अध्यात्म विराम ४२
स्मरण आणि विस्मरण या खेळात, तेच स्मरणात येईल, जे मनाने, बुद्धीने आणि देहाने नित्य कांक्षिले आहे, ज्याची नित्य आराधना केली आहे, ज्याला भजले व पुजले आहे. आता आयुष्यभर माणूस वासनांची, मायेची, लोभाची, क्रोधाची पूजा व आराधना करतो की, सर्व हित साधून देणाऱ्या त्या एका ईश्वराचं साधन करतो, हे त्याच्या वृत्तीवर अवलंबून आहे.
वृत्ती अर्थातच संचित आणि कर्म यातून साकार होते. ही वृत्ती वासनेने ग्रस्त असेल तर, मनुष्य क्रोधित, कामुक, लोभी, आळशी असतो. पण जर त्याच्या वृत्तींवर वासना मोह यांचा प्रभाव नसेल किंवा तो कमी असेल तर माणूस मेहनती, शांत, सोशिक, शिस्तबद्ध, धर्म मार्गी इत्यादी स्वभावाचा असतो. माणूस नित्य स्मरण चिंतन व मनन ज्या गोष्टींचं करतो, त्याचं गोष्टी वृत्तीच द्योतक असतात.
हे एकप्रकारे परस्परावलंबी असतं. म्हणजे माणसाची वृत्ती ज्याप्रकारची असेल, त्या प्रकारचं स्मरण व चिंतन मानवी मन करतं आणि स्मरण व चिंतन ज्याप्रकाराच करतो, तशीच वृत्ती असते. स्मरण व त्याद्वारे चिंतन हे, संहारक वा उद्धारक, असं दोन विरुद्ध प्रकारचं असतं किंवा असू शकतं. मात्र स्मरणाच्या या मार्गावर, ईश्वर स्मरण हे बाकी सर्व वृत्ती, स्वभाव, माया, वासना इत्यादी मधून मारक व संहारक बाजूला करून, त्यागून, हित कारक, तारक व उद्धारक तेवढं माणसाच्या स्वभावात, वागण्यात, बोलण्यात, शिल्लक ठेवतं.
कारण ईश्वर हा सगुण आणि निर्गुण दोन्ही प्रकारच्या स्थितीत आपल्या मूळ ब्रीदाला सार्थता देतो. तो स्वयंभू आणि वृत्ती, वासना व माया रहित असल्यामुळे, फक्त आणि फक्त सकारात्मक, शुद्ध आणि सात्विक लहरी, ऊर्जा व शक्ती निर्माण करतो. त्यामुळे ईश्वर नामाच स्मरण, हे सगुण, निर्गुण दोन्ही योग एकाच वेळी एकाच स्थितीत साधून देतं. ईश्वराच्या नुसत्या अस्तित्वाच्या चिंतनाने, त्रिखंडात व्याप्त असलेल्या त्याच्या शुभ लहरींचा संचार, मनाला व्यापून टाकतो. त्या योगे प्रत्येक क्षणी, मनातील नकारात्मक ऊर्जा, शक्ती यांचा ह्रास होत जातो.
पण प्रत्येक क्षणी वासना, माया, लोभ, मोह, मद, मत्सर, दंभ, अभिमान, अहंकार यांचा मारा, मानवी मनाच्या सर्व पटलांवर होतच असतो. त्यामुळे, त्या माऱ्याला, नित्य झाडून काढणारा, नित्य उपयोगी असा उपाय म्हणजे, त्या ईश्वराच्या नामातून उत्पन्न लहरी प्राप्त करणं. या नित्य प्राप्त केलेल्या लहरी, आपलं कार्य नित्य करतच राहतात. म्हणजे एकप्रकारे, नित्य अस्वच्छ होत असलेल्या घराला, नित्य स्वच्छ करत राहण्यासारख आहे.
हेच चिंतन उद्या पुढे सुरू ठेवूया.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१२/१२/२०२२
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment