अध्यात्म विराम २९
मुळात एक विज्ञान समजून घ्या की, ईश्वराने हे जगत लहरींवर आधारित का केलं आणि प्राण्याला लहरींच्या माध्यमातून, श्रवण करण्याची देणगी का दिली. थोडं चिंतन केल्यावर ध्यानात येईल की, इतकी महत्वाची देणगी, ईश्वराने सामान्यतः सर्वच प्राणीमात्रांना देताना, फक्त व्यावहारिक उद्देशच, त्याच्या संकल्पात नसणार, हे नक्की. कारण व्यावहारिक गुंत्यामध्ये देह आणि त्या माध्यमातून जीव अडकतो, हे जरी सत्य असलं तरी, मूळ ईश्वरी उद्देश तो नाही.
यातील श्रवणातून, लहरींच्या माध्यमातून,बुद्धी मन यांना चेतना व प्रेरणा मिळण्याची व्यवस्था करताना, ईश्वरानेच श्रवण भक्तीचा मार्ग योजून दिला. यातील खरी गोम किंवा गुह्य हे आहे की,व्यावहारिक सांसारिक व प्रापंचिक पातळीवर केलेलं श्रवण,हे कर्मफल प्राप्त होतं, ही व्यवस्था केली आहे. पण आध्यात्मिक, पातळीवर, त्याचं ईश्वराने अशी व्यवस्था निर्माण केलेली आहे की, ईश्वरी नामाच्या श्रवण लहरी कानावाटे बुद्धी व मनःपटलाला स्पर्श करताच, कर्माच्या फलांचा समूळ विनाश होतो.
याचं कारण, त्या लहरींची घातक शक्ती, श्रवण कर्त्याच्यां मनातील नकारात्मक शक्ती, वासना, माया, मोह इत्यादी असुरकारक शक्तींचा नाश करतात. त्या लहरी श्रवण कर्त्यासाठी सात्विक असतात, पण परिणाम स्वरूप त्या लहरी, ईश्वरी मार्गाकडे जाण्यास बाध्य असणाऱ्या सर्व नकारात्मक शक्ती व ऊर्जा यांना आणि संचीतात जमा असलेल्या, तश्याच प्रकारच्या शक्तींना, मारक असतात.
म्हणजेच व्यावहारिक पातळीवरील श्रवण लहरी एकांगी किंवा एकच परिणाम साधतात. तो परिणाम कर्म फल कारक असतो,हे या मृत्युलोकीचं सत्य आहे. पण ईश्वराच्या नाम श्रवणाची शक्ती दुहेरी कार्य करते. किंवा दुधारी तलवारी सम असते.
एका बाजूला लहरींची ती शुभकारक शक्ती व ऊर्जा, ईश्वरी मार्गाकडे जाण्यास, श्रवण करणाऱ्याला, प्रेरित करते आणि दुसरीकडे त्या मार्गात जमा होणारे किंवा आधीपासून जमा असलेले, नकार, शड्रीपु , संचयातील पापकर्म यांना नष्ट करून, मार्ग निष्कंटक करते.
हा दुहेरी परिणाम करण्याचं सामर्थ्य, अश्या प्रकारे निर्माण झालेल्या, सर्वच ईश्वरी श्रवण लहरींमध्ये असते. याच दुधारी शक्तीला जाणून, आपल्या पूर्वजांनी अर्थात प्राचीन शास्त्रज्ञ असलेल्या ऋषींनी, मंत्र, स्तोत्र इत्यादी माध्यमातून, इष्ट परिणाम साधणाऱ्या लहरी उत्पन्न होऊन, श्रवण करणाऱ्या सर्वांना, सारखाच दुहेरी लाभ होईल यासाठी अजोड कार्य करून ठेवलेलं आहे, त्या मंत्र, स्तोत्र व ईश्वरी नाम यातून हाच दुहेरी शक्ती परिणाम साध्य होतो.
यावर अजून चिंतन उद्याच्या भागात करूया. तोपर्यंत ईश्वरी नामाच्या श्रवण लहरी, प्राप्त करण्याचा प्रयत्न करत राहूया.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२९/११/२०२२
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment