अध्यात्म विराम ५३
अर्चना हा शब्द अर्च अर्थात पूजा आणि ना म्हणजे क्रिया करणे, अश्या दोन धातूंपासून तयार झाला आहे. असेच अनेक शब्द आहेत. उदाहरणार्थ प्रार्थना, कामना, चेतना, वासना इत्यादी अनेक. एखाद्या स्वरूपाला, रूपाला, प्रतिमेला, नामाला, चैतन्याला जेंव्हा आपण मनापासून श्रेष्ठ मानतो आणि त्याचे नित्य स्मरण, भजन, कीर्तन, मनन करतो, त्याला आपलं मन, हृदय, प्राण अर्थात श्वास आणि आत्मा यांमध्ये विशेष स्थान देतो आणि त्यांना स्मरूनच आपण नित्य जीवन जगतो, ते खऱ्या अर्थाने अर्चन करणे असं म्हणता येऊ शकेल.
जे पूजनीय आहे, पूज्य आहे, पूजा योग्य आहे त्याला वंदन करणे, अर्चन करणे, भजणे, ही अर्चन भक्ती आहे. आता पूज्य म्हणजे काय, याचा अर्थ जाणून घेऊ. पुज् या धातूपासून पूज्य आणि त्यापासून पूजनीय, पूजा योग्य इत्यादी शब्द तयार झाले आहेत. यात मतितार्थ हा आहे की, ज्याची पूजा करावी असं काही. पूजा करणे, पुजणे अर्थात ज्याला मनात अत्यंत विशेष असं स्थान देऊन, त्याला आपला हितकारक, आदर्श, उच्चतम व्यक्तित्व मानणे.
मुळात पूजा हा एक उपचार नसून, ती मनाची एक स्थिती आहे, एक भावावस्था आहे. अर्थात मनाची अशी स्थिती, ज्यामधे मन एका उन्मनीय अवस्थेत असल्याने भारलेल्या स्थितीत असतं. त्या अवस्थेत, एका अद्भुत शांततेचा अनुभव घेतं. ही अवस्था खरतर पूजा, अर्चना व प्रार्थना करताना असायला हवी. मुळात जे पूजनीय आहे असं आपण मानतो, ते उच्च आणि अलौकिक असायला हवं.
कारण पूजा त्याचं गोष्टीची केली जाते किंवा करावी, जे या जगताच्या पार अर्थात पारलौकिक जगतातून आलेले किंवा असलेले आहे. त्याच व्यक्तित्वाची पूजा किंवा प्रार्थना व अर्चना केली जाते, जे अद्भुत आणि अत्यंत शुद्ध, सात्विक तेजाने, ऊर्जेने व शक्तीने भरलेले व भारलेले असते. जे या जगताच्या पलीकडील अर्थात या ब्रम्हांडाच्या पलीकडील आणि ब्रम्हांडाची रचना केलेले परम दैवत असावे.
अर्चना करणे म्हणजे, त्या चैतन्यमय शक्तीची स्तुती करणे, करुणा भाकणे, आराधना करणे, प्रशंसा करणे. यात एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या, आपण सर्वसामान्य स्थितीत, वरिष्ठांची स्तुती किंवा प्रशंसा करती, ती अर्चना भक्ती होत नाही. कारण, त्या स्थितीत मनात अन्य भाव किंवा मोह, लोभ, किंवा हेतू असतो किंवा असू शकतो.
म्हणजेच अर्चना ही हेतुरहित, शुद्ध भावाने, सात्विक भारलेपणाने केली जाते किंवा केली जावी. म्हणजे खरी अर्चन भक्ती ही, सद हेतूने केली जावी. किंवा विना हेतू, शुद्ध भावाने करावी. ज्यावेळी आपण अश्या चैतन्याची अर्चन भक्ती करतो, ती खरी अर्चन भक्ती समजली जाते. अर्चन भक्ती बद्दल अजूनही चिंतन उद्याच्या भागात करूया.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२३/१२/२०२२
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment