अध्यात्म विराम २४
एकूण सर्व गोष्टी कर्म या धाग्याला जोडलेल्या असतात. पण अश्या अनेक कर्म चक्रातून बाहेर पडण्यासाठी सुद्धा ईश्वराने काही व्यवस्था केलेली असणारच, हे नक्की. कारण सर्व व्यवस्थापनेचा आदी, सर्व शास्त्रांचा आदी आणि सर्व सिद्धांताचा आदी तोच आहे. त्यामुळे समस्या तिथे उत्तरंही, त्याने रचलेली पद्धती आहे.
मुळात या जगात येताना, आपल्या सर्व ज्ञानेंद्रियांतील श्रवण हे ज्ञानेंद्रिय आणि मेंदू, मन व आत्मा यांचा उत्तम संगम, गर्भात, त्यानेच साधून दिलेला आहे. म्हणजे श्रवण या साध्या प्रक्रियेचा आणि श्रुती या ज्ञानेंद्रियाचा आपण प्रथम विचार करूया. इंद्रियांचं काम ज्ञान ग्रहण करून, मेंदुद्वारे त्याचं पृथक्करण करून, निष्पक्षपणे ते ज्ञान प्रसारित करणं.
म्हणजेच लहान, मोठे, बारीक, सूक्ष्म, उपयोगी, निरुपयोगी, मंजुळ, कर्णकर्कश असे सर्व आवाज या इंद्रियातून मस्तिष्क व चेतापेशी या माध्यमातून, जाणिवेत पोचतात आणि त्या त्या आवाजानुसार मन, देह, बुद्धी व चेतापेशी प्रतिक्रिया किंवा निष्क्रियता प्रकट करतात. हा साद प्रतिसादाचा खेळ, प्रत्येक क्षण होतच असतो. यात कोणताही अपवाद असत नाही.
पण मग प्रतिसाद देणं वा न देणं हे जाणिवांच्या जागृती वर आणि मनाच्या स्थितीवर अवलंबून आहे. या दोन्हीत जेव्हा आणि जोपर्यंत ताळमेळ असतो, तोपर्यंत माणूस योग्य प्रतिसाद देतो. ज्यावेळी हा ताळमेळ चुकतो किंवा त्यात विसंगती येते, तेंव्हा प्रतिसाद चुकीचा होतो किंवा दिलाच जात नाही.पण हे देहाच्या,मनाच्या, जाणिवांच्या स्थितीवर अवलंबून आहे. साधारण माणूस शरीराने वा मनाने थकलेला किंवा पूर्ण तंदुरुस्त नसेल तर, या साद प्रतिसादात विसंगती येते.
पण ही विसंगती बाह्य किंवा सांसारिक जगतासाठी किंवा भौतिक कारणांनी वेगळी व आत्मिक कारणाने वेगळी असू शकते. म्हणजेच चुकून, थकव्यामुळे, मनाच्या दुःस्थितीमुळे आलेली नैसर्गिक अर्थात अज्ञाना मुळे असू शकते.
पण मनाला बाह्य जगतातील अनेक आवाजांना आपल्या गरजेनुसार प्रतिसाद देण्याची सवय लावून घेणं, हा एका विशिष्ट साधनेचा, शिक्षणाचा किंवा एकाग्रतेचा भाग असू शकतो म्हणजेच ज्ञानामुळे सुद्धा प्रतिसाद नियंत्रित करता येतो.
अश्या सवयीसुद्धा मुद्दाम लावून घेतलेल्या किंवा सवयीने वा शिक्षणाने अंगिकारलेल्या असू शकतात. म्हणजेच बाह्य जगतातील आवाजाला किंवा सादाला प्रतिसाद देणं अथवा न देणं, दोन्ही मनःस्थितीचा भाग असतो. एक अज्ञानाने व एक ज्ञानाने. विषयात खोल जात आहोत, ते गरजेचं आहे. म्हणून हेच चिंतन उद्या सुरू ठेवू. तोपर्यंत या अभ्यासाचं मनन करत राहूया.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२४/११/२०२२
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment