अध्यात्म विराम ४५
प्रत्येक व्यक्तीला ईश्वराने अनेक गुणांनी सिद्ध करूनच या विश्वात देहप्रप्ती करण्यासाठी पाठवलेलं असतं. पण या जगतात आणि पंचमहाभूत रूप देहात आल्यावर, देहाचे विकार, माया यांनी तो जीव बद्ध होतो आणि शुद्ध आत्मा हळूहळू अशुद्धित होत जातो. एक उदाहरण घेऊ म्हणजे मुद्दा सर्वांना कळेल.एखादा द्रविभुत साबण अर्थातliquid hand wash हा काही ठराविक प्रकारच्या विषाणू अर्थात virus विरुद्ध प्रभावी असतो, असं आपण जाहिरातींमधून पाहतो.
पण जर त्याला आपण अस्वच्छ भांड्यात काढलं, तर हळूहळू त्याची विषाणू नष्ट करण्याच्या क्षमतेत घट होऊन, अंती तो पूर्ण दूषित व अशुद्ध होईल. त्याच तर्काने, वास्तविक पणे एका शुद्ध देहात पाठवलेला आत्मा, देहातील विकार रूप शत्रूंच्या संगतीत, आपली मूळ शुद्धता गमावून, अशुद्ध होत जातो. श्रवण कीर्तन व ईश्वर स्मरणाने, ही अशुद्धता हळूहळू निवळायला सुरुवात होते. पण तरीही पूर्ण शुद्धता प्राप्त करण्यासाठी जीवाला, इश्वरापुढे संपूर्ण शरणागती आवश्यक आहे.
कारण वृत्तीचा अहंकार, दंभ, स्व आणि मनातला गर्व हे अवगुण जोपर्यंत पूर्ण जात नाहीत, तोपर्यंत स्मरण खऱ्या अर्थाने सार्थ होत नाहीत. मूलतः देहाबरोबर आलेले हे अवगुण, खरतर देहासोबत, आपलं घर समजून राहतात आणि त्यांच्या सहवासाने, मन बुद्धी, जाणीवा, इंद्रिय इत्यादी वाहावत जातात. चुकीची कर्मे होत जातात आणि या जन्मात व पुढील प्रत्येक जन्मात आत्मा देहाच्या माध्यमातून, नित्य, त्या कर्मांची फलं भोगत राहतो.
खरतर हे चक्र ईश्वरी नाम स्मरणात तुटलं पाहिजे. पण माणूस हे ईश्वर नामस्मरण सुद्धा योग्य रित्या करत नाही. किंवा ते करत असतानाच, देहाच्या बाबतीत जास्त आकृष्ट होत असतो. किंवा देहाच्या व प्रपंचाच्यां गरजा अधिक प्राणपणाने जपतो. म्हणूनही ईश्वरी स्मरण पूर्ण कार्य करत नाही.
यावरही दयाळू ईश्वराने भक्ती मार्गाच्या श्रेणीत अजून एक पायरी निर्माण करून, भक्तीच्या मार्गात सहजतेने वावरणाऱ्या सामान्य जनांना उपकृत केलं आहे. श्रवणात आलेलं ईश्वरी नाम, अधिक दृढ व्हावं आणि त्याचा नित्य अभ्यास आणि गोडी लागावी म्हणून, सामुदायिक प्रयत्ना तून, काही साध्य होईल,या उद्देशाने,कीर्तन, भजन प्रवचन इत्यादी मार्गांचा आदर्श स्वतः ईश्वराने घालून दिला आहे.
श्रवण केलेलं आणि कीर्तन, भजन या मार्गाने दृढ झालेलं ईश्वरी नाम, सतत आत्म्याला आनंद देत रहावे म्हणून, त्या निर्गुण निराकार ईश्वराच्या नामाचं स्मरण करत, ते आपल्या मनावर, बुद्धीवर आणि हृदयात विराजित केलं पाहिजे.म्हणून नित्य स्मरण या तिसऱ्या मार्गाची व्यवस्था ईश्वराने घालून दिली. पण तरीही ते नाम आतून येत नाही कारण दंभ, मान, अभिमान आणि अहंकार या चार पायऱ्या माणसाला पुढे जाऊन देत नाहीत. यावर उपाय म्हणून ईश्वराने पुढील पायरीची व्यवस्था निर्माण केली.
ती कोणती गे पुढील भागात पाहूया.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१५/१२/२०२२
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment