Skip to main content

अध्यात्म विराम ६४

अध्यात्म विराम ६४

ईश्वराने भक्तिरसाच्या नऊ मार्गाची निर्मिती करून, सर्व साधारण जडजीव विशेषतः मानवाचं, अनंत उपकार करून, सहाय्य केलं आहे. त्याबद्दलची कृतज्ञता कोणत्या आपण अनन्य भावात व्यक्त करू शकतो, तर निव्वळ त्या मार्गांचा अवलंब करून आणि नित्य त्या मार्गावर मार्ग क्रमण करून.या नऊ मार्गावरील कोणतीही पायरी ही आधीच्या आणि नंतरच्या मार्गाहून भिन्न व विभक्त नाही. तर प्रत्येक पायरी एकमेकांना पूरक, सहाय्यक व भक्ताला पुढील पायरीवर घेऊन जाणारी आहे.

आपण त्या मार्गावर चालत राहण्याची पराकाष्ठा करून, आपल कर्तव्य करत राहिलं पाहिजे. श्रवण भक्तीने सुरू केलेला हा चिंतन पर लेख प्रपंच आज दास्य भक्ती या सातव्या पायरीवर आलेला आहे. आध्यात्मिक मार्गात सात हा अत्यंत शुभ क्रमांक समजला जातो. सप्तस्वर्ग, सत्पलोक, सप्तपाताळ सप्तपदी, सत्पनद्या इत्यादी अनेक उदाहरणं देता येतील. 

म्हणून या सातव्या पायरीबद्दल विशेष स्नेह वाटतो, याचं कारण सुद्धा तसच आहे. दास्य भक्ती हे नामोच्चारण केल्यानंतर सर्वात प्रथम जे दिव्य व्यक्तित्व डोळ्यासमोर येत असेल तर ते हनुमंताचं. दास्यत्वाची अत्युच्च परिसीमा म्हणजे श्री हनुमंत. आपले स्वामी हे आपलं सर्वस्व आणि त्याचं अर्चन, पूजन वंदन आणि आज्ञा पालन, एवढंच आपलं निजकर्तव्य आहे, इतकचं ज्याला ज्ञात आहे, असा हा हनुमंत. 

दास म्हणजे स्वामीच्या आज्ञेची कर्मरुपात, कर्तव्य रुपात, कृतीरुपात सार्थ साथ करून, आपल्या स्वामीच्या कृपेची प्राप्ती करणं. दासाने इतकचं जाणलं पाहिजे की आपल्या साठी स्वामी हा ईश्वर, स्वामीची आज्ञा व इच्छा यांची पूर्तता करणे हा धर्म आणि ईश्वर चरणी वा स्वामी चरणी लीन व शरण होऊन राहणं हीच निष्ठा आहे.यातच दासाच हित आहे. ते हित स्वामी जाणत असतो म्हणून प्रत्येक भक्ताने, सर्वात प्रथम हे जाणलं पाहिजे किंवा मनात दृढ धरलं पाहिजे की, माझं हित त्या चरणी लीन राहण्यात आहे. 

आपल्या अत्युच्च आराध्याचं दास होऊन, त्याचं दास्यत्व पत्करणे म्हणजे, पारमार्थिक भक्तीचा परमोच्चबिंदू समजावा. कारण एकदा तो भाव मनात योजला आणि आपले आराध्य ईश्वर व सद्गुरू यांच्या चरणी मनाला स्थिर केलं की, ही स्थिरता, ही एकाग्रता, हा मन आत्मा यांचं व ईश्वरचरणी ध्यानपूर्ण वंदन, हा अलौकिक आनंद, पुन्हा पुन्हा प्राप्त करण्याचा एकमेव मार्ग, स्वतःला त्या चरणांचं दास किंवा सेवक जाणणं. 

दास्यत्व भक्तीबद्दल अजूनही सखोल विचार चिंतन करूया, पण उद्याच्या भागात. तोपर्यंत आपल्या ईश्वर वा सद्गुरू चरणी,आपली लीनता वंदन रुपात कायम ठेवून, त्यांनाच आपले स्वामी जाणून, त्यांच्या कृपेसाठी नित्य त्यांचं स्मरण करत राहूया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०३/०१/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...