अध्यात्म विराम ७४
अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते।
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्।।९.२२।।
अनन्य भाव म्हणजे या विश्वात, एका इश्वराशिवाय माझा अन्य कोणीही नाही. पण माझा म्हणजे कोणाचा, याची गफलत होऊ शकते. म्हणूनच आधी त्या मी चा विचार करूया. हा मी म्हणजे देह की मन की बुद्धी की आत्मा हा एक युगानुयुगे शोधला जाणारा आणि शोधला गेलेला प्रश्न आहे. जर तो मी, देह बुद्धी यांपैकी असेल तर, ते अशुद्ध आणि अज्ञान स्वरूप असतात.काळ परिस्थिती याप्रमाणे, हे ज्ञान वाढतं वा अज्ञान तसच राहतं. पण तरीही ते स्थळ काळ परत्वे बदलत असतं. त्यामुळे देह व बुद्धी हे अनित्य आहेत.ते देहा पश्चात नष्ट होत असल्यामुळे, विनाशी आहेत.
मन हे देह असेपर्यंत देह व बुद्धी यांच्या संगतीत असतं. पण देह गेल्यानंतर, तोच मनोमय कोष आत्म्याशी संलग्न होऊन आत्म्यासह, नवीन देह धारणा करून, पुढील भोग व उपभोग प्राप्त करून घेण्यासाठी, चैतन्य स्वरूपात पुढे जातात. म्हणजे ते नित्य आणि अविनाशी आहेत. याचा अर्थ देह व बुद्धी यांच्या जाणीवा व भाव हे नाशवंत आणि अशाश्वत स्वरूपाचे असतात. अर्थात ते अनन्य आहेत किंवा असतात असं म्हणता येणार नाही. कारण आज बुद्धीला अशी जाणीव झाली की माझं अन्य कोणी नाही, तर हा भाव वा ही भावना कधीही बदलू शकते.
मग ही अनन्यता नक्की कशी ओळखायची. एक लक्षात घ्या की, भगवंतांना वरील श्लोकात अभिप्रेत असलेली अनन्यता नक्कीच विनाशी देह, बुद्धी यांची असू शकणार नाही. कारण भगवंत स्वतः एक अविनाशी तत्व, शक्ती, ऊर्जा, ओज व तेज आहे. स्वतः अविनाशी असलेल्या तत्वाने, दुसऱ्या विनाशी असलेल्या देह व बुद्धी या तत्वा कडून अपेक्षा केली गेली असेल,हे संभवत नाही. म्हणजेच आत्मज्ञान प्राप्त, करून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या, मुळरुप आत्म्याला केला गेलेला हा उपदेश आहे किंवा दिलेलं हे वचन आहे.
आत्मज्ञान प्राप्त झालेला भक्त वा साधक, हा मुळातच देह, बुद्धी, त्यांची कर्म व त्या कर्माने प्राप्त भोग, उपभोग याबद्दल पूर्ण उदासीन असतो. किंबहुना तो तसा उदासीन झाला तरच, आत्म्याचा परम आत्म्याशी संबंध येऊन, जीवनाचं फोलपण, रितेपण, उणीव जाणवेल. हे रितेपण वा हा उणेपणा देह आणि देहाचे भोग,अनंत आहेत आणि तरीही अपूर्ण आहेत, याची जाणीव जागृत करेल. यातून पुढे ही एकच जाणीव जागृत होईल की, आत्म्याशी खरी साथ, एका भगवंताची,होती, आहे आणि असणार. बाकी देह बुद्धी यांच्याशी असलेली, या जगतातील साथ सोबत संगत ही या विनाशी जगतात असेल आणि इथेच कर्म फल संपेपर्यंत राहील, पण नंतर नष्ट होईल.
पण खरा प्रवास हा आत्म्याचा एकट्याचाच अनंता कडून अनंता कडे असतो आणि असणार.म्हणजे खरी अनन्यता आत्म्याच्या या प्रवासात, त्याचा इतर कोणी साथी, मित्र वा सखा नाही. तसा सखा मात्र आणि मात्र एक परम पूर्णांश अविनाशी ईश्वर आहे. जो अन्य कोणाही पेक्षा तुझ्या अर्थात आत्म्याच्या सर्वात जवळ, त्याला सर्वात सहज प्राप्त होऊ शकणारा आणि सदैव सहाय्यार्थं तत्पर असणारा आहे.
म्हणजे इतक्या दीर्घ चिंतनानंतर अनन्य या शब्दाचा भगवंतांना खरा अभिप्रेत असलेला भावार्थ, आपल्याला लक्षात आला. या अनन्य जाणिवेतून ईश्वराकडे आपण दास्य भक्तीच्या मार्गाने हृदयात पोचण्यासाठी अर्थात सख्यत्व प्राप्त करण्यासाठी, आवश्यक ज्ञान प्राप्त करून, जाणिवांची जागृती होऊन,ही अनन्यता साधू शकतो. पण या श्लोकाचं खरं मर्म उद्या जाणून घेण्याचा प्रयत्न करूया, त्यायोगे भक्ती मार्गाच्या पुढील पायरीवर आपण कसं जायचं, याचं गुह्य जाणून घेऊ शकतो.
पण तोपर्यंत या ज्ञानाच्या प्राप्तीची भूक व तळमळ अशीच जागुत राहावी, यासाठी त्याच प्रभूची, सद्गुरूंची अर्चना, वंदना व दास्य भक्ती करतच राहूया.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१३/०१/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment