Skip to main content

अध्यात्म विराम ८१

अध्यात्म विराम ८१
 
अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते।
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्।।९.२२।।
  
भक्तांच्या हिताचं वहन करणारा ईश्वर, वचनांकित आहे, हे तर स्पष्ट आहे. आपण त्याने आखून दिलेल्या भजन, अर्चन, पूजन, उपासना, स्मरण, शरण यामधे, परिपूर्णता योजली, तर निश्चित त्या भक्ताचं क्षेम कुशल पाहण्याचा, नव्हे वाहण्याचा योग ईश्वर पार पाडेल, यामधे कोणतीही शंका बाळगण्याचं कारण नाही. काल चिंतनात आपण एक शब्द वापरला,ज्यावर आपण म्हटलं की,उद्या सखोल चिंतन करूया. घेऊन जाणे, म्हणजे कोणतीही अपेक्षा न ठेवता कार्य करणे. 

आज यावर विचार करूया. अपेक्षा या शब्दात एक अर्थ ध्वनित होतो. आपण एखाद कार्य, कर्म या बदल्यात काही अपेक्षित करतो, म्हणजे बदल्यात कशाची तरी इच्छा करतो, त्याला अपेक्षा करणे म्हणता येईल. एखादं काम, नोकरी नाकारताना, आपण कारण सुद्धा देतो की, मला अपेक्षित मोबदला किंवा इतर सुविधा अथवा सोयी सवलती व इतर सुविधा यांचं वचन न देण्यात आल्यामुळे, मी ती नोकरी किंवा जबाबदारी नाकारली किंवा स्वीकृत केली नाही किंवा सोडली.

अपेक्षा ही नेहमी, शारीरिक, भौतिकच असेल असं नाही. ती मानसिक सुद्धा असू शकेल. कधी कधी त्याचप्रमाणे एखादी गोष्ट आत्मिक समाधानासाठी सुद्धा केली जाऊ शकते. हे आत्मिक समाधान म्हणजे काय, यावर विचार करूया. एक वडील आपल्या तरुण असलेल्या आणि नुकतीच नोकरीला लागलेल्या मुलाला सांगतात की, तू, या महिन्यापासून, तुझ्या महिन्याच्या पगाराची निम्मी रक्कम, मला द्यायची.मुलगा,काहीही न विचारता,त्या प्रमाणे सुरू करतो. साधारण दोन ते तीन वर्षानंतर, ते त्याला सांगतात की आता तू तुझी स्वतःची जागा घेऊन ठेव. 

तो मुलगा सर्व चौकशी करून, एका छानशा जागेबद्दल माहिती देऊन सांगतो की, या जागेची किंमत इतकी आहे व यापैकी ठराविक रक्कम मला कर्जाऊ मिळू शकेल. पण बाकीची अमुक इतकी रक्कम मला जमवावी लागेल, अशी समस्या आहे. यावर वडील त्याला गुंतवायचे पैसे, त्याच्या हातात देतात. मुलगा आश्चर्याने म्हणतो, बाबा इतकी रक्कम कशी आणि कधी जमा केलीत. त्यावर वडील उत्तर देतात की, तू, गेली तीन चार वर्षे, मला जे पैसे देत होतास, तेच मी गुंतवत गेलो आणि त्यातून व्याजासह, ही रक्कम जमा झाली. म्हणजे ही तुझीच रक्कम आहे. ही माझ्याकडे असलेली तुझीच रक्कम मी तुला सुपूर्द करत आहे. 

मुलगा थक्क होऊन, वडिलांकडे कृतार्थ आणि कृतज्ञ भावाने पाहतो. आता आपण मुद्द्याकडे येऊन विचार करूया. या उदाहरणात वडील त्या मुलाकडून, तीन ते चार वर्ष मागत असलेली रक्कम, ही अपेक्षा नव्हती, तर त्या रकमेला जास्त करून, त्याच मुलाला, पुन्हा परत करण्यासाठी, वडील ती रक्कम मागत होते. 

आता ईश्वर किंवा सद्गुरू आपल्याकडून स्मरण, चिंतन, पूजन, भजन, योग याग,यज्ञ, समिधा, फुलं, गंध, अक्षता, सेवा का मागत असतात, याचा बोध नक्कीच झाला असेल. त्या वडीलां प्रमाणे, आपल्याकडून सर्व काही सेवा पूजा या रुपात का करवून घेतात. यामधे त्यांची स्वतःची, स्वतःसाठी, काहीही अपेक्षा नसते. कारण इश्वरसुद्धा, त्या वडीलांप्रमाणे, कृतार्थ आणि कृतकृत्य असतो. म्हणजेच आपण करत असलेली भक्ती, भाव, ईश्वरी स्मरणाचं कर्म, हा त्या मुलाकडून महिन्याच्या महिन्याला घेतला जाणारा हिस्सा आहे. 

यावर अजूनही चिंतन करणं अपेक्षित आहे, पण ते आपण उद्याच्या भागात करूया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२०/०१/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...