अध्यात्म विराम ६२
वंदन याचा तात्विक अर्थ त्यामागचं उद्देश समजल्यानंतर, वंदन करण्यासाठी विशिष्ट स्थळ काळ असावं का आणि का असावं. यावर आज चिंतन करूया. आपल्या लक्षात आलं आहे की, वंदन हे ईश्वर, आत्मा आणि मन यांच्या संगामाच तंत्र आहे. त्यामुळे ते योग्य पद्धतीने साधल्यास, देह, बुद्धी मन यांची सुद्धा एकतानता साधली जाते. किंबहुना, तशी एकतानता साधणं हीच वंदन भक्ती आहे.
पण अशी एकात्मता प्रत्येक वेळी साधेलच असं नसतं. याचं कारण म्हणजे मन हे प्रत्येक वेळी त्याला सांगितलेली गोष्ट आज्ञा, इच्छा, विनंती मानेलच असं नाही. कारण ते चंचल आहे आणि ते वातावरण, स्थळ, काळ, स्थिती यानुसार बदलत असतं किंवा अस्थिर असतं. अगदी एकाच स्थळी सुद्धा ते प्रत्येक वेळी एकाच स्थितीत असेल, याची शाश्वती देता येणार नाही. त्यामुळे वंदन भक्तीसाठी आवश्यक मनःशांती अश्या मनाला लाभण्यासाठी काय करता येईल किंवा काय केल्यास हे साधेल यावर विचार करूया.
वंदन हे ईश्वराशी मनाचं आणि आत्म्याचं मिलन असल्या मुळे, या वंदन करण्याला विशेष महत्त्व दिलं गेलं पाहिजे. पण हे साधण्यासाठी ईश्वराच्या मूर्तीसमोर, मंदिरात किंवा आपल्या देवघरातच ही एकाग्रता का साधते, याचं महत्वाचं कारण, या ठिकाणी असलेली, सकारात्मक ऊर्जा आणि शुद्ध व सात्विक वातावरण. आपण अनेक वेळा असं म्हणतो किंवा वाचलं आहे आणि आपल्या मनाला पटतं की, योग्य वातावरण असल्यास, मनाला एक अलौकिक आनंद मिळतो. आता आनंद ही सुद्धा निर्गुण निराकार गोष्ट आहे. म्हणजे तो आनंद सगुण रुपात, घन, द्रव वा वायुरूप स्वरूपात दाखवता येणार नाही.
म्हणजे निराकार मनाला, निर्गुण आनंद मिळाल्यास, त्या मनाची स्थिती उच्च होऊ शकते, हे शास्त्र आणि विज्ञान आहे. ही उच्च स्थिती, उत्तम सकारात्मक ऊर्जा आणि शुद्ध सात्विक स्थिती असलेल्या अशा ठिकाणी मनाला हा निर्गुण रूप आनंद प्राप्त होतो. या स्थितीत गेल्यावर मन आपोआप आत्म्याला त्या आनंदात संमिलित करून घेतं आणि तेच मन ईश्वरी शक्तीशी तादात्म्य पावते.मंदिर ही शास्त्रीय व वैज्ञानिक दृष्टीने, दिशांचा अभ्यास करून, तयार करण्यात आलेली वास्तू असते.
त्यामुळे त्या ठिकाणी वातावरणातील सर्व सकारात्मक घटक, मनाला आवश्यक शुद्ध व सात्विकता पूर्णपणे प्राप्त होत असल्यामुळे, त्या ठिकाणी देवाच्या मूर्ती समोर, काही क्षण उभ राहून किंवा आसनस्थ होऊन, डोळे मिटून, दोन्ही हात जोडून, नमस्कार स्थितीत जाऊन, मनाला त्या भारलेल्या वातावरणाचा आनंद प्राप्त करू देऊन, एकाग्र करण्याचा अभ्यास करावा. निदान हे साधण्यासाठी शक्य असेल त्या त्यावेळी, शक्य असेल तर काही मिनिटभर, शांतपणे देवाला वंदन करण्याचा नित्य अभ्यास करावा.
आपण असा अभ्यास करून, हा वंदन भक्ती योग साधावा. याचंच सखोल चिंतन पुढील भागात करूया.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०१/०१/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment