अध्यात्म विराम ४८
अविरत फिरत असलेल्या मनाला नियंत्रित करण्याचे दोनच उपाय आहेत. एक त्याला शांत करत करत स्थिर करत, योगातून, त्या मनाला एकाग्र करत जाऊन, त्याला जड जगतापासून दूर करण्याचा खडतर अभ्यास करत जाणं. पण हे सर्वांना शक्य होईलच असं नाही. पण मग सर्वसामान्य माणसांना, अर्थात जगतातील बहुतांश जनांना, मनाच्या अस्थिरतेला नियंत्रित करता येणं शक्य नाही का.
तर त्याचं उत्तर आहे, शक्य आहे. ज्यासाठी ईश्वराने, भक्तीच्या मार्गातील, चतुर्थ पायरी म्हणजे पादसेवन, ही अनोखी पायरी निर्माण करून, विश्वावर अनंत उपकार केले आहेत. पादसेवन याचा सर्वात प्राथमिक अर्थ, भगवंताच्या चरणी लीन होऊन, त्याला पूर्ण शरणागत होणं. मनाला पूर्ण एका ईश्वराच्या चरणी वाहून, आपल मन त्या स्थानी स्थिर करणं, म्हणजे पादसेवन. शब्दशः याचा अर्थ, एका ईश्वराच्या चरणी नतमस्तक होत, त्या पावलांची सेवा करून, त्याची कृपा प्राप्त करणं.
आता याच्या सखोल अर्थाचा मागोवा घेऊया. मन हे असं इंद्रिय आहे की, जे कधीही एका जागी स्थिर रहात नाही आणि तसं करू गेल्यास अजूनच उसळी मारून, अशांत व अस्थिर होतं. पण त्याच मनाचा एक गुण आहे, त्याला एखाद्या स्थानी लीन वा अर्पण किंवा शरण किंवा शून्य केल्यास, तेच मन एका उन्मनी अवस्थेला पोचतं. अश्या अवस्थेत मन, इतर प्रलोभन,मोह,लोभ,माया यासारखे षडरिपु, यांच्या पाषात अडकत नाही. त्यासाठी ही पूर्ण शरणागती अत्यंत आवश्यक आहे.
याचं मुख्य सूत्र, जे मनाला समजावून सांगणं अत्यंत आवश्यक आहे ते म्हणजे, ही शरणागती, लीनता, नम्रता, संपूर्ण समर्पण हे मनाच्या आतल्या म्हणजे सुप्त कप्प्यातून हे असावं. कारण मनाच्या या स्थिरते नुसार बुद्धी, वाचा, देह यांच्या स्थिती नियंत्रित होतील. काया, वाचा, बुद्धी व मन या चारही अक्षांना एकत्रित बांधून स्थिर करणं, हाच ईश्वरी उद्देश, साध्य आणि तेच जिवाचं ध्येय आहे.
अजून एका तर्काला मनात स्थिर केल्यास, पादसेवन या ईश्वरी उद्देशाला प्राप्त करता येईल. पाद अर्थात चरण आणि सेवन म्हणजे त्यांच्या सेवेचा लाभ प्राप्त करणं. मनाला आपल्याहून श्रेष्ठ अश्या शक्तीपुढे, लीन होण, समर्पित होणं, हे त्या मनाला शांत करतं. कारण सर्व चराचराचा नियंता जो ईश्वर, तोच या मनाच्या कर्ता आणि स्थिरतेचा बिंदू आहे. त्या बिंदूवर मन तेंव्हाच स्थिर होईल, जेंव्हा ते मन त्या सर्वश्रेष्ठ बिंदूला आपला ग, स्व, दुराभिमान, दंभ, दुराग्रह, दुस्थिती, दुर्मती यांना पूर्ण समर्पित करेल.
समर्पणाच्या या मार्गावर काय काय करावे लागते किंवा त्याची काय काय वैशिष्ट्ये आहेत आणि ते साध्य कसं करावं, यावर उद्याच्या भागात चिंतन करूया. तोपर्यंत, सर्वेसर्वा ईश्वर, याच्या विचारांचं श्रवण व स्मरण करूया.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१८/१२/२०२२
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment