Skip to main content

अध्यात्म विराम ५०

अध्यात्म विराम ५०

पाद सेवन मधील, सेवन शब्दाचं दीर्घ विश्लेषण आपण कालच्या भागात पाहिलं. आता पाद या शब्दाविषयी आपण जरा अभ्यास करूया. पाद याचा शाब्दिक अर्थ चरण किंवा पाय असा होतो. अर्थात ते पाद ईश्वराचे आहेत, हे सर्वश्रुत आहेच. पण त्या पायांची सेवा करून त्या पुण्याचा लाभ प्राप्त करणं, हे सर्व प्राणिमात्रांच्या, विशेषतः मानवाच्या जीवनाचा आणि देहात येण्याचा मुख्य उद्देश आहे. 

आता पाद सेवन करणे, अर्थात त्या चरणांची सेवा करणे, हे भाग्य प्रत्येक प्राणीमात्राला लाभेल हे अगदीच कठीण आहे. पूर्व पुण्याई थोर असेल आणि ईश्वरी कृपेचा झरा प्राप्त झाला असेल, तरच हे शक्य आहे. पण पाद सेवन म्हणजे नुसते चरण स्पर्श करून, त्या चरणांची कृपा प्राप्ती करून घेणं, इतकाच मर्यादित अर्थ यातून ईश्वराला किंवा साधू संत यांना अपेक्षित नाही. 

तर त्या कृपेच्या प्राप्तीसाठी,सतत, सदैव, त्याच्या नामाचा येनकेन प्रकारेण स्मरण घोष करत, त्याच्या ठायी आपली मती, मन आणि हृदय लीन राहील, हे पाहणं. सद्गुरू रुपातील ईश्वरी अंशाची कृपा प्राप्ती, ही या मार्गातील प्रथम पायरी आहे, हे विसरून चालणार नाही. सद्गुरू कृपा हा योग आल्याखेरीज पुढील कोणताही योग, साध्य होऊ शकत नाही. 

कारण एक ध्यानात ठेवा की, पारमार्थिक मार्गात, या जगताच्या,त्रीमितीच्या,भौतिक लोकांच्या पार असलेल्या, अलौकिक, अद्भुत आणि चैतन्यमयी जगताची दृष्टी, मती, श्रुती, स्मृती, गंध, रस, स्पर्श व ज्ञान प्राप्ती होण्या साठी लागणारी जाणिवांचा जागृती व पारलौकिक ज्ञानेंद्रिय प्राप्ती, ही या जगताची दृष्टी, स्मृती, श्रुती, मती, गंध, रस, स्पर्श, यांच्या जाणीवा नष्ट झाल्याशिवाय होऊ शकत नाही. याच ठिकाणी, सद्गुरू परिस स्पर्शाशिवाय अशी प्राप्ती अशक्यप्राय आहे. 

या लोकांतून, पारलौकिक जगतात जाण्यासाठी, अनेक जाणीवा नव्याने जागृत व्हाव्या लागतात आणि अनेक भूतलावरील व भौतिक, देहाच्या, बुद्धीच्या व मनाच्या जाणीवा नष्ट व्हाव्या लागतात. ही प्रक्रिया, सहजतेने घडून येत नाही. त्यासाठी आळीच्या फुलपाखरू होण्या तील प्रक्रियेतून जाणं हे चित्तशुद्धी,आत्मशुद्धी, आत्म जागृती यासाठी प्रत्येक देह, मन व आत्मा यांना क्रमप्राप्त आहे सर्व जड जीवांना या मार्गाने जावेच लागते. 

यासाठीच प्रत्येक भक्ताला ईश्वर चरणी लीन राहण्यासाठी मती, स्व, ग अर्थात गर्व, वृथा अहंकार, अहं,गंड,अश्या अनेक दुर्गुणांचा त्याग करणं,आवश्यकच असतं.हे सहजी शक्य नसतं. अनन्य भावाने त्या सद्गुरू रूप ईश्वराच्या चरणी लीन राहून त्या कृपाप्राप्तीसाठी अर्चना भक्तीचा योग साधावा लागतो. या भक्ती मार्गा तील पाचव्या पायरी पाशी आपण येऊन पोचलो आहोत.त्याचा सखोल विचार आपण उद्याच्या भागात करुया. पण तोपर्यंत ईश्वराच्या व सद्गुरूंच्या नित्य स्मरणांचा ध्यास करत राहूया.  

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२०/१२/२०२२
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...