अध्यात्म विराम २१
श्रवण हे असं माध्यम आहे जे कर्ण, मस्तिष्क अर्थात मेंदू, मज्जासंस्था,मन, हृदय, धमन्या, रक्त आणि प्रसंगी देह चेतावण्याची शक्ती आहे. एखाद्या माणसाच्या नुसत्या अपशब्दाने माणूस क्रोधित होऊ शकतो किंवा वेळप्रसंगी त्या माणसावर धावून जाऊ शकतो किंवा त्याला इजा सुद्धा करू शकतो. एखाद्या व्यक्तीच्या आवाजात इतकी जादू असू शकते की, प्रसंगी त्या व्यक्तीसाठी जीव देणारी माणसं असतात.म्हणजेच त्या व्यक्तीच्या एका शब्दा खातर काहीही होऊ शकतं.
म्हणजेच आवाज आणि शब्द यामधे इतकी ऊर्जा, शक्ती किंवा चेतना असते की, पूर्ण देहाला बदलून टाकण्याची त्या शब्दांची पात्रता असते. अर्थात ही प्रक्रिया एकट्या श्रवण या क्रियेने घडून येऊ शकते. एखाद्या मानसोपचार तज्ञाच्या बोलण्याने हिंस्त्र वा क्रोधायमान माणूस हळूहळू शांत होऊन, विचार करायला लागतो. हे अर्थात त्या मानसोपचार तज्ञाचं कसब वा कौशल्य आहे.
पण त्या तज्ञाचे, योग्य पद्धतीने मांडलेले वा ऐकवलेले शब्द वा विचार कर्ण, मस्तिष्क इथून, विचाररुपात
मनात जाऊन, तिथे त्यांनी योग्य ते बीज रुजवलं आणि त्याला योग्य विचारांची मशागत केल्यानंतर, त्याला सद्विचार व विवेक रूप पीक येऊ शकतं. हे इतकं सर्व श्रवण या एका क्रियेद्वारे घडून येऊ शकतं. म्हणून श्रवण या प्रक्रियेचं महत्व अनन्यसाधारण आहे.
हा मानसोपचार तज्ञाचा दाखला फक्त वानगीदाखल घेतला. पण अश्या कितीतरी गोष्टी, क्षेत्र, विषय आहेत, जिथे श्रवण आपल्याला कार्य करताना दिसेल. पण ही श्रवण क्रिया ज्यावेळी ईश्वरी नामाचा महिमा, ईश्वराचं नाम, इत्यादींसाठी वापरली जाते त्यावेळी तिला भक्तिरुप ऊर्जा, शक्ती प्राप्त होते.
एखादा शब्द सतत, नीट, सातत्याने, दीर्घकाळ पर्यंत ऐकला किंवा श्रवण केला तर, त्या शब्दांची ऊर्जा व शक्ती, यांची अफाट चेतना आपल्या कार्यार्था उपयोगी येते. सातत्य हे नियमित आणि सतत असायला पाहिजे.
अर्थात हे श्रवण ठराविक नादात, लयीत आणि ठराविक ध्वनित असेल तर त्याचा परिणाम हा सहजसुलभ व साध्य असतो.
याचं कारण म्हणजे ध्वनी आणि त्या ध्वनीचा लयबद्ध नाद हा कानावाटे, देहातील ठराविक भागावर परिणाम करून, त्यांना उद्दिपित करतो. प्राचीन भारतीय शास्त्रज्ञ अर्थात ऋषीमुनी यांनी या ठराविक शब्द, स्वर, व्यंजन इत्यादींचा नादमय परिणाम, यांचा अभ्यास करूनच, माणसाच्या मानवी देहातील ऊर्जा, चेतना जागवणाऱ्या, निर्माण करणाऱ्या, विशिष्ट पेशी वा विशिष्ट भाग यांच्या माध्यमातून विचार नियंत्रित करून व विकार नष्ट करून, मनाला शांत करून एकाग्र करून, विश्वाबाहेरील आनंद प्राप्त करून देईल.
याच मार्गावरून पुढे याच ध्वनीच्या, नादाच्या, विशिष्ट शब्दांच्या नादाची मनाला नादमय सवय जडवून ह्यान, धारणा, समाधी यामधे अग्रेशीत होता येईल, हे देखील त्यांनी शोधून जगापुढे मांडलं. यावर अजूनही सखोल जाऊन, विचार करूया, उद्याच्या भागात. तोपर्यंत या नादाचा अनुभव घेऊया.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२१/११/२०२२
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment