अध्यात्म विराम ८५
श्रद्धा आणि शंका यामधे श्रद्धा पूर्ण, अनन्य आणि दृढ असेल तर नक्कीच शंका मनात आली तरी ती आपोआप विझून जाईल.आपण मात्र त्या श्रद्धेला घट्ट धरून ठेवायचे असते. आता या श्रद्धेला धरून ठेवायचे म्हणजे नक्की काय करायचे, याचा विचार करूया. मनाला कोणत्यातरी धाग्यात किंवा किंवा स्थानी गुंतवले की, ते इतरत्र फिरत नाही.जरी इतर विचार मनात आले तरी,ते क्षणमात्र राहून, पुन्हा आपल्या वाटेने निघून जातात, असा अनुभव येतो. म्हणून त्या श्रद्धेला कुठेतरी गुंतवले की ती श्रद्धा आपली जागा सोडत नाही. पण ज्या जागी तिला गुंतवायचे, ती जागा तशीच श्रद्धेय व पूजनीय असावी.
मग अशी कोणती जागा आहे, जिथे त्या श्रद्धेला आणि त्या श्रद्धेच्या माध्यमातून मनातील शक्ती, ऊर्जा व ओज यांना एका स्थानी जुंपावे, असा प्रश्न मनात आल्याशिवाय रहात नाही.मनात ओज असते हे नक्की. पण ते सात्विक व शुद्ध चित्तातून बहरून, आपल्या प्रभावाचा परिणाम दाखवते. यावर नंतर चिंतन करूया. मुळात खरी श्रद्धा व खोटी श्रद्धा असा कोणताच प्रकार अस्तित्वात नाही. जी पूर्णपणे आणि दृढ असते तीच श्रद्धा आणि याव्यतिरिक्त जी असते ती अश्रद्धा.
तर आता या मनाला कोणत्या स्थानी गुंतवलं तर मनातील शुद्ध सात्विक भाव जागृत होऊन, ते आपल्या ओजाने श्रद्धेला दृढ धरून ठेवेल. मुळात पूर्ण श्रद्धा ही सात्विक व शुद्ध वृत्ती आहे व ती प्राप्त करण्यासाठी पूर्ण शरणागती हा सर्वात उत्तम मार्ग आहे. चरण, शरण आणि स्मरण या त्रयीचा आधार घेऊन, पुढे पुढे जात राहिल्यास, श्रद्धा अधिक बळकट होण्यास मदत होते. म्हणून ज्या स्थानी या त्रयीला आपण गुंतवू ते स्थान किंवा ते चरण हे परम पावन ईश्वराचे असावे.
पण आपण या डोळ्यांनी त्याचा अनुभव कधीही घेतला नाही. मग काय करावे,हा प्रश्न मनात आल्याशिवाय रहात नाही. अश्यावेळी,ज्यांनी त्याला पाहिले आहे वा त्याच्या शक्तीचा, स्वरूपाचा आणि अस्तित्वाचा अनुभव किंवा प्रचिती घेतली आहे,अश्या निष्ठावान श्रद्धेने समृद्ध, महान व्यक्तींचा आधार आपण घेऊ शकतो. आठवून बघा, आपण ज्यावेळी लहान होतो त्यावेळी, चालताना आपण वडीलधाऱ्या व्यक्तींचा हात धरून चालतो. जेणेकरून आपण भरकटणार नाही आणि मार्गावर राहू. आपल्याला व्यवस्थित चालावयाला यायला लागेपर्यंत आपला हात किंवा आपलं बोट, वडीलधारे कोणीतरी धरतात.
पण त्यांनी तसा आपला हात धरण्यासाठी आपण त्यांच्या सोबत जाण्यास सुरुवात केली तरच,ते आपलं बोट धरून आपल्याला त्यांच्या सोबत नेतील. एकदा त्यांनी आपलं बोट धरलं की,आपण डोळे झाकून,निश्चिंतपणे वाटचाल करू शकतो. कारण त्यानंतर आपण मार्ग चुकण्याचा प्रश्नच उरत नाही. मात्र आपण चालताना मार्ग सोडण्याचा किंवा थांबण्याचा प्रयत्न केल्यास, पाठीत त्यांचा प्रेमरूपी धाकाचा रट्टा मिळालाच म्हणून समजा. पण त्याचं कारण आपण मार्ग चुकू नये,हे असतं, इतका मात्र कायम ध्यानात ठेवावं.
प्रपंचात जे महत्व वडीलधाऱ्या व्यक्तींना आहे तेच महत्व किंबहुना त्याहून जास्त महत्व, अध्यात्मिक मार्गातील वाटेवर, आत्मज्ञान प्राप्तीच्या मार्गावर,सदगुरू रूप वडील धाऱ्या व्यक्तीचं आहे. यावर पुढील भागात चिंतन सुरू करूया.तोपर्यंत आपल्या मनातील श्रद्धेला,निश्चित स्थानी गुंतवण्यासाठी,सद्गुरू वा ईश्वर यांच्या स्मरणाचा आधार घेऊया.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२४/०१/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment