Skip to main content

अध्यात्म विराम ६३

अध्यात्म विराम ६३

वंदन म्हणजे ईश्वरचरणी पूर्ण शरणागत होणं. वास्तविक हा भाव एक क्षण दृढ झाल्यावर, पुन्हा दुसरा कोणताही दोष त्या शुद्ध भावाची जागा घेऊ शकत नाही.पण आपण पंचमहाभूत रूप लोकात रहात असल्यामुळे, अनेक कारणां मुळे इथे नित्य अशुद्धता येतच असते. ही अशुद्धता भौतिक,ऋणभाराची, विकारांची, अज्ञानाची असू शकते. अशी बाह्य अशुद्धता, अंतरात चित्त अशुद्ध करते. 

ही चित्ताची अशुद्धता, मन, आत्मा, व परम आत्मा यांच्या क्षण एक झालेल्या मनोमिलनात नित्य बाधा उत्पन्न करते. म्हणूनच, एकदा प्राप्त झालेली आनंदाची ती अनुभूती, नित्य प्राप्त करण्यासाठी आपल्याला, नित्य त्या ईश्वर चरणी, नत होऊन शरणागत भावात, वंदन करणं, हे प्रत्येक जिवाचं नित्य कर्म ठरतं. हा वंदन भाव नित्य जागृत राहून, नित्य त्या आनंदाची अनुभूती कशी करू शकतो, हा प्रश्न नक्कीच मनात येतो. पण तसा तो भाव नित्य प्राप्त करण्याचा मार्ग काय आहे, याचा आता सखोल अभ्यास करूया. 

वंदन करताना साधता आलेली एकतानता ही, एक प्रकारे समाधी किंवा ध्यान यांचा क्षणैक अनुभव देते. ज्याने हा योग साधला, त्याला याची कल्पना नक्की येईल. पण ज्याला हा योग साधता आला नाही, त्याने वंदन अर्थात नमस्कार करताना, आपण आपल्या उपास्य देवतेसमोर साक्षात उभे आहोत, हा भाव दृढ करून, आपले दोन्ही हात जोडावे. ते जोडताना मन एकाग्र करण्याचा कोणताही प्रयत्न करू नये. 

त्याऐवजी, आपण आपल्या नित्य आराधनेत आहोत आणि आपल्या ईश्वराला, अर्चन अर्थात पूजन पश्चात, नमन करत आहोत, हे मनात दृढ धरावे. हा विचार मनात आणून, वंदन करावे. काही क्षण किंवा निदान मिनिटभर या स्थितीत स्थिर राहावे. कारण मन स्थिर होण्यासाठी काही क्षणांचा कालावधी नक्कीच लागतो. म्हणून तितके क्षण, मनाला त्या भावात स्थिर अर्थात स्तब्ध करावे. हा भाव मनात स्थिर झाल्यावर,आपण एका दिव्य आनंदाची अनुभूती घेतल्याचा भाव मनात येईल. तो भाव तसा येईपर्यंत, हा अभ्यास करावा.

पण हा आनंद नित्य प्राप्त करण्यासाठी, त्या चरणांशी नित्य स्थिर राहून, आपण त्या ईश्वराचे उपासक आहोत हे न मानता, त्या उपास्याच्या चरणी लीन असलेले, दास आहोत, हा भाव धरावा. कारण खरा दास हा आपल्या आराध्याशी, धन्याशी नित्य प्रामाणिक कृतज्ञ आणि शरणागत असतो. आराध्याच्या नित्य कृपेची कृतज्ञता, त्याला नित्य त्या चरणी बांधून ठेवते. पण तरीही हे बंधन सक्तीचे नसून, आत्म्याचे परमात्याशी असलेले अद्भुत अनुसंधानात्मक बंधन असते. 

अर्थातच हे दास्यत्व, हा शरणागत भाव, ही लीनता भक्ताला, एक दिव्य अनुभूती देते. हा, भक्ती मार्गातील, दास्य भक्ती संज्ञा प्राप्त, सातवा भक्तीचा मार्ग आहे. यावर आता आपण उद्यापासून सखोल चिंतन करूया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०२/०१/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...