अध्यात्म विराम ४०
कालच्या विषयाला पुढे घेऊन जाऊ आणि चिंतन पुन्हा सुरू करूया.
मानसशास्त्र असं सांगतं की,छोट्यातील छोट्या आठवणी पासून, मोठ्या घटना इत्यादी, सर्व मनाच्या तीन थरांपैकी कुठेही,साठवलेल्या असतात.योग्य वेळी किंवा आघाताने अपघाताने,अचानक त्या आठवणी पृष्ठपटलावर आणणं ही जबाबदारी मनावर असते. मन आपलं हे कार्य प्राप्त परिस्थिती व तशाच प्रकारच्या समान स्थितीत पृष्ठ भागावर घेऊन येण्याचं कार्य अविरत करत असतं.
म्हणूनच कित्येकदा आपल्याला समान परिस्थितीत एखादी मागील घटना किंवा व्यक्ती आठवते. आपण म्हणतो सुद्धा, की हे असच माझ्याबाबत मागे घडल होतं किंवा ही व्यक्ती मागे कधीतरी भेटली होती.त्या आठवणी पुन्हा पटलावर येऊन, ही समानता जाणवणं, ही शोधा शोध, निमिष मात्र वेळेत, मन घडवून आणतं. हीच मनाची अमर्याद शक्ती आहे.
यालाच हनुमंताच्या परिभाषेत कल्पून समर्थ रामदास स्वामी यांनी, "तयासी तुळणा कैसी ब्रम्हांडी पाहता नसे" "अणुपासोनी ब्रम्हांडा एवढा होत जातसे",अश्या प्रकारची विशेषणं वापरली आहेत. ती विशेषणं हनुमंता प्रमाणेच मनाला सुद्धा लागू पडतात.
या निमिषात सर्व शोधून पृष्ठ पटलावर आणण्याच्या किमयेला आपण आजच्या काळात गूगल सर्च म्हणतो. हे सर्च मनाला, ईश्वराने दिलेली देणगी आहे, हे आपल्याला कधी लक्षात येतच नाही. म्हणजेच जगातील पाहिलं सर्च इंजिन हे मन आहे आणि अभिमानास्पद बाब ही आहे की, हे ईश्वर या श्रेष्ठ वैज्ञानिकांने घडवलं आहे.
म्हणजेच परिस्थितीची आणि घटनाची समानता किंवा पुनरावृत्ती झाल्यास, मागील आठवणी जागृत पटलावर येऊ शकतात, मन त्यांना वरच्या पटलावर आणू शकतं. आता ही जर व्यवस्था मन या सुप्त इंद्रियात, देवाने निर्माण केली आणि हे एकमेव सुप्त इंद्रिय मृत्यू नंतर जीवासोबत पुढे जाऊन, नवीन देहात स्थापित होतं. याचा जरा सखोल विचार करूया.
इथे एक संदर्भ जोडून हे चिंतन पुढे नेऊ. श्रीमद् भगवद्गीतेत भगवान स्वतः हे सांगतात की इंद्रियांमध्ये मी मन आहे आणि म्हणून ते आत्मा या ईश्वरी अंशाला जोडलेलं आहे. पण ते लवचिकतामुळे सहजी देहाकडे ओढलं जातं आणि अनेक घात अपघात व आघात ते मन स्वतःवर ओढवून घेतं आणि नंतर स्वतःच विचार करतं की, हे काय घडलं. असो यावर नंतर चिंतन करूच.
त्याचं श्रीमद् भगवतगीतेत स्मरण याबद्दल सांगताना अर्जुनाला उद्देशून श्रीकृष्णांनी हे स्पष्ट केलं आहे की, माझे आणि तुझे कित्येक जन्म झालेत, मला ते स्मरतात पण तुला देह सोडल्या पश्चात त्यांचं विस्मरण झालेलं असल्यामुळे, आज स्मरत नाहीत. स्मरण याबद्दल आठव्या अध्यायात, मधुसूदन असही सांगतात की,
मृत्यू समयी, जो भाव स्मरणात असेल, त्यानुसार पुढील जन्म प्राप्त होतो. म्हणजेच ईश्वराच्या कथनानुसार मृत्यू समयीची स्मृती ही मनोमय कोषात कायमस्वरूपी कोरली जाते म्हणून मनुष्य आयुष्यभर,जेंव्हा ज्या भावाचं, वासनेचं, स्मरण करेल, तोच भाव वा वासना मृत्यू समयी मनाच्या पटलावर स्थिरावेल. तोच भाव, त्यासमयी दृढ असेल. त्यामुळे, त्या देहातील आत्मा, मृत्यू पश्चात, त्या भावातील, देहाचा अधिकारी होतो.
आता पुढील भागात, स्मरण यावर अजून सखोल चिंतन करूया.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१०/१२/२०२२
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment