Skip to main content

अध्यात्म विराम ८३

अध्यात्म विराम ८३
 
प्रपंचात असताना किंवा प्रपंचात राहून साधना करताना, आपण नेहमी एक विचार करतो की, हे सर्व करतो ते व्यर्थ आहे का किंवा याचा काहीतरी उपयोग होतो का. हा प्रश्न व्यावहारिक अर्थाने योग्य आहे. पण परणार्थिक अर्थाने वा साधनेत असणाऱ्या साधकाने हा प्रश्न मनात आणणं अयोग्य आहे. कारण श्रद्धा आणि शंका ही दोन उर्जायुक्त खड्ग आहेत आणि मनरुपी एकाच म्यानात ही दोन खड्ग एकत्र राहू शकत नाहीत. म्हणजे एक असेल तर ते दुसऱ्या खडगाला बाहेर काढणार, हे नक्की. 

किंबहुना अगदी स्पष्ट सांगायचं तर शंका असेल तर त्याची नकारात्मक ऊर्जा श्रद्धा रूप ऊर्जेला टिकू देत नाही किंवा टिकू देणार नाही. आता यावर आज चिंतन करून, मगच भक्ती मार्गाचा विचार करूया. शंका ही मोह, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहं, न्यून, अशांतता अश्या अनेक दुर्गुणातून जन्म घेते. अर्थात ती तमोगुणी किंवा रजोगुणी असते. श्रद्धा ही सात्विक अर्थात सत्वगुणी असते. अर्थातच रज व तम या दोन्ही गुणात, सत्व गुणा वर मात करण्याची अभूतपूर्व ऊर्जा व शक्ती असते. ही शक्ती नकारात्मक व आसक्ती युक्त असते. त्यामुळे ती श्रद्धा, भक्ती, विश्वास इत्यादी गुणांना स्थान घेऊ देत नाही. किंवा या गुणांनी स्थान धरलं असेल तर, ते स्थान बळकट होऊ देत नाही. 

कोणत्याही कारणाने मनात आलेली शंका ही कुशंका, कुविचार यामध्ये कधी परिवर्तित होते, हे आपल्या लक्षात सुद्धा येतं नाही. याचं कारण म्हणजे तमोगुण व रजोगुण यांची शक्ती आणि ऊर्जा ही घर्षण युक्त असते. त्याने सात्विक, शुद्ध विचारांना घासून, गुळगुळीत किंवा नष्ट करण्याची क्षमता असते. दुसरा एक दुर्गुण जो यांच्या मधे असतो, तो म्हणजे आपल्यासह समविचारी इतर दुर्गुणाना सोबत जमा करणं.

किंबहुना सहसा दुर्गुण हे एकट्याने वास करतच नाहीत. आपण प्रत्यक्ष आयुष्यात ज्याप्रमाणे दुर्वर्तनी, दुराचारी व दांभिक माणसं,घोळका, जथा किंवा गट करून फिरताना दिसतात, त्याचप्रमाणे रज आणि तम हे दुर्गुण आपल्या अनेक बांधवांना सोबत घेऊनच येतात किंवा वास करतात.याची दोन कारणं आहेत.एक म्हणजे त्यांच्यातील आकर्षण शक्ती ही जास्त प्रखर असते आणि दुसरं म्हणजे हे दुर्गुण जरी ऊर्जायुक्त आणि शक्तीयुक्त असले तरी एकटेपणाने अशक्त आणि दुर्बळ असतात. म्हणून त्यांना तश्याच प्रकारच्या इतर दुर्गुणांची साथ संगत लागते. 

म्हणजेच इतर दुर्गुणांबद्दल आकर्षण आणि सत्व, शुद्ध गुणां बद्दल प्रतिकर्षण असा दुहेरी घात हे दुर्गुण करतात. या दूर्गुणांना सर्वात मोठी भीती सत्वगुण आणि शुद्ध वर्तन यांची असते. म्हणजे सत्व हीन माणूस आणि दुर्गुणांची खाण असणारा माणूस हा यांच्यासाठी भयमुक्त स्थान असतं. अश्या माणसाकडे राहायला यांना काहीही भीती वाटत नाही. कारण इथे त्यांच्या साठी योग्य आणि कच्चे भाव असलेल्या मनाची भुसभुशीत जमीन असते, जिथे त्यांना रुजायला, वाढायला आणि आपला कार्यभाग साधायला जास्त त्रास पडत नाही. 

म्हणजेच शंका जिथे आहे तिथे श्रद्धा राहू शकत नाही. कारण शंका आली की,तिथे इतर अनेक दुर्गुण, दुर्व्यवहार सोबत येत जातात. हे सर्व मिळून श्रद्धा या सत्व गुणाला टिकू देत नाहीत.त्यांच्यासाठी सर्वात उत्तम मनाची जमीन म्हणजे अश्रद्ध किंवा नास्तिक मन. इथे एकदा शंका आली की, ती इथे श्रद्धा या भावाला कोणतंही स्थान मिळणार नाही, याची पूर्ण काळजी शंका व इतर दुर्गुण घेतात. 

म्हणूनच नास्तिक किंवा अश्रद्ध व्यक्ती नेहमी श्रद्धावान व्यक्तीच्या शोधात असतात. कारण दुर्गुणांच वैशिष्ट्य आहे की,त्यांना सत्व गुण वा श्रद्धावान व्यक्ती पाहण्याची शक्ती नसते. म्हणूनच अश्या व्यक्ती भेटल्या किंवा पाहण्यात आल्या की, अश्रद्ध व्यक्तीच्या आतील दुर्गुण आपोआप जागे होऊन, ते सत्व गुणांना त्रास द्यायला सुरुवात करतात.

विषय मोठा आहे, त्यामुळे यावरील पुढील चिंतन आपण उद्याच्या भागात बघुया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२२/०१/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...