अध्यात्म विराम ७०
शरण, लीन आणि दास्यत्व या त्रयी बद्दल आज विचार करूया. दास्यत्व ही सहज साध्य होणारी स्थिती नाही, हे ध्यानात ठेवा. याचं कारण, गेले काही भाग, मी सांगत असलेल्या अहं या दुर्गुणात दडलेले सर्व बंधू, मनाला, देहाला व बुद्धीला बांधून ठेवतात.हा बांध एखाद्या रस्सिने बांधलेला नसूनही, देह बुद्धी व मन या दूर्गुणात जखडले जातात. इतका हा बांध, अतूट असतो की, उत्तर दिसत असूनही मन, बुद्धी व देह त्या उत्तराकडे जात नाही, जाऊ शकत नाही. मग यावर उपाय काय.
मनाला एखादा अधिकारी किंवा आपल्याहून श्रेष्ठ वा आपल्या पेक्षा उच्च पातळीवरील व्यक्तित्व किंवा तत्व आढळलं, पटल तर मन त्या ठिकाणी आपला अहं, दंभ आणि गर्व सोडून देतो आणि त्या व्यक्ती वा तत्वाला शरण जाऊन, मन त्या चरणी लीन राहू शकतं. ही शरणागती त्या तत्वातील त्या मर्माला असते, जे मर्म त्या तत्वाला आपल्याहून श्रेष्ठ ठरवतं. हे श्रेष्ठत्व एकदा स्वीकारल्या नंतरच मन त्या ठिकाणी शरण जातं आणि ते श्रेष्ठत्व चुकीचं ठरत नाही तोपर्यंत ही शरणागती राहते.
उदाहरणार्थ एखादा गावगुंड, त्या गावातील सर्वात शक्तिवान पुरुष असेल, तर त्याच्या ताकदीमुळे, धाका मुळे अनेक जण त्याला शरण जातात आणि त्या स्थिती पर्यंत लीन राहतात, जोपर्यंत, त्याच्याहून श्रेष्ठ वा शक्ति वान व्यक्ती येऊन, आपली ताकद सिद्ध करत नाही. ज्या क्षणी अशी शक्ती येईल, त्या क्षणी त्या मूळ गावगुंडाचं महत्व शून्य होईल वा संपुष्टात यायला सुरुवात होईल. हेच उदाहरण चांगल्या किंवा धर्म व श्रेष्ठ कार्यात लागू केलं जाऊ शकतं.
पण मूळ सिद्धांत हाच आहे की, एखाद्या श्रेष्ठ तत्वाला हे मन शरण जाऊन, तेथे लीन राहून, त्या श्रेष्ठत्वाचं दास्यत्व पत्करून आपले गुण व अवगुण त्या ठिकाणी समर्पित करू शकतं. यात काही प्रमाणात स्वार्थ असूच शकतो. पण हा स्वार्थ, देहाच्या ठिकाणी मनाच्या असलेल्या दृढते मुळे असतो. कारण आपण देह मन व बुद्धी याचं गोष्टी पाहतो, त्यामुळे त्याच जाणतो आणि फक्त त्यांनाच सत्य मानतो.त्यामुळे एखाद्या सर्वश्रेष्ठ शक्तीपुढें किंवा तत्वाच्या चरणी अर्पण, होऊन, लीन राहणं, हे आपल्या दृष्टीने देह मन व बुद्धी यांची लीनता वा शरणागती असते.
तत्व किंवा नियम म्हणून पाहिलं, तर मन हे श्रेष्ठ व्यक्ती वा तत्व यांच्या चरणी नतमस्तक होतं, हे मात्र नक्की. पण वास्तविक पाहिलं तर, कर्मगतीच्या सिद्धांताच्या आधारे, कर्मफल हे प्राप्त होतं आणि भोगूनच संपवावं लागतं. हे एकदा मनात दृढ धरल्या नंतर, वास्तविक प्रश्न निर्माण होतो की, सहसा आपण भुलोकि व्यवहारात,. एखाद्याला श्रेष्ठ मानतो,तेंव्हा तो आपल्या चुका पदरात घेऊन त्यातून आपल्याला सोडवून पुढे नेईल, या मर्यादित उद्देशाने आपण त्याला शरण असतो किंवा श्रेष्ठ जाणतो.
या सर्व पार्श्वभूमीवर जर कर्मफल न्याय श्रेष्ठ मानला तर दास्यत्व भक्तीचा खरा पारमार्थिक अर्थ काय काढावा, असा एक तात्विक प्रश्न मनात येऊ शकतो. त्यावर आपण उद्याच्या भागात, चिंतन करूया.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०९/०१/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment