Skip to main content

अध्यात्म विराम ७६

अध्यात्म विराम ७६
 
अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते।
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्।।९.२२।।

अनन्य भावाने चिंतन करून, जे जन माझी उपासना करतील, अश्या शब्दात वचन देताना श्रीकृष्ण भगवान इथे पर्युपासते असा विशेष शब्द वापरतात. पर्युपासते या शब्दाचा अर्थ आहे, पूर्णपणे उपासना करतात. आता पूर्णपणे उपासना करणे म्हणजे काय,तर अखंड, क्षणो क्षणी, नित्य, नितांत आवश्यक कर्म जाणून, किंवा याच साठी आपला जन्म झाला आहे आणि हे एकच कर्म आता शेष आहे असे जाणून उपासना करणे. 

आता उपासना करणे म्हणजे नक्की काय याचा विचार करूया. उपासना हा उप अधिक आसन या दोन शब्दा पासून तयार झालेला शब्द आहे. उपासना ही क्रिया आहे. उप म्हणजे विशिष्ट प्रकारचे व आसन म्हणजे बैठक आणि असे विशिष्ट आसन घालून मनाला एकाग्र करणे. त्याद्वारे संयोग साधणे. मुळात ही बैठक मनाला विशिष्ट प्रकारे, एकाग्र चित्त करून, त्याला ईश्वरी चिंतनाच्या लहरी,मनातून प्रसारित करून, त्याद्वारे तश्याच प्रकारच्या समान विश्व लहरींशी,त्यांचा संयोग घडवून आणून त्याद्वारे त्या लहरींद्वारे ऊर्जा व शक्ती प्राप्त करून, त्यांचे बल वाढवत नेणे.

एका विशिष्ट प्रकारच्या आसनाची सवय ही मनाला एकाग्रतेची सवय व्हावी, यासाठी करावी लागते. म्हणजे एकदा तशी सवय लागली की, मन कोणत्याही स्थितीत एकाग्रता योग साधण्यास सिद्ध होते.पण आपल्या विषया संदर्भातील आपला अर्थ असा आहे की, उपासना म्हणजे मनाचे नित्य ईश्वराशी जोडलेले असणे. पर्युपासते याचा अर्थ.आहे अखंड जे माझी उपासना करतात. म्हणजे हे नित्य माझ्या भजनी, पुजनी वा स्मरणी दंग असतात किंवा मग्न असतात. 

आता यातून शब्दशः भजन पूजन हे सर्वकाळी, सर्ववेळी, कोणत्याही परिस्थितीत सर्वसामान्य मानवाला शक्य असणार नाही. ईश्वर सुद्धा तश्या प्रकारच्या कल्पनेने माणसाला इतिकर्तव्यता सोडून हे कार्य करा असा संदेश देणार नाहीत. मग यातून अभिप्रेत असलेला नक्की अर्थ काय, तो समजून घेऊया. याचा नक्की अर्थ किंवा गूह्यार्थ असा आहे की, जे जन,फक्त मला एकमेव आधार जाणून, नित्य माझ्या स्मरणातून,चिंतनातून अखंड,अविरत माझेच चिंतनरूप पूजन व अर्चन करतात,त्यांना दुसऱ्या ओळीत दिलेल्या वचनासाठी, ईश्वर बद्ध आहे. 

म्हणजे ज्यांनी फक्त आणि फक्त मलाच केंद्रीभूत मानून, फक्त माझ्याच स्मरणात, फक्त माझ्याच चिंतनात आपला प्रत्येक क्षण व्यतीत केला आहे आणि जे जन फक्त आणि फक्त माझ्याकडे आकृष्ट आहेत, व ज्यांना माझ्या स्मरणा शिवाय अन्य काहीही आधार गरजेचा वाटतं नाही किंवा माझ्या स्मरणा व्यतिरिक्त ज्यांना अन्य कुठल्याही आधाराची शाश्वती नाही किंवा अन्य उपाय जरुरी वाटतं नाही, असे माझं नित्य स्मरण करणारे जन, असा सामुदायिक उल्लेख, भगवंत, पहिल्या ओळीत करतात.

आता या जनांसाठी भगवंतांनी काय वचन दिलेलं आहे, यावर उद्याच्या भागात, चिंतन करूया आणि त्या द्वारे भक्ती मार्गातील सातव्या भक्तिकडे पाहण्याचा विचार करूया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१५/०१/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...