अध्यात्म विराम ८२
यामध्ये अजून एक मुद्दा जो जाणवतो तो म्हणजे, त्या वडिलांनी त्या मुलाकडून पैसे मागूनही,स्वतःसाठी त्यातून काहीही विनियोग केला नाही. म्हणजेच त्यांना त्या मुलाकडून स्वतःसाठी काहीही अपेक्षा नव्हती. पण मग त्यांनी त्या मुलाकडून दर महिना ठराविक रक्कम का मागितली असेल, याचा बोध पूर्ण सत्य जाणल्या नंतर लक्षात येतो. त्यांना स्वतःला त्यातील काहीही नको होतं. म्हणजेच ते स्वतः तृप्त आणि कृतकृत्य होते, परिपूर्ण होते.पण या सवयीतून त्या मुलाला या गुंतवणुकीचं महत्व समजावं आणि त्यात त्याचंच हित आहे,हे त्याच्या ध्यानात यावं यासाठी वडिलांनी हा सर्व खटाटोप केला.
म्हणजे आपल्याला जे भक्तिमार्ग सांगितले आहेत व त्यावर चालून,ईश्वर चिंतन, स्मरण, पूजन, अर्चन करणे अपेक्षित आहे, त्यामागे,ईश्वराला स्वतःला काहीही अपेक्षा नाही. तर त्यातून आपल्याच सर्वोपरी हिताचं काही करणं, ईश्वराच्या मनात आहे. त्यामुळे भक्तीच्या मार्गावर राहून,भक्तांना स्मरण,पूजन,अर्चन या मार्गाने चालायला सांगून, ईश्वर स्वतः निरपेक्ष आहे, हे नक्कीच मनात पूर्ण ठसलं असेल. म्हणूनच आपल्या कडून, सेवा, भक्ती, यज्ञ, याग, योग, का करवून घेतात, हे लक्षात आलं असेल. त्या सर्व ईश्वरी कर्माचा लाभ अंती ईश्वर आपल्यालाच, प्राप्त करून देणार आहे.
म्हणूनच ईश्वर व सद्गुरूसेवा करताना,ती आपणही निरपेक्ष भावाने करावी, हे सुद्धा ध्यानात आलं असेल. कारण सर्वव्यापी, सर्वात्मक ईश्वर, त्याची परतफेड आपल्यालाच करणार आहे, हे ध्यानात धरून, निश्चिंत मनाने, ईश्वर व सद्गुरू भक्तीसेवा करावी. तरीही हा ईश्वर, अश्या नित्याभियुक्त भक्तांना आपल्या हृदयात स्थान देऊन, प्रसंगी भूलोकि उतरून, स्वतः देह धारणा करून, त्यांच्या सेवेसाठी देह झिजवतो. याचं सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे, संतश्रेष्ठ श्री नाथ महाराज यांच्या घरी, प्रत्यक्ष श्रीकृष्णाने बारा वर्षे, श्रीखंड्याच्या रुपात राहून, पाणी भरण्याचं काम केलं.
त्यामागे भगवंतांची निरपेक्ष वृत्ती, खऱ्या भक्तासाठी काहीही करण्याची तयारी आणि भगवंत स्मरणात परिपूर्णता राखून, प्रपंच करणाऱ्या भक्ताला आपला मानण्याचं आपल ब्रीद राखण्यात भगवंत श्रेष्ठ आहे. आपण श्रवण, कीर्तन या मार्गे आपल्या हृदयापर्यंत पोचलेल्या त्याच्या नामाला, स्मरणात आणून, चरणांची मनाने सेवा करून, अर्चन, वंदन करून स्वतःला त्याच्या चरणांचा दास मानावे. या मधे खऱ्या भक्तीची उच्चता सिध्द होते.
ईश्वराच्या आराधनेच्या या पायऱ्यांनी जाणारा भक्त अनन्य भावे पूर्ण शरण जाऊन, उपासना करून, आपल्यात पूर्ण लीनता, दास्यभाव साधून, ईश्वर स्मरणात आपला भक्ती योग साधू शकेल. यातून पुढील पायरीवर, त्याच ईश्वरी कृपेने त्या ईश्वराच्या हृदयात स्थान प्राप्त करू शकेल. यावर पुढील भागात चिंतन करूया. तोपर्यंत त्याचं स्मरण करण्याचा योग साधत राहूया.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२१/०१/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment