अध्यात्म विराम ६१
निर्गुण आत्मा, निराकार मन आणि या दोन्हीनी युक्त परम आत्मा,यांच्या काही क्षण एकरुपतेचा साक्षात्कार, म्हणजे काही क्षण केलेलं वंदन. हे वंदन कसं करावं आणि ते तसं का करावं, याचसुद्धा शास्त्र आहे. त्या शास्त्रामध्ये विज्ञान आहे. विज्ञान यासाठी की, आत्मा, मन आणि देह यांचं एकत्रित अस्तित्व याच भूतलावर आहे, त्यामागे, सर्वोत्तम वैज्ञानिक, ईश्वर याने निर्माण केलेली शास्त्रीय, वैज्ञानिक व्यवस्था हे कारण आहे. म्हणूनच विज्ञान जितकं सखोल संशोधन करत जाईल, तितकीच,त्या विज्ञानाला ईश्वराच्या अमानवीय शक्तीच्या कल्पक पण वैज्ञानिक निर्मितीची ओळख पटत जाईल, हे निर्विवाद.
याच शास्त्रीय संशोधनातून, सिद्ध केलेलं ज्ञान,शास्त्र, मंत्र, स्तोत्र, संस्कार, यांच्या माध्यमातून, माणसाला, देह बुद्धी, मन आणि आत्मा यांचा चौकोन साधून, या भुलोकीच्या भूमितीच्या प्रमेयाला सोडवून, आत्मा पुन्हा स्वस्थानी अर्थात विधात्याच्या हृदयापर्यंत पोचावा, याच उद्देशाने माणसाच्या समोर मांडून ठेवलं. हेतू हा की माणूस याचा जास्तीतजास्त सदुपयोग करून घेईल आणि अध्यात्मिक प्रगती साधत पुढे जाईल.
या सर्व शास्त्र,मंत्र, स्तोत्र यांच्या साहाय्याने मन व आत्मा या शक्तींना एक करून,परम शक्तिपुढे लीन व शरण होण्याचा अभ्यास करून, हा संगम योग, वंदन भक्तीच्या माध्यमातून साधता यावा. यातील गमक हे आपल्याला ज्ञात होत नाही, जाणवत नाही किंवा काळाच्या ओघात वंदन भक्ती किंवा सर्वच भक्ती मार्गांचं महत्व आपण विसरत चाललो आहोत.अथवा परकीय सांस्कृतिक हल्ल्यामुळे, वा काळाच्या ओघात इतका सहज आणि कमी वेळात आपलं हित साधणारा मार्ग आपल्याला लक्षात येत नाही की, हा हितावह वाटतं नाही.
म्हणूनच पूर्वीच्या काळात तिन्ही त्रिकाळ देवापुढे,किंवा मंदिरात, अनेक कारणांनी, उभं राहून अथवा बैठक घालून, काही काळ, त्या अनंत आणि अपरिमित शक्ती पुढे लीन, नत, व शरणागत होऊन, मन, आत्मा आणि परमात्मा यांच्या भेटीचा त्रिकोण साधला जावा किंवा साधता यावा, हाच महत्तम उद्देश, त्यापाठीमागे असावा.
आता वंदन हे, विशिष्ट ठिकाणी किंवा देवाच्या मुर्तीपुढेच उभं राहून अथवा काही क्षण बसून का करायचं यावर, उद्याच्या भागात चिंतन करूया. तोपर्यंत त्या अद्वितीय शक्तीपूढे नत होऊन वंदन करूया.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
३१/१२/२०२२
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment