उपभोग, विकार व विखार, माया,हे सर्व देहाच्या माध्यमा तून जीवाशी खेळ खेळतात आणि काळ या सर्वांचा साक्षी असतो. तो क्षण क्षण आपला फास प्रत्येक जीवा भोवती आवळत जातो. हा फास प्रत्येक जीवाला दंभ, अहंकार, मिथ्या अभिमान, अहंगंड या विकृत विवरात फिरवत ठेवतो.
याचे नित्य शिकार होत, प्रत्येक जीव, आपल्याच अहिता कडे, स्वतःला घेऊन जातो. या अहितकारक मार्गाकडून हितकारक, उद्देशिय मार्गाकडे जाण्याची बुद्धी जीवाला, ईश्वर नामाच्या श्रवण, कीर्तन व स्मरण यातून येत जाते. पण क्षण क्षण या बुद्धीवर, प्रापंचिक कर्म, षड विकारी व्यवधान, माया,मोह याची पुटं, त्या शुद्ध मन, बुद्धी, विचार यांवर चढत जातात. ही नित्य साठणारी पुटं, नित्य साफ करून, मनाला नित्य अशुद्धतेकडून, शुद्धतेकडे नेत राहणं, हे प्रत्येक जिवाचं कर्तव्य आहे.
किंबहुना हे शुद्धीकार्य नित्य करत राहण्यासाठी, मन हे निर्गुण निराकार इंद्रिय, जगत पतीने घडवून मानवाच्या देहात, सर्वत्र त्याचा संचार राहील, हे पाहिलं आहे. या मनाचा हा संचार, त्याच्या लवचिकतेमुळे, सहजी शक्य आहे. पण अहं व स्व इतका घट्ट, आग्रही आणि कर्मठ असतो की, तो या मनाला, लवचिकतेकडून, निष्ठुरतेकडे म्हणजेच तरलते कडून जडत्वा कडे नेतो. हे मनाचे जडत्व, माणूस अनेक कारणांनी, मनावर आच्छादन म्हणून लपेटून घेतो.
या आच्छादनामुळे माणूस, चित्त शुद्धीच्या मार्गांना, क्षणांना मुकतो. या सर्वांचं महत्व अंत समय येताना, प्रत्येक जीवाला जाणवत. कारण त्यावेळी, देहाबाहेर जाणारा आत्मा, पूर्ण जागृत अवस्थेला येतो. तोपर्यंत बुद्धीच्या, देहाच्या, मनाच्या अभिमान, अहं, दंभ या शत्रूंनी, त्या आत्मतत्वाचा ताबा घेतलेला असतो. अंत समय आला की, हे सर्व विकार, शत्रू, यांना तो ताबा सोडवा लागतो आणि प्रत्येक जीवाला काही क्षणांची आत्मजागृती होते.
म्हणूनच बहुतेक जीव, त्या शेवटच्या क्षणात, आपण आयुष्यभर केलेल्या चुका, घात, अपराध, प्रमाद यांना आठवून विषाद, खेद व दुःख यांचाच अनुभव घेतात. त्यातील काही प्रसंग इतके जिव्हारी असतात, की होणारा पश्चात्ताप, हा आत्मशुद्धी करण्यास असमर्थ असतो. कारण पश्चात्ताप दग्ध जीव, हे घर सोडून जात असतो. त्याला परिमार्जन करण्यासाठी समय मिळतच नाही.
हे सर्व वेळीच ओळखून, आपण जीवाला, योग्य त्या शुद्धीकरण प्रक्रियेत घेऊन जाणं, हे प्रत्येक जीवाच नीज कर्तव्य आहे. यावर उद्याच्या भागात चिंतन करूया.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१६/१२/२०२२
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment