अध्यात्म विराम २०
भौतिक जगतात आच्छादनं, प्रत्यक्ष उचलून काढावी लागतात. पण व्यक्तित्वावरील डाग हा उत्तम कर्म करून, दूर करता येतो. मनावरील किंवा आत्म्याला लागलेली काजळी ही अनेक जन्मांची असते. त्यासाठी चांगल्या प्रकारे प्रयत्न करणं जरुरीं आहे. कल्पना करा की, मनाला अत्यंत वाईट संगती जडली आहे किंवा वाईट वागायची, बोलायची सवय लागली आहे.
ठराविक काळानंतर, तो आपल्या नित्याचा भाग होऊन जातो. किंबहुना आपण तश्या प्रकारे न वागता राहू शकत नाही. आपलं मन आपल्याला त्यापासून लांब जाऊ देत नाही. काही सवयी इतक्या खोल रुजलेल्या असतात की, त्यांना काढून टाकणं, खूप कठीण असतं.या अश्या सवयी नित्याचा भाग असल्याकारणाने, अनेकदा आपल्या लक्षात सुद्धा येत नाही की, आपण असे वागतो आहोत.
या अशा प्रकारच्या अनेक गोष्टींनी, मनाला एक प्रकारे बोथट किंवा संवेदना हिन बनवलं जातं. किंवा नित्याच्या सवयीने, ते तसं बनतं. उदाहरणार्थ एखाद्या वाईट मार्गी व्यसनी किंवा चुकीच्या पंथाला गेलेल्या माणसाला, एकदा सवय झाली की, ठराविक काळानंतर, त्याला त्याबद्दल काहीही वाटत नाही. म्हणजे सवय माणसाला अनेक चुकीच्या, वाममार्गी गोष्टींची भीती किंवा न्यून वाटू देत नाही. याचं कारण की, त्यास्थितीत मन, इतर कोणत्याही चांगल्या गोष्टी करू इच्छित नाही.
एकप्रकारे, मेंदूवर, विवेकावर, विचारांवर आच्छादन घातलं जातं. विवेक विचार व मेंदू यांवरील हे आच्छादन काढण्याचा किंवा वेगळा विचार रुजविण्याचा, सर्वात सोप्पा उपाय म्हणजे श्रवण. ब्रेनवॉश हा दृक्श्राव्य माध्यमाचा वापर करून केला जातो. पण त्यामध्ये मुख्य भर दिला जातो तो, कानांवाटे मनाला एक प्रकारचा ठराविक विचार करायला लावलं जातं. त्यानंतर मन, ऐकण्यात आलेल्या, त्या ठराविक गोष्टींनी भारावून जातं.
तरीही, अश्याप्रकारे, नित्य सवयीने किंवा brain वॉश मुळे असेल, पण ज्यावेळी मन बोथट होतं आणि विवेक व विचार यांना जागा नसते, त्यावेळी मनापर्यंत पोचणारं एकमेव साधन म्हणजे श्रवण. आपण अनेकदा पाहिलं असेल की, एखाद्या क्रोधित झालेल्या व्यक्तीला, शांत करण्यासाठी, बाजूला असलेल्या व्यक्तीला, प्रसंगी त्यापेक्षा जास्त आवाजात ओरडावं लागतं. तरच ते बोलणं, त्यावेळी क्रोधित मनापर्यंत पोचतं.
श्रवण हे असं माध्यम आहे, जे एखादा विचार, ध्येय, उद्देश यांना, यथोचितपणें हळूहळू मनापर्यंत पोचवू शकतं. मनावर आणि आत्म्यावर अनेक जन्मांची साठलेली पुटं काढणं, हे साध्य करण्यासाठी हळूहळू झिरपत जाणारं औषध, मनावर स्वल्प प्रमाणात सोडत गेल्यास, मनाला त्याचा विचार करावा लागतो. परंतु यामधे सातत्य हवं, ते नित्य व्हावं लागतं.
श्रवण काय काय साध्य करू शकतं यावर उद्याच्या भागात चर्चा करूया.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२०/११/२०२२
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment