Skip to main content

अध्यात्म विराम ६७

अध्यात्म विराम ६७

दासांचा दास हनुमंत हा श्रेष्ठ यासाठी नाही की तो लीन आणि शरणागत आहे, तर यासाठी आहे की,तो आपल्या स्वामींना सर्वश्रेष्ठ मानतो. यात त्या हनुमंताच्या श्रेष्ठत्वाचं यश दडलेलं आहे. खरा भक्त तोच, जो ईश्वराला पूर्ण व श्रेष्ठ मानतो आणि स्वतःला शून्यवत वा तृणवत मानतो. स्वामी त्या शून्याला कोणत्या संख्येसमोर नेऊन ठेवायचं ते ठरवेल,हा सार्थ आणि पूर्ण विश्वास भक्ताच्या मनात दृढ असावा. 

हा भाव इतका दृढ व घट्ट असावा की, या तिन्ही लोका तील कोणतीही शक्ती, या विश्वासाला तडा देऊ शकणार नाही. म्हणजे मग भोग आणि उपभोग या दोन्ही स्थिती मनावर आणि मनाच्या विश्वासावर कसलाही आघात करू शकणार नाहीत. भोग आणि ईश्वर या लेखमालेच्या पुढे अध्यात्म विराम सुरू करण्यामागचा उद्देश आणि मर्म कदाचित यातून लक्षात आलं असेल.कारण ती लेखमाला आलेले भोग व उपभोग यांची कारण मीमांसा ही कर्मात व कर्मगतीत आहे, हे ठसवते. 

या कर्माच्या फेऱ्याला, त्याच्या सर्व परिणामांना आपण स्वतः जबाबदार असतो, ईश्वर त्यात दखल देत नाही. ईश्वर फक्त साक्षीरूप असतो. त्याची आपल्याला सहाय्य करण्याची इच्छा जरूर असते. पण आपण जोपर्यंत या कर्मगतीच्या फेऱ्यातून बाहेर पडण्याची इच्छा आणि त्या ईश्वराकडे जाण्याची मनीषा मनात बाळगून, भक्त म्हणून आयुष्याचा उर्वरित काळ व्यतीत करत नाही, तोपर्यंत ईश्वर सहाय्यास येऊ शकत नाही.

मुळात हा भाव मनात घट्ट करून घेतला पाहिजे की, ईश्वर सर्वश्रेष्ठ आहे आणि या जगातून, या देहातील आत्म्याला, या जगताबाहेर नेऊन, ईश्वराकडे घेऊन जाण्यासाठी, जोपर्यंत देह, मन, बुद्धी व आत्मा हे सर्व एकसारखा एकच विचार करत नाहीत तोपर्यंत हे शक्य होऊ शकत नाही. या दृढ भावाकडे जाण्यासाठी आधी भोग का आले,ते कसे भोगुनच संपवावे लागतील,त्यांना जिंकण्याचा किंवा त्यांच्या पुढे हरण्याचा विचार न करता, ते भोगून पुढे जाणं. 

या भोगात वा उपभोगात मनावर कोणतेही ओरखडे किंवा मेद चढू न देता, त्या मनाला स्वच्छ, शुद्ध ठेवण्या साठी भक्तीरुपात ईश्वर वंदना,आराधना, प्रार्थना, शरणा गती आणि दास्यत्व हाच योग्य मार्ग आहे. याच कारण सुद्धा तसच आहे. मन हे देहाच्या व कर्माच्या फलात गुंतलं की, त्याला या खेळात फक्त वाहात जाणं हे एकच कार्य उरतं. किंबहुना तोच त्या मनाचा नित्य कार्यभाग होतो. मग ते मन भोग आणि उपभोग या चक्राच्या जाणिवेचा भाग होऊन, देहप्राप्ती-मृत्यू, पुन्हा भोग व उपभोग यांसाठी पुन्हा नित्य देह प्राप्ती आणि मृत्यू या व्युहात अडकून जातं. 

या मनाला या व्युहातून बाहेर येण्याचा मार्ग कर्म समाप्ती या मध्ये नाही. कारण जो पर्यंत कर्माचा शेवटचा भाग शिल्लक आहे, तोपर्यंत हा फेरा सुरूच राहतो. मग यावर उपाय काय, त्याबद्दल उद्याच्या भागात चिंतन करूया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०६/०१/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...