अध्यात्म विराम ८७
सर्वव्यापी असलेल्या ईश्वराला मुळातच सद्गुरू तत्वाची निर्मिती का करावीशी वाटली किंवा का करावी लागली, यावर जरा विचार करूया. आपल्या अनंत नेत्र, मन, बुद्धी आणि ध्यान या माध्यमातून,चराचरात सर्वत्र नजर ठेवूनही ध्यानस्थ वा समधिस्थ असलेल्या ईश्वराने,आपल्या प्रत्येक कार्य करण्यासाठी आपल्याच अंशातून,अनेक अंश निर्माण करून, एकप्रकारे कार्य विभागणी केली आहे. ज्याला आजच्या भाषेत खाते वाटप म्हणतात त्या प्रमाणे. यातून कार्याची सुसूत्रता येते आणि प्रत्येक कार्याला वाहिलेल्या त्या त्या स्वरूपाना, मर्यादित किंवा अमर्यादित अधिकार दिले की, त्या कार्यात, परम अंश ईश्वराला पुन्हा लक्ष घालायची आवश्यकता नाही.
या, दिलेल्या मर्यादित अधिकारात, त्या त्या इष्ट देवतेने किंवा ईश्वर प्रतिनिधीने, जर काही आपल्या अधिकारा बाहेर अतिरिक्त प्रदान केले व त्यातून काही,गैर किंवा धर्म,जगत वा जनसामान्य यांच्याबाबत काही अहित कारक, अघटीत किंवा जगताला आघात करणारे काही घडताना दिसले तर, त्याचं परम अशाला, त्यात दखल देऊन, सर्व सुरळीत करून, पुन्हा आपल्या मूळ स्थानी जावे लागते. या प्रक्रियेसाठी सर्वसाधारण प्रत्येक युगात एकेक वेळा तरी, ईश्वराला यावेच लागते.
तरीही साधारण विचार केला तर, इतर वेळी, जेंव्हा जसं संकट, सावट, प्रश्न, समस्या असेल त्यानुसार आपला अंश प्रतिनिधी पाठवून, काही प्रमाणात गाडी रुळावर आणण्याची व्यवस्था, याचं परम ईश्वराने निर्माण केलेली आहे, हे इतिहास, पुराणं यांची पडताळणी केल्यास, लक्षात येत. पण हा झाला काही चुकीचं,धर्मबाह्य घडल्या नंतरचा प्रश्न. पण विधात्याचा,जगत रचनेचा आणि मानव निर्मितीचा मूळ उद्देश, या जगतातून, मानवी देहातील अद्भुत रचनेचा सदुपयोग करून, मानवाने आत्मज्ञान प्राप्तीच्या मार्गाकडे जावे आणि त्यातून त्या परम ईश्वरी अंशाकडे पुन्हा जाण्याचा मार्ग अनेक जीवांना मिळावा आणि त्यांनी तो योग साधून मज पर्यंत यावे, हा आहे.
मार्ग मिळणं, त्यासाठी काहीतरी करणं आणि चुकत धडपडत आपल्या लक्षाकडे जाणं, हा या जगतातील आणि अध्यात्मातील मार्गाचा नित्य खेळ आहे. पण त्यासाठीची जाणीव, भूक, जिज्ञासा, उत्सुकता जागृत होणं आणि त्या मार्गात येणाऱ्या अडथळ्यांना पार करण्याची जिद्द, चिकाटी अंगी येणं किंवा जागृत होणं, यासाठी नक्कीच ज्ञान प्राप्ती होणं महत्वाचं आहे. यातून जाणिवांची जागृतीहोण्यासाठीच, आवश्यक सहाय्य, नित्य प्रत्येकाला मिळावं, नव्हे तर त्यासाठी कोणीतरी कनवाळू, कृपाळू व चिरंतन उपलब्ध असावं, ही जाणीव ईश्वराला झाली असावी आणि त्यातूनच, सद्गुरू या परम कृपाळू तत्वाची निर्मिती, ईश्वराच्या हातून झाली असावी.
विश्वाच्या नव्हे तर ब्रम्ह व ब्रम्हांडाच्या निर्मितीपासून, विश्व निर्माता एक तत्व, एक नियम व एक निती जपत आलाय, किंवा त्याने तसा नियम स्वतःला घालून घेतलाय की, काही तरी घडायला काहीतरी कारण असावं लागतं. म्हणजे विनाकारण या ब्रम्हांडात सुई सुद्धा निर्मित होऊ शकत नाही. याची अनेक उदाहरणं आहेत. या घडणाऱ्या सर्व कारणांनाच ईश्वराची लीला संबोधलं जातं.
याच मुद्द्यावर आपला विषय पुढे नेऊया, पण उद्याच्या भागात. तोपर्यंत विधात्याच्या या अद्भुत कार्याचा आनंद घेत, त्याला स्मरणात धन्यता मानूया.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२६/०१/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment