अध्यात्म विराम ५१
आधीच्या चारही प्रकारातील भक्तीचा आपण आढावा घेतला तर चढत्या क्रमाने, श्रवण, कीर्तन, स्मरण आणि पादसेवन यामधे, साधक आपल्या भक्ती मार्गातील प्रगती पायरी पायरीने साधतो. जो हे साधण्यासाठी साधना करतो, तो साधक हे आहेच. पण खरा साधक म्हणजे साधना करता करता भक्तीच्या वाटेवर आपलं आत्महित व आपली पारमार्थिक प्रगती साधतो तोच खरा साधक. कारण या सर्वात हितकारक मार्गावर, आत्महीत साधण्याची साधना. करताना, आत्म्याच्या जाणीवा जागृत करण्यासाठी जे साध्य आहे, ते साधणं म्हणजे साधना करणं.
फक्त श्रवणासाठी श्रवण वा स्मरणासाठी स्मरण हा निव्वळ उपचार न ठेवता, मी माझ्या आत्महिताचा कार्यभाग साधत आहे, हे मनात संकल्पासह दृढ केलं तरच, खऱ्या अर्थाने, मन त्या साधनेत लागेल आणि कालांतराने रममाण होईल. ईश्वराच्या पाद सेवनाचा सखोल विचार केल्यावर, त्या स्थितीत पोचण्यासाठी मनाचा निग्रह जितका जरुरी आहे,तितकीच आवश्यकता मन खऱ्या अर्थाने, प्रभू चरणी स्थिर होण्याची आहे.
यासाठी मनात इच्छित नामाची प्रतिमा दृढ धरून, त्यांचं नित्य स्मरण करून, आपला साधनेचा अभास पुढे नेत गेलं पाहिजे. यामधे सद्गुरू नाम धारण केलेल्या साधकांना निश्चित लाभ होईल. एकदा हे साधता आलं की, त्या ईश्वरी चरणांचं पादसेवन करण्याची इच्छा मनात आणत जावं. या स्थितीला आल्यावा, लक्ष आपल्या संकल्पनेतील प्रभू वा सद्गुरू यांच्या चरणी स्थिर करण्याचा प्रयत्न करावा. मनात येणारे इतर सर्व विचार सुद्धा त्याच भावात समिश्रीत करावे.
हे साधण्यासाठीच नामस्मरणात दृढता आणि सातत्य दोन्ही महत्वाचं आहे. संकल्प, दृढता आणि प्रयास या त्रयीने, मन आणि मनातील सर्व विचार एकाच धाग्यात येत जातील. तदनंतर मनाची दृष्टी, प्रभू चरणी स्थिर करण्याचा प्रयत्न करावा. यामधे सतत आपल्या सद्गुरू किंवा ईश्वर यांचा जाप वा स्मरण असावं. कारण सरते शेवटी त्यांची कृपा हीच आपल्या कार्याची सफलता आहे, हे ध्यानात असावं.
मन आपल्या वृत्ती आणि विचार, यांची लीनता वा शरणागती किंवा समर्पण हे त्याचं ठिकाणी करतं, जिथे त्याला काही उच्च आदर्श, भाव, प्रेरणा, विश्वास व श्रद्धा आढळून येतं. मनाचा हा भाव अर्थात ही जाणीव, तेंव्हाच जागी होईल, जेंव्हा, त्या परम मंगल, श्रद्धेय, एकमात्र, अलौकिक, विश्व निर्माता व नियंता, याच्यावर पूर्ण व ठाम विश्वास, श्रद्धा असेल वा जागृत होईल. ही जाणिवांची जागृती होण्यासाठी सुद्धा त्यांच्याच परम कृपेची आवश्यकता आहे.
त्यासाठीच अर्चन भक्ती ही पाचवी पायरी, आपल्याला नक्कीच सहाय्यभूत होईल. यावर दीर्घ व सखोल चिंतन, उद्याच्या भागात करूया. तोपर्यंत आपण नित्य श्रवण, स्मरण यांचा अभ्यास करतच राहूया.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२१/१२/२०२२
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment