अध्यात्म विराम २८
आता या संसारातून मार्ग काढून, मूळ उद्देशानुसार आपल्या आत्म्याला, ईश्वर प्राप्तीच्या मार्गाकडे नेण हे, अनेक जन्माच्या कर्मगतीमुळे, दुष्प्राप्य असत. कारण नुसतं इश्वरावर व ईश्वरी व्यवस्थेवर विश्वास ठेवायला सुद्धा ईश्वरी कृपा लागते. ती ज्यांच्या लेखी किंवा भाग्यात लिहिलेली नसते,त्यांना देव, ईश्वर, श्रद्धा, भक्ती, विश्वास या सर्व गोष्टी, अशक्य, अबोध आणि कपोल कल्पित भासतात.
यामधे त्यांच्या कर्मासंगतीचाच दोष आहे. कारण बुद्धी तशी होणं, मनाला ते पटणं आणि मन बुद्धी, देह यांचा समन्वय साधून, त्यासाठीची कृती वा कर्म आपल्या हातून घडणं, हे पूर्णपणे आपल्याच कर्माधीन आहे. कारण ईश्वरी कृपा प्राप्ती, ही सुद्धा, आपल्याच कर्माधीन आहे. कर्माने आपल्या लेखी आपण थोडीफार सद्बुद्धी, सद्वृत्ती आणि सदाचार लिहून ठेवला असेल, तरच ईश्वरीकृपेने, त्या पुण्याचा तो भाग योग्यवेळी आपल्याच कार्याला आणि उपयोगी येतो.
पण हा योग जुळून यायला, आपल्या भाग्यात वा कर्मात आपण तो जोडून ठेवणं महत्वाचं आहे. हे घडण्यासाठी काहीही मार्ग उपलब्ध नसेल तर, प्राणी विचार कसा करू शकेल किंवा हे कसं जमेल.कारण बुद्धी होणं,योग जुळण हे पुन्हा कर्माधींन आहे,असं विधीच विधान आहे म्हणजे सृष्टी कर्त्याचा नियम आहे. नियमाबाहेर तो ईश्वर स्वतःही जात नाही.
पण त्याच ईश्वराने, श्रवण भक्ती हा एक अत्यंत सुलभ सहजसाध्य राजमार्ग आखून दिला. इतके भाग याबद्दल प्रदीर्घ चिंतन करून झाल्यावर,आता याच भक्ती मार्गाचा विस्ताराने विचार करूया. एखादा ध्वनी कानी पडल्यावर त्याचा स्वर, शब्द, नाद यांचा बोध आधी बुद्धीला, नंतर मनाला होतो. माणसाच्या किंवा प्राण्याच्या बुद्धीच्या क्षमतेनुसार व पात्रतेनुसार त्याला त्याचा बोध होणार.
याची जाण किंवा समज, थोड्या फार प्रमाणात, सर्व प्राणिमात्रांच्या ठायी, ईश्वराने भरून ठेवलेली आहे. उदाहरणार्थ एखादा श्र्वानासम प्राणी, आपल्या मालकाच्या किंवा सर्वसाधारण कोणत्याही परिचयातील व्यक्तीच्या नित्याच्या आवाजावरून, त्याच्या आज्ञा ओळखून व जाणून, त्यानुसार कृती करतो. म्हणजे तशी बुद्धी आणि तेवढी जाण त्याला, त्याचं ईश्वराने, जन्मतः प्रदान केलेली आहे.
म्हणजेच आपल्या बुद्धीने, मनाने व जाणीवेने, व्यावहारिक पातळीवर, श्रवणाचा लाभ वा उपयोग प्रत्येक प्राणी करून घेतो. याचाच अर्थ, व्यवहारात मनुष्य नावाचा प्राणी, सांसारिक व प्रापंचिक गोष्टीत या श्रवण ज्ञानाचा जो उपयोग करून घेतो, ते जगण्यासाठी आवश्यक एक प्राण्यासम कर्म आहे, याहून फार त्याला महत्व आहे किंवा दिलं जावं असं वाटतं नाही. पण याचा ईश्वराला अपेक्षित उपयोग व लाभ कशाप्रकारे, मानवाने करून घ्यावा, यावर उद्याच्या भागात चिंतन करूया.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२८/११/२०२२
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment