अध्यात्म विराम २३
काल आपण पाहिलं त्याप्रमाणे, ईश्वराने भेदाभेद ठेवला नाहीये.मार्ग अनेक आणि भिन्न भिन्न घालून दिलेत, अनेक शास्त्र,वेद पुराण इत्यादी मांडून ठेवलं. पण त्यामागे प्रयोजन, उद्देश, उद्दिष्ट हे एक आणि एकच आहे. मानवी देह, या शेवटच्या टप्प्यात आलेला जीव हा, मोक्ष, मुक्ती वा संपूर्ण उद्धार, या शेवटच्या पायरी पर्यंत पोचला पाहिजे.
म्हणजे ईश्वरी इच्छा तशीच आहे. ईश्वराची सारी लेकरं, मोक्ष आणि मुक्ती या अत्युच्च मार्गाकडे जावीत, हे ईश्वरी प्रयोजन आहे, हाच ईश्वरी संकेत आहे. आपण त्या मार्गाला जाणत नाही, जाणून वळत नाही, वळूनसुद्धा गांभीर्याने ते घेत नाही, हा आपला कर्मदोष आहे. दोष यासाठी की, आपल्या जाणीवा, त्याप्रमाणात आणि त्यासाठी जागृत होत नाहीत, बुद्धी वळत नाही, विचार येत नाहीत, म्हणजेच आपलं कोणततरी कर्म असं काही फल देण्यास बाकी आहे, जे भोगण्यासाठी, आपल्याला त्याप्रमाणे सहाय्यक कर्म करण्याची बुद्धी होते.
म्हणजे बुद्धी त्या मार्गाला, मन वा आत्मा यांना जाऊ देत नाही. काही पडदा किंवा आच्छादन, माया, लोभ, मोह, क्रोध, काम, इत्यादी शटविकार आपल्या मार्गात ठाण मांडून बसतात. त्यातून, चुकीचं वर्तन, गैरमार्गाने जाणं, अनैतिक गोष्टी घडणं हे सर्व होत जातं. या मधे जीव लगेच वाममार्गी होतो असं नाही. कारण ईश्वराच्या सर्व कायद्याप्रमाणे इथेही पद्धती किंवा पायऱ्या आहेत.
प्रथम जीव मोह, माया यांच्या जाळ्यात, अज्ञानाने अडकतो. लोभ, क्रोध व काम सहजी कोणालाही अडकवत नाहीत. त्यांच्या सुद्धा पद्धती आणि नियम असतात. माणूस आपणहून त्यांच्या जाळ्यात, कर्मधर्म संयोगाने, अनवधानाने अडकतो किंवा ओढला जातो. अर्थात असं चुकून घडण्यात, त्याचंच कोणततरी पूर्वकर्म कारण असतं.
पण प्रत्येकाला अश्या स्थितीत अडकण्याआधी सावध करणारे संदेश, लहरी, प्राप्त होतात. काहींना त्याचे अर्थ समजतात. तर काहीना ते लक्षात येत नाहीत. या सावध करणाऱ्या लहरींना किंवा त्या संदेशांना ओळखण्यासाठी लागणारी पात्रता, त्याचं व्यक्तीच्या पूर्वकर्माने प्राप्त होते.
यावर अजून सखोल चिंतन उद्याच्या भागात करूया. पण तोपर्यंत, ही ईश्वरी व्यवस्था किती अद्भुत आहे, याचही चिंतन करूया.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२३/११/२०२२
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment