अध्यात्म विराम १६
खरतर ईश्वर हा प्रत्येक प्राणिमात्रांच्या समीप किंवा साक्षीला, संपूर्ण आयुष्यभर, आयुष्यातील प्रत्येक क्षण असतोच असतो. जगतपिता म्हणून त्याने प्रत्येक जीवाला वेगवेगळ्या प्रकारची सक्षमता दिली आहेच. देहाच्या व्यवहारात, माणूस अनेक कर्म करत जाताना, त्यांचं फल संचीतरुपात साठवत जातो. हे करताना, मूळ उद्देशाला हरताळ फासून, जगताच्या, प्रपंचाच्या व्यापात मग्न होत जातो.
प्रत्येक जन्मात सर्वसामान्य माणूस, आपलं कर्म आणि त्याच्या फलांची गणितं मांडता मांडता, आयुष्य जगत आणि दिलेले श्वास संपवत जातो. या सर्व व्यापात मनाची एकाग्रता, श्रवणातून प्राप्त ईश्वर लहरी जाणण्याचा अभ्यास, या सर्व व्यापाला, त्याच्याकडे समय, वेळ, क्षमता, ज्ञान, जाणीवा नसतात. पण ईश्वराने, यातूनच, स्वतः मार्ग काढून, मजप्रत येण्याचे नऊ मार्ग, सांगून मानवाला, उपकृत केलेलं आहेच.
त्यातील सर्वात सोप्पा मार्ग, ज्याने माणूस, मूळ उद्देश प्राप्त करू शकतो. तो श्रावणातून, त्या ईश्वरी शक्तीला जाणून, त्याच्यामुळे असलेल्या आपल्या अस्तित्वाचं ज्ञान घेऊन, त्याला नित्य श्रुतीवाटे आठवणीत आणून, एक साधा सोपा आणि सहजसाध्य योग साधू शकतो. याच सहज साध्य योगाला श्रवण योग किंवा भक्ती म्हटलं गेलं आहे.
ज्याच्या पासून, हा जीव विभक्त झाला, त्या परम तत्वाला जाणण्याची कृती म्हणजे भक्ती. त्या ईश्वराला आठवण्या साठी त्याला भजण्याची स्थिती म्हणजे भक्ती. भगवंता पासून विभक्त झाल्यानंतर पुन्हा त्याची प्राप्ती म्हणजे भक्ती. ही श्रवणात इतकी सहज साध्य होते, त्याचं कारणच, श्रवण ही या देहातील, सर्वात कमी श्रमाची कृती किंवा कर्म आहे. दृष्टीने दिसण्यासाठी डोळे उघडावे लागतात. पण श्रुती अर्थात कर्ण उघडेच असतात. त्यातून सभोवती जे ऐकू येईल ते ग्रहण करून, मेंदूपर्यंत धाडलं जातं.
पण श्रवण भक्तीचा इतकाच अर्थ अपेक्षित आहे का. तर नक्कीच नाही. याचा मूळ अर्थ हा आहे की, कर्णाद्वारे ऐकलेले, मेंदुद्वारे पृथक्करण केलं जातं, हे शास्त्र झालं. पण ईश्वराने दिलेल्या, मन या इंद्रियाच्या श्रवण शक्तीचा वापर करून, ईश्वराबद्दल काय व कसं श्रवण करायचं, याचा विकास, मानवी मनच करू शकतं.
यावरील चर्चा उद्या पुढे सुरू ठेवू.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१६/११/२०२२
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment