अध्यात्म विराम ५५
आतापर्यंतच्या नवविधा भक्तिच्या सहा भक्तिमार्ग प्रकारांचा चिंतनशील विचार केला तर लक्षात येईल की, आपण एका विशिष्ट साखळीचाच विचार करतो आहोत. किंवा हे एका साखळीचाच भाग आहेत. आपण त्या सर्व शक्तिमान, पूर्णरुप इश्वराबद्दल श्रवण केलं. त्याच नाम रूप स्वरूप, विराटता, विश्वव्यापकता, विविधता आणि तरीही एकात्म असलेली त्याची योग्यता, याबद्दल श्रवण केलं. त्याची ओळख त्याच्या वर्णनावरून, सगुण रुपा तील संकल्पनेवरून, त्याच्या निर्गुण अस्तित्वाची गाथा श्रवण केली.
त्याचे गुणवर्णन, कीर्ती, अत्युच्चता, शुद्धता, सात्विकता, ब्रीद, याबद्दल कीर्तन, प्रवचन स्वरूपात ऐकून, भारावून जातो. भक्ती मार्गी होण्यातील ही दुसरी पायरी वा टप्पा आपण पार करतो.त्याचं मनोहारी अस्तित्व,आपल्या अनेकानेक जन्मात, त्याचं आपल्या सोबत असणं, अंशात्मक रुपात हृदयस्थ चेतना, हे सर्व या कीर्तनातून समजतं. त्याबरोबर कुठे जायचं आहे, हे देखील, या भक्ती मार्गातील टप्प्यावर समजतं. कारण सांगणारा ईश्वरीय प्रतिनिधी स्वरूप असतो.कीर्तन हे त्याच्या किर्तीचं वर्णन आहे.
त्याची झालेली ओळख, पटलेल्या खुणा, देहात आल्या वर आणि देहातून गेल्यावर, त्याच्याकडे मार्गस्थ होण्या साठी कराव्या लागणाऱ्या अनेक गोष्टी, कर्मात, भोगात असताना, त्याचं करावं लागणारं स्मरण, चिंतन, त्या स्मरणातून आपली त्याच्याशी नित्य होणारी ओळख हा त्या स्मरण भक्तीचा वाढता आलेख समजावा. आपण त्याचं स्मरण याचसाठी करावं, की तो साक्षीरुपात आपल्या अजूनच समीप येत जावा. नित्य स्मरण हे याचसाठी अत्यावश्यक आहे आणि त्याचसाठी केलं जावं.
स्मरणातील त्याची दृढ झालेली ओळख आपण त्याच्या पादसेवन भक्तिरुपात अजूनच प्रगाढ करावी. त्या सर्व साक्षी ईश्वराला, त्याच्याच अस्तित्वाने जगत असलेल्या भौतिक जगतातील काही देण्यापेक्षा, त्याच्या चरणी लीन राहून, त्याची नित्य सेवाभक्ती करण्यातील आनंद मिळवावा. त्या आनंदात, आत्माराम प्राप्तीचा अनुभव घ्यावा. हरी हा सेवा करणाऱ्यांना आपल्या हृदयात स्थान देतो.
पण ही सेवा मानस पूजेच्या स्वरूपातील असावी. कारण, ईश्वर हा प्रत्यक्षात निर्गुण परब्रम्ह स्वरूप आहे. त्यामुळे त्याचं पूजन, कीर्तन, भजन सेवा स्वरूपात भक्ती करताना, त्या श्री चरणी लीनता वृद्धिंगत होण्यासाठी, त्याची आराधना, अर्चन रुपात अर्थात प्रार्थना स्वरूपात करून, मन त्याच्या चरणी, भजनी, किर्तनी नित्य दृढपणे स्थिर स्थित राहील, हा उद्देश असावा.
ही अर्चन भक्ती सुद्धा आत्म् रुपात अर्थात निर्गुणाची निर्गुणाने केलेली पूजा असावी. तरच त्या इष्ट लहरींची, त्या इष्ट स्वरूपाला जाणीव होऊन, आपल्या मनातील भक्तिभाव, त्या परम शक्तीप्रत नित्य पोहोचत राहतील. अर्चना व प्रार्थना करण्यातील आनंद आत्मशुद्धीची जाणीव जागृत करतो. कारण या सर्व भक्तीच्या मार्गांचा उद्देश, चित्तशुद्धी व आत्मशुद्धी हा आहे, किंवा असावा.
इथे आपण भक्तीच्या सहाव्या पायरीपाशी आलो आहोत. याबद्दल उद्याच्या भागात विस्ताराने जाणून घेऊया. पण मनातील त्याच्या रूपाला, स्वरूपाला आणि ऊर्जेला स्मरत, त्याची अर्चना करत राहू.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२५/१२/२०२२
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment