अध्यात्म विराम ३५
म्हणजे काळाच्या कोणत्याही स्थितीत, मनुष्य, आपल्या जन्माच्या कित्येक योजने दूरच फिरत राहील. कारण या संसाराच्या पसाऱ्यात व व्यापात, आत्मउद्धार व आत्म शुद्धीसाठी, काही करण्याचा विचारही मनुष्य करणार नाही किंवा करू शकणार नाही.
अनेक कारणं त्या त्या सांप्रत काळी, मनुष्याला बांधून ठेवतील. कधी व्यापामुळे कधी श्रमामुळे, कधी सक्षमते अभावी, कधी आळसामुळे, कधी कर्मफल तापामुळे, कधी संसाराच्या तापत्रयामुळे, कधी मायेच्या मोहात, पेचात आणि जाळ्यात अडकल्यामुळे, कधी जाणून बुजून व मुद्दाम मनुष्यहून आत्ममार्गी बनण्यापासून सतत दूर दूर जात राहणार.
या सर्वाची कल्पना, मन नामक इंद्रिय आणि माया नामक शक्ती निर्माण करणाऱ्या ईश्वराला होती किंवा त्रिकाल ज्ञानी असल्यामुळे, दिसलं होतं. म्हणूनच त्याच दयाघन, परम कनवाळू ईश्वराने, श्रवण कीर्तन असे भक्तीचे दोन सहज सुलभ राजमार्ग प्रस्थापित करून, आपल्याच प्रतिनिधींमार्फत, अंशांमार्फत,मानवापुढे मांडून, भक्तीच्या प्रांगणात श्रवण व कीर्तन या दोन मार्गांवर मुक्त संचार करण्याची मुभा, सुलभता आणि सोय करून दिली आहे.
कीर्तन या प्रकारात कीर्तन, भजन, पूजन, भक्तिरस गायन, कथा, प्रवचन, इत्यादी ज्ञात व अज्ञात सर्व माध्यमांचा समावेश होतो. यातून उत्पन्न होणारी भक्तीची, साधनेची,अद्भूतभाव रसाची निष्पत्ती श्रवणाचा योग साधतातच. पण त्यातून निर्माण होणाऱ्या भक्ति रसाच्या तन्मय,संयुक्त लहरी,त्यावेळी उपस्थित सर्व जनसमुदा याला भरून, भारून व भारावून टाकतात.
कीर्तनाच्या अद्भुत माध्यमातून, ईश्वरी नामाच्या घोषातून, संकीर्तनातून, नामाने, उत्पन्न नाद लहरीतून श्रोतेजन नादमय, आनंदमय, ब्रम्हमय, भावमय समाधी, ध्यान धारणा यांचा सुखादानूभव घेऊन, भक्तिरसातून आपला देह, मस्तिष्क, हृदय, मन याच्यात अतिरिक्त चेतना, ऊर्जा व शक्ती यांचा अनुभव करून घेऊन, ईश्वरी उद्देशाप्रत मार्गक्रमण करण्याच्या कार्यात अग्रेशित होऊ शकतात. निदान काही गती त्यांना त्या मार्गात नक्की मिळू शकते.
कारण ईश्वरी नामाच्या श्रवणाची अद्भुतता ही आहे की, तो नाद, त्या लहरी, तो ध्वनी, तो स्वर, सुर, नाम, घोष इत्यादी, प्रत्यक्ष इश्वराशी अनुसंधान जोडून देतात. मन, देह, मस्तिष्क, आत्मा हे सारे, एका दिव्य सुरात बांधले जातात. याचा अनुभव, श्रोत्यांना, सद्गुरू व ईश्वर चरणी आपली प्रार्थना प्रत्यक्ष रुपात सादर करतो.
कारण ईश्वराला सर्वात प्रिय काय असेल तर ते म्हणजे नाम, सर्वात अद्भुत मोहिनी असेल तर ती नामाची, नाम जागराची आणि त्या कीर्तनातून उत्पन्न होणारी नादमयता यांची ओढ, गोडी . या नादात स्वये जगदीश्वर देखील हरवून जातो.
आजचा विषय उद्या पुढे सुरू ठेवू. पण तोपर्यंत ईश्वराच्या नामाच्या नादात हरवून जाण्याचा प्रयत्न करूया.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०५/१२/२०२२
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment